रत्नागिरी:-कालबाह्य न झालेले जगातील एकमेव विज्ञान म्हणजे ज्योतिष:-ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार !
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख:9890318605

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख
कालबाह्य न झालेले जगातील एकमेव विज्ञान म्हणजे ज्योतिष:-ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार !
मायणी प्रतिनिधी
“ज्योतिष हेच जगातील पहिले व आजतागायत कालबाह्य न झालेले विज्ञान आहे,” असे ठासुन सांगत, ज्योतिष तंत्र कालसुसंगत आजमाविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार यांनी सालाबादप्रमाणे श्री चैतन्य ज्योतिष संशोधन विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या ७ व्या ज्योतिष संमेलनामध्ये रत्नागिरी येथे केले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रत्नागिरीतील श्री चैतन्य ज्योतिष संशोधन विद्यापीठातर्फे दरवर्षी पदवीदान समारंभासह आजीव सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला जातो. यासह यावर्षी डॅा. विवा साठे लिखित “मुखवटे व चेहरा” या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. तसेच ज्योतिष विषयामध्ये वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आली.
यावेळी वेदांताचे गाढे अभ्यासक व चैतन्य ज्योतिष संशोधन विद्यापीठाचे कुलगुरु, योगीराज आश्रमाचे सर्वेसर्वा विद्यावाचस्पती डॅा विजयशास्त्री संगमुळ्ये यांनी विद्यापीठाच्या बांधकामास लागणारे सर्व स्टील व सव्वा लक्ष देणगीची हमी देत, ज्योतिष संशोधनासह आध्यात्मावर विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.
अनेक विद्यार्थ्यांनी प्रेमयोग, शिक्षणयोग, व्यवसाय व नोकरीयोग, कपाळावरील रेषा, डोळ्यांवरुन भविष्य, लग्नेशाचे फलित, मंगळाचे स्थानीय महत्व , आदि अनेक विषयांवर महत्वपुर्ण व्याख्याने देऊन ज्योतिष रसिकांची मने आपल्या सुश्राव्य वाणीने जिंकून घेतली, हे विशेष!
आध्यात्मिक गुरु प्रिया मालवणकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत डॅा विवा साठे लिखित “मुखवटे व चेहरे” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. “मुद्राशास्त्रातील आदर्श व विषयाकींत असलेले एकमेवाद्वितीय पुस्तक आहे” असे प्रतिपादन पुस्तक प्रकाशन प्रसंगी प्रिया मालवणकर यांनी केले. लिखाणाची धाटणी व पुस्तकाची बांधणी उत्तम असल्याची प्रतिक्रिया देत, विद्यावाचस्पती डॅा. विजयशास्री संगमुळ्ये यांनी पुस्तकाच्या लेखिका विवा साठे यांना शुभाशिर्वाद दिले व योगेश्वरी मुळे हिने नर्मदा अष्टक म्हटले! पुस्तक प्रकाशन समारंभ प्रसंगी लेखिकेचे पिताश्री डॅा प्रसन्न मुळे हे भावनाविवश झाले. त्यांनी पुस्तकाचा प्रेरणादायी व दगदगयुक्त प्रवास कथित करुन, विद्यार्थ्यांना लेखनाची प्रेरणा दिली.
विद्यापीठाच्या आजीव सदस्यांना रजतमुद्रा प्रदान करण्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन साहित्यिक संपादक राधेश बादले पाटील यांनी प्रबोधन करित, “ज्योतिषांनी एकमेकांवर टिका न करता, ज्योतिष संशोधन करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करित, ज्योतिषशास्त्रातील एकाएका विषयाचे विशेषज्ञ निर्माण करण्याची गरज नमुद केली.” तसेच ज्योतिषी स्वत: अर्थसंपन्न होण्याची आवश्यकता प्रदर्शित करुन विद्यावाचस्पती डॅा प्रसन्न मुळ्ये यांच्या कार्याचा गौरव करित, विद्यावाचस्पती डॅा विजयशास्त्री संगमुळ्ये यांच्या विद्यापीठाच्या प्रेरणेला अनुमोदन देत चालना दिली.
या कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी, “सर्व ज्योतिष विद्यापीठांचा व विद्यालयांचा अभ्यासक्रम एकच असावा, तसेच पुणे विद्यापीठाचा ज्योतिष संशोधनाला येत असलेला निधी वापरण्यात यावा” अशी अपेक्षा ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार यांनी व्यक्त केली.
राष्ट्रपती भवनातील आयपीएस अधिकारी किरण तावडे यांनी “भीती न बाळगता संभाषण कौशल्य आत्मसात करण्याचे” विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी चैतन्य ज्योतिष संशोधन विद्यापीठाचे कुलपती डॅा प्रसन्न मुळ्ये व कुलगुरु डॅा. विजयशास्त्री संगमुळ्ये यांचेसह वराहमिहीर ज्योतिष विद्यापीठाचे कुलपती डॅा नंदकिशोर जकातदार, साहित्यिक संपादक राधेश बादले पाटील, आध्यात्मिक गुरु प्रिया मालवणकर, संमेलन अध्यक्षा ॲड. डॅा. मालतीताई शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ७ ज्योतिष संमेलन संपन्न झाले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व निवेदन सुप्रिया भारस्वाडकर, उमा जोशी, विवा साठे, यांनी प्रभावशाली केले.
संमेलन अतिशय सुसुत्रताबध्द व दैदिप्यमान झाल्याची भावना प्रत्येकाच्या मुखकमलावर प्रसन्नतेच्या छटेसह जाणवत होती, हे विशेष!
नंदकिशोर जकातदार बोलत असताना.