सातारा:-लोकशाहीर अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त फुलली छत्रपतींची राजधानी.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
लोकशाहीर अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त फुलली छत्रपतींची राजधानी.
सातारा दि: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रामध्ये गावकुसाच्या बाहेर असणाऱ्या तरुणाला आपल्या लेखणीतून बलदंड नायक निर्मिती करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते . त्यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त आज सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांच्या प्रतिमा व पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. सर्वत्र अभिवादनाचे फलक तसेच व्याख्यान, मिरवणूक, साहित्यिक चर्चा सत्र, खाऊ वाटप, सत्कार समारंभ अशा भरगच्च कार्यक्रमाने छत्रपतींची राजधानी असलेली सातारा नगरी दिवसभर फुलून गेली होती.
सातारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,छत्रपती शिवाजी महाराज व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अनेक मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच युगपुरूष यांचा जयघोष केला. दलित, शोषित, कष्टकरी व पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यांचा सत्कार लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने शुभेच्छा वतीने करण्यात आला. या वेळेला जेष्ठ कार्यकर्ते पुंडलिक पाटोळे, जनार्दन घाडगे, रघुनाथ बाबर, किरण इंगळे, बंडू घाडगे , तानाजी घाडगे, दिलीप सावंत, चंद्रकांत खंडाईत, माया कांबळे,अमर गायकवाड, प्रदीप बोतालजी, राहुल गायकवाड, संजय नित्यनवरे, गौतम भोसले, किशोर गालफाडे, यांच्यासह युवराज कांबळे, गणेश भिसे,उमेश चव्हाण, आदित्य गायकवाड,डॉ. रमाकांत साठे, अमोल पाटोळे, उमेश खंडझोडे, चंद्रकांत कांबळे , मचींद्र जाधव , गणेश कारंडे, मिलिंद कांबळे, अमोल गंगावणे याचबरोबर विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही अभिवादन केले.
कार्यकर्त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १२३ वी जयंती उत्सव निमित्त अन्नदान, शैक्षणिक साहित्य व जिलेबी वाटप तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम केले. विविध संघटनेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याभोवती अभिवादनाचे फलक लावण्यात आले होते. अण्णाभाऊ साठे यांचे योगदान आज मोठ्या प्रमाणात सर्व समाजामध्ये रुजू झालेली आहेत. ही एक आनंदाची बाब ठरली आहे.
सामाजिक क्रांती साहित्यातून पेटवणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. जाती व्यवस्थेच्या चटक्याने ज्यांना अवघ्या दीड दिवस शाळेत शिक्षण मिळाले. पण, आपल्या लेखणीतून कष्टकरी, सर्वाहारा, उपेक्षित वर्गाच्या वेदना जगासमोर मांडणारे लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे १९३२ साली वडिलांसोबत मुंबईला आले. चरितार्थासाठी कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीशी गाठोडे घेऊन हिंडणे, मुंबईच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून नोकरी, अशी मिळतील ती कामे त्यांनी केली. मुंबईतील कम्युनिस्ट नेत्यांच्या नेतृत्त्वात सुरू असणाऱ्या चळवळीकडे अण्णाभाऊ आकर्षित झाले आणि पक्षाचे काम सुरू केले. कम्युनिस्ट पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ यांना शिक्षणासाठी सातत्याने प्रोत्साहित केले. त्याच्या परिणामी अण्णाभाऊ यांनी शिक्षण घेतले. त्यातून त्यांनी आपल्या सभोवतालचे वास्तव आपल्या लेखणीतून मांडले.
त्यांनी लिहिलेला ‘स्टालिनग्राडचा पोवाडा’ १९४३ साली पार्टी या मासिकात प्रसिद्ध झाला. त्यांनी १९४४ साली शाहीर अमर शेख आणि दत्ता गव्हाणकर यांच्या मदतीने ‘लाल बावटा’ कलापथक स्थापन केले. या कलापथकावर सरकारने बंदी घातली. ‘अमळनेरचे अमर हुतात्मे’ आणि ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या त्यांच्या काव्यरचना 1947 साली प्रसिद्ध झाल्या. ‘पंजाब-दिल्लीचा दंगा’ या रचनेत सर्व प्रागतिक शक्तींना एकत्र येऊन शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. अण्णा भाऊ साठे यांनी पोवाड्यात छक्कड हा प्रकार रुजवला.
पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे, असे ऐतिहासिक वक्तव्य त्यांनी १९५८ च्या दलित साहित्य संमेलनात काढले होते. इंडियन पीपल्स थिएटर अर्थात इप्टा या सांस्कृतिक संघटनेत अण्णा भाऊ साठे सक्रिय होते. या इप्टामध्ये बलराज सहानी आणि इतर अभिनेते सक्रीय होते. बलराज सहानी आणि अण्णा भाऊ साठे यांच्यात मैत्रीचे संबंध होते.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने आपला वेगळा ठसा उमटवला आहे. जिवंत काडतूस, आबी, खुळंवाडी, बरबाद्याकंजारी , चिरानगरची भुतं, कृष्णाकाठच्या कथा हे त्यांचे काही कथासंग्रह आहेत. तर, फकिरा , वारणेचा वाघ, चिखलातीलकमळ, रानगंगा, माकडीचा माळ , वैजयंता ह्यांसारख्या ३५ कादंबऱ्यांचे लेखन त्यांनी केले आहे. माझा रशियाचा प्रवास हे त्यांचे प्रवासवर्णन ही गाजले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या ७ कादंबऱ्यांवर चित्रपटांची निर्मिती झाली होती अशी माहिती विविध प्रकारच्या वक्त्यांनी जयंती साजरी करताना सांगितली.
—————————————————— फोटो – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यानजिक् अभिवादन व सत्कार करताना मान्यवर (छाया – निनाद जगताप, सातारा)