शिरवळ:-खंडाळ्याच्या दुष्काळी भागात सफरचंद लागवडीची किमया.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
खंडाळ्याच्या दुष्काळी भागात सफरचंद लागवडीची किमया.
शिरवळ दि: पावसाचे प्रमाण अल्प असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका हा दुष्काळी म्हणून परिचित होता. परंतु ,या ठिकाणी औद्योगिक वसाहत व जलसिंचन योजनेच्या माध्यमातून कालवे निघाल्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान बदलू लागलेले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मिरजे ता. खंडाळा येथील प्रगतशील शेतकरी श्री .अशोक सोनवणे यांच्या कल्पक बुद्धीतून सध्या हरीमन ९९ जातीच्या सफरचंदाची लागवड झाली असून या अर्धा एकर क्षेत्रामध्ये दीडशे सफरचंदाच्या झाडाला लाल सफरचंद लागल्यामुळे खऱ्या अर्थाने शेतीमध्ये नवीन प्रयोग सुरू झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.
याबाबत माहिती अशी की ,सातारा जिल्ह्यातील मिरजे ता .खंडाळा या गावानजिक असलेल्या पाझर तलावा पलीकडे रस्त्यालगत श्री. सोनवणे यांच्या मालकीची पाच एकर पडीक जमीन होती. या पडीक जमिनीवर उगवत नव्हते. परंतु सेलटॅक्स अधिकारी म्हणून पाच वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर श्री. अशोक सोनवणे यांनी आपली जन्मभूमी कर्मभूमीमध्येच सेवानिवृत्ती घालवण्यासाठी शेतीकडे लक्ष दिले. प्रारंभी या पाच एकर पडीक रानांमध्ये जमीन सपाटीकरण ते दगड गोटे बाजूला काढून त्याच्यामध्ये माती टाकून चांगल्या पद्धतीने जमीन तयार केली.
या जमिनीवर त्यांनी विविध फळांची लागवड केली. त्याचबरोबर नगदी पीक म्हणून समजले जाणाऱ्या उसाची लागवड केली. त्यानंतर त्यांना शिरवळ येथे एका शेतीविषयक झालेल्या प्रदर्शन व विक्री मध्ये त्यांचे लक्ष वेधून घेतले ते सफरचंदाच्या रोपाने. या रोपांची लागवड आपल्या जमिनीमध्ये लावली तर जगतील का? हा नकारात्मक विचार बाजूला ठेवून त्यांनी सकारात्मक दृष्ट्या त्यांनी त्या रोपांकडे पाहिले आणि विक्रीतून शिल्लक असलेली सर्व रोपे त्यांनी विकत घेतली. त्यानंतर इंटरनेटचा वापर करून तसेच शेती विषयक माहिती असलेले औरंगाबादचे तज्ञ मंडळी अंकुश कोरडे यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी अर्ध्या एकर रानामध्ये सफरचंद लागवड केली. आज या उजाडमाळ रानावर बाग फुलवली आहे.
प्रगतशील शेतकरी श्री अशोक सोनवणे यांनी विक्रीकर अधिकारी म्हणून प्रामाणिकपणे सेवा केली . डिसेंबर २०१८ साली सेवानिवृत्तीनंतर त्यांनी जपान देशाचा दौरा केला.त्यानंतर शेतीकडे त्यांनी लक्ष केंद्रित केले असून मिरजे गावाच्या नजीक असलेल्या या क्षेत्रामध्ये आता हिरवा शालू नसल्यासारखे हिरवळ निर्माण झालेली आहे. खऱ्या अर्थाने येथील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या या शेतीच्या प्रयोगाला अनेक जण भेटी देत आहेत. जावली तालुक्यातील वहागाव येथून महू – हातगेघर धरणामुळे पुनर्वसित झालेले ॲड.प्राध्यापक विलास वहागावकर तसेच व्यावसायिक फोटोग्राफर निनाद जगताप यांनी नुकतीच मिरजे येथे भेट दिली. काश्मीर या ठिकाणी सफरचंदाच्या बागा आहेत हे लहानपणी ऐकले होते. पाहिले होते. परंतु, दुष्काळी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील सफरचंदाची भाग पाहून त्यांना शेतीतील बदल जाणवू लागलेला आहे.
ज्यावेळी दर घसरतात त्यावेळेला रस्त्यावर टोमॅटो फेकली जातात त्यावेळेला कुणीही त्याबद्दल मत व्यक्त करत नाही. परंतु, टोमॅटोचे दर वाढले की अनेक लोकांच्या भुवया उंचावल्या जातात. सेलिब्रिटी सुद्धा आपले मत व्यक्त करतात. कीर्तन भजनातूनही टोमॅटो चा उल्लेख होतो .परंतु आता श्रीमंतांचे खाना म्हणून प्रसिद्ध असलेल्या सफरचंदाची बाग आता दुष्काळी भागात उभी राहिल्यामुळे या सफरचंदाला जागतिक बाजारपेठेतही नक्कीच मागणी वाढेल. अशी आशा व्यक्त केली जात आहे. पहिल्या वर्षी कोणते ही पीक न घेता पुढील वर्षी हे सफरचंद बाजारपेठेत येणार आहे. अशी माहिती देण्यात आली. अत्यंत परिसरामध्ये या ठिकाणी शेतीमध्ये उभे राहिल्यानंतर खऱ्या अर्थाने मानसिक समाधान वाटते तसेच शारीरिक थकवा निघून जातो. त्यामुळे श्री. सोनवणे यांनी केलेल्या परिश्रमाचे चीज झाल्याचे पहाण्यास मिळेल.
—–&——————————————————-
फोटो – मिरजे,खंडाळा येथील सफरचंद बागेची पाहणी करताना श्री शेतकरी श्री सोनवणे व उत्सुकते पोटे पाहणारे पर्यटक( छाया- अजित जगताप सातारा)