श्रीरामपूर:-कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ खरीप पीककर्ज द्या!
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूर:-कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ खरीप पीककर्ज द्या!

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेने अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून कर्जवाटपाला गती द्यावी – शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाची मागणी.
श्रीरामपूर / माळेवाडी (RPS स्टार न्यूज प्रतिनिधी) :
अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत कर्जमाफी झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तत्काळ बेबाकी प्रमाणपत्र देऊन नव्याने खरीप पीककर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच शासनाने निश्चित केलेल्या खरीप पीककर्ज वाटपाच्या मुदतीत पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, अशी मागणी शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष, अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक, श्रीरामपूरचे TDO श्री. शिवाजीराव पवार यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या अडचणींकडे लक्ष वेधले. तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था (AR), श्रीरामपूर श्री. नामदेव ठोंबळ यांनाही निवेदन देण्यात आले.
पीककर्ज वाटपाची गती वाढविण्याची मागणी
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अनेक शाखांना एका शाखेअंतर्गत चार ते पाच सेवा सोसायट्या संलग्न असल्याने कर्जप्रकरणे मंजूर करण्यासाठी वेळ लागत आहे. सध्या दिवसाला केवळ दोन-चार कर्जप्रकरणांना मंजुरी मिळत असल्याने पात्र शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज मिळण्यास विलंब होत असल्याचे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.
शासनाने खरीप पीककर्ज वाटपासाठी निश्चित केलेली ३१ ऑगस्टची मुदत लक्षात घेता, सध्याच्या गतीने कर्जवाटप सुरू राहिल्यास अनेक पात्र शेतकरी कर्जापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याची चिंता संघटनेने व्यक्त केली आहे.
त्यामुळे जिल्हा सहकारी बँकेच्या संबंधित शाखांना अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन कर्जप्रकरणे जलदगतीने निकाली काढावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
सेवा सोसायट्यांनी योग्य समन्वय साधावा
कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना आवश्यक ती कागदपत्रे व बेबाकी प्रमाणपत्र तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावे, तसेच सेवा सोसायट्यांनी जिल्हा बँकेशी योग्य समन्वय साधून पात्र शेतकऱ्यांचे खरीप पीककर्ज प्रस्ताव तातडीने पुढे पाठवावेत, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वेळेवर भांडवल उपलब्ध झाले नाही, तर त्याचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादनावर होऊ शकतो. त्यामुळे प्रशासन व बँक यंत्रणेने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून कर्जवाटपाची प्रक्रिया युद्धपातळीवर राबवावी, अशी भूमिका शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाने मांडली आहे.
निवेदनावर शेतकरी व पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या
या निवेदनावर शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष नीलेश शेडगे, उपाध्यक्ष नवनाथ दिघे, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष प्रकाश जाधव, युवा आघाडीचे मयूर भनगडे, महिला आघाडी प्रमुख सुनिताताई वानखेडे, बाळासाहेब घोगरे, मधू काकड, श्रीराम त्रिवेदी यांच्यासह अनेक कर्जदार शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





