सातारा:-महाराणी येसूबाई फाउंडेशनने जोपासला दानशूरपणा; संगममाहुलीच्या शाळेत सीसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-महाराणी येसूबाई फाउंडेशनने जोपासला दानशूरपणा; संगममाहुलीच्या शाळेत सीसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण.

सातारा प्रतिनिधी – विनोद पाटील
संगममाहुली गावाला इतिहासाचा समृद्ध वारसा आणि परंपरेची मोठी पार्श्वभूमी लाभली आहे.याच ऐतिहासिक भूमीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून महाराणी येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक सुहास राजेशिर्के यांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरविला आहे. फाउंडेशनच्या वतीने शाळेत दर्जेदार सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला मोठे बळ मिळाले आहे.

सातारा तालुक्यातील संगममाहुली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महाराणी येसूबाई फाउंडेशनच्या वतीने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बिल्ले यांच्या हस्ते फीत कापून या सीसीटीव्ही यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी महाराणी येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक सुहास राजेशिर्के, ‘मास’चे अध्यक्ष राजेंद्र मोहिते, इतिहास अभ्यासक निलेश पंडित, बंटीराजे भोसले, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने, दिलीपराव गायकवाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन ढवळे, शिक्षिका हेमा ढाणे, शारदा कांबळे, रोहिणी जगताप, रूपाली ननावरे, महिला पोलीस जयश्री सुतार व कावेरी साळुंखे यांच्यासह शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुन्हेगारीला वचक ठेवण्यासाठी सीसीटीव्ही महत्त्वाचे
यावेळी मार्गदर्शन करताना सहायक पोलीस निरीक्षक बिल्ले म्हणाले की, “महाराणी येसूबाई फाउंडेशनच्या वतीने शाळेच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. आजच्या काळात विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही काळाची गरज बनली आहे. समाजात विविध प्रकारची गुन्हेगारी वाढत असताना अशा घटना रोखण्यासाठी आणि गुन्हेगारीला वचक ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त ठरते.”
ते पुढे म्हणाले, “माणसाची साक्ष किंवा जबाब बदलू शकतो; मात्र सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली घटना बदलता येत नाही. त्यामुळे तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतही सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचा पुरावा ठरतो.”
मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी पुस्तकांची गरज
आजच्या डिजिटल युगात मुलांचा मोबाईलवरील वाढता वेळ लक्षात घेता शाळांमध्ये ग्रंथालये आणि दर्जेदार पुस्तकांची उपलब्धता असणे आवश्यक असल्याचेही बिल्ले यांनी सांगितले.
“आजच्या मुलांनी अधिकाधिक पुस्तके वाचली पाहिजेत. मुलांना चांगली पुस्तके उपलब्ध करून दिली, तर त्यांना मोबाईलपासून दूर ठेवण्यास मदत होईल. पुस्तकांमधून मुलांचे ज्ञान, विचार आणि कल्पनाशक्ती विकसित होते,” असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
‘याच मातीतून उद्याच्या येसूबाई आणि शाहू महाराज घडतील’
महाराणी येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक सुहास राजेशिर्के म्हणाले, “संगममाहुली या गावाशी आमचे एक वेगळे आणि भावनिक नाते आहे. महाराणी येसूबाई यांचे पार्थिव याच मातीत दफन करण्यात आले होते. शिरकाई देवीची कृपा आणि महाराणी येसूबाई यांच्या त्यागाची प्रेरणा घेऊन या शाळेला सीसीटीव्ही देण्याचा विचार मनात आला. दिलेला शब्द पूर्ण करणे हे आम्ही आमचे आद्य कर्तव्य मानतो.”
ते पुढे म्हणाले, “या शाळेतून उद्याच्या महाराणी येसूबाई आणि शाहू महाराजांसारखी कर्तृत्ववान पिढी घडणार आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण मिळाले, तर त्यांच्या शिक्षणाला आणि व्यक्तिमत्त्व विकासाला अधिक बळ मिळेल. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला.”
शाळेच्या विकासासाठी भविष्यातही मदतीची ग्वाही
‘मास’चे अध्यक्ष राजेंद्र मोहिते यांनी शाळेच्या विकासासाठी तसेच शाळेच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी भविष्यातही मदत करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. फाउंडेशनने दिलेला शब्द प्रत्यक्षात पूर्ण केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ननावरे यांनी संस्थापक सुहास राजेशिर्के यांचे आभार मानले.
ढोल-लेझीमच्या तालात पाहुण्यांचे स्वागत
सहायक पोलीस निरीक्षक बिल्ले कार्यक्रमस्थळी पोहोचताच शाळेतील विद्यार्थ्यांनी ढोल-लेझीम पथकाच्या तालात उत्साहपूर्ण स्वागत केले. विद्यार्थ्यांच्या पारंपरिक स्वागतामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनी पोलीस अधिकारीही झाले प्रभावित
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या कार्याबाबत मोठ्या उत्सुकतेने विविध प्रश्न विचारले. “सायबर क्राईम म्हणजे काय?”, “आपण पोलीस सेवेत कसे आलात?”, “पोलीस अधिकारी होण्यासाठी काय करावे लागते?”, “तुमच्यात कोणते सकारात्मक गुण आहेत?”, “मीही पोलीस बनण्यासाठी काय केले पाहिजे?” अशा प्रश्नांचा विद्यार्थ्यांनी भडिमार केला.
विद्यार्थ्यांची उत्सुकता पाहून उपस्थित मान्यवरही प्रभावित झाले. सहायक पोलीस निरीक्षक बिल्ले यांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला समर्पक उत्तरे देत त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला.
महिला पोलिसांचा विशेष सत्कार
यावेळी महिला पोलीस जयश्री सुतार आणि कावेरी साळुंखे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
चार महिन्यांच्या बॅकअपमुळे शाळेच्या सुरक्षेला अधिक बळ
महाराणी येसूबाई फाउंडेशनच्या वतीने शाळेत बसविण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा दर्जेदार असून, त्यामध्ये सुमारे चार महिन्यांपर्यंतचा बॅकअप उपलब्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले. त्यामुळे शाळेच्या परिसरातील हालचालींवर प्रभावीपणे लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसोबतच शाळेच्या मालमत्तेच्या संरक्षणासाठीही या यंत्रणेचा मोठा फायदा होणार आहे.
दानशूरपणा केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित न ठेवता समाजाच्या भावी पिढीची सुरक्षितता, शिक्षण आणि सर्वांगीण विकासासाठी त्याचा उपयोग करता येतो, याचे प्रेरणादायी उदाहरण महाराणी येसूबाई फाउंडेशनने संगममाहुली येथे घालून दिले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी उचललेले हे पाऊल निश्चितच इतर सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.





