ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मुंबई:-युवा नेते कृषीकांत शिंदे यांच्या सेना प्रवेशाने मुख्यमंत्री शिंदे यांचे हात बळकट.

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अजित जगताप सातारा

युवा नेते कृषीकांत शिंदे यांच्या सेना प्रवेशाने मुख्यमंत्री शिंदे यांचे हात बळकट.

मुंबई दि: माथाडींचे आराध्य दैवत अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या माथाडी चळवळी मधून पुढे आलेले जावळीच्या हुमगाव येथील शिंदे बंधूंनी राजकारणातही दबदबा निर्माण केला . खऱ्या अर्थाने १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यानंतर मुंबई शहरातील माझगाव या ठिकाणी बी आय टी चाळीत राहत असलेल्या शिंदे बंधूंना राजकारणामध्ये चांगली संधी मिळाली. पहिल्याच प्रयत्नात जावळीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार म्हणून शशिकांत शिंदे यांनी यश संपादन केले. त्यानंतर कोरेगाव मतदार संघातही ते दोनदा आमदार झाले. एकदा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ही झाले. या त्यांच्या यशाच्या चढत्या आलेखात थोरले बंधू ऋषिकांत शिंदे यांचाही सिंहाचा वाटा होता. माथाडी कामगार चळवळीचे केंद्रबिंदू अण्णासाहेब पाटील ,शिवाजीराव पाटील, संभाजीराव पाटील, नरेंद्र पाटील व अनेक मातब्बर मंडळींच्या सहवासात दोन बंधूंची चढती कमान पाहण्यास मिळाली.
कालांतराने शिवसेनेचे उमेदवार म्हणून सातारा लोकसभा मतदारसंघासाठी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील उभे राहिले. यावेळी पक्षीय धैर्य धोरण व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ठेवलेला विश्वास संपादन करण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. छ. खा. उदयनराजे भोसले यांचा प्रचार करून त्यांचे मताधिक्य वाढवण्यासाठी प्रयत्न केले .त्यातूनच मग पाटील व शिंदे बंधूंमध्ये राजकीय दुरावा निर्माण झाला.
कोरेगाव मतदार संघात शिवसेना पक्षाच्या चिन्हावर भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते महेश शिंदे यांनी निवडणूक लढवली. या वेळेला नरेंद्र पाटील उदयनराजे भोसले व इतरांनी महेश शिंदे यांचा प्रचार करून त्यांना निवडून आणले. या राजकीय घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही मदत केली होती. त्यामुळे दोन्हीही शिंदे बंधूं अस्वस्थ झाले होते. त्यात घणसोली येथील माथाडी कामगारांच्या गृहनिर्माण संस्थेच्या निवडणुकीत ऋषिकांत शिंदे यांनी साम दाम दंड भेद निती मध्ये काकणभर सरस भूमिका घेतली. नरेंद्र पाटील व आमदार गणेश नाईक यांच्या पॅनेलचा पराभव केला तेव्हापासूनच एकनाथ शिंदे यांच्याशी त्यांचा संपर्क वाढला. दोघेही मूळचे जावली- महाबळेश्वर तालुक्यातील असल्यामुळे त्यांच्या गाठीभेटी होत होत्या. पण राजकीय चर्चा होत नव्हती. भाजप व शिंदे गटाची सत्ता असली तरी शिंदे गटाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद मर्यादित ठेवण्यामध्ये भाजपने हित पाहिले . आता काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपला गट बांधणीस जोमाने सुरुवात केली आहे . मुंबई शहरातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर विजय नाहटा, विजय चौगुले व मान्यवरांच्या उपस्थितीत ऋषी कांत शिंदे यांनी शिंदे यांच्या शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केला. यावेळी मोठ्या प्रमाणात जयघोष करण्यात आला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , धर्मवीर आनंद दिघे यांच्या मुशीतून तयार झालेले एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यात शंभूराज देसाई यांच्यासारख्या शिलेदारांच्या हाती सातारा जिल्ह्यातील सूत्र दिली आहे. आता जावली खोऱ्यामध्ये ऋषिकांत शिंदे यांची साथ लाभल्यामुळे भाजप व राष्ट्रवादीला अंतर्मुख होण्याची वेळ आलेली आहे. आमदार शशिकांत शिंदे यांचे थोरले बंधू असलेले ऋषिकांत शिंदे तरुणाई मध्ये लोकप्रिय आहेत. डॅशिंग व्यक्तिमत्व असल्याने ऋषीभाई म्हणून ते परिचित आहेत .माथाडी कामगार सोबतच अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये ते अनेकांना नेहमी सहकार्य करत असतात. त्यामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे.
नवी मुंबई येथील होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणूक तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत जास्त नाही पण किमान ५० नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता ऋषीकांत शिंदे व मित्र परिवाराकडे निश्चितच आहे. त्या अर्थाने एकनाथ शिंदे यांनी ऋषिकांत शिंदे यांना आपल्याकडे खेचून पुन्हा एकदा त्यांच्यातील शिवसैनिकाला जागे केले आहे. माझगाव येथे राहत असताना शिवसेनेची आकर्षित झालेले शिंदे कुटुंबीय आता खऱ्या अर्थाने राजकीय पक्षात विखुरले गेलेले आहेत .परंतु कौटुंबिक हितसंबंध त्यांनी आजही जपलेले आहेत
आमदार शशिकांत शिंदे यांचे पुत्र तेजस शिंदे हे राष्ट्रवादीचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष होते. त्याच पद्धतीने ऋषिकांत शिंदे यांचे चिरंजीव सौरभ शिंदे हे सुद्धा राजकारणात पुढे येण्यासाठी धडपड करत आहेत. त्यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे गटाने जागा करून ठेवली आहे. त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल. या अर्थाने ऋषिकांत शिंदे यांनी घेतलेला निर्णय योग्य व अचूक ठरवण्यासाठी त्यांना आता शिंदे गटात सक्रिय होऊन आपली युक्ती व शक्ती दाखवली पाहिजे. तर त्यांचा हा पक्ष प्रवेश राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे.
एकूणच जावली महाबळेश्वर व सातारा जिल्ह्यात ऋषीकांत शिंदे यांच्या निर्णयामुळे कोरेगाव मतदार संघात भविष्यात ते पक्ष प्रेम की बंधुप्रेम ? दाखवतील याची आतापासूनच चर्चा सुरू झालेली आहे. जावळीतील सातारा जिल्हा परिषद कुडाळ गटात काही वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ऋषीकांत शिंदे यांचा दिपक पवार यांनी पराभव केला होता. आता राजकीय दृष्ट्या अनेक बदल झाले आहेत. त्याचा कितपत फायदा ऋषीकांत शिंदे यांना होईल. हे काळच ठरवेल.

—————————————————-+——

फोटो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यात व गटात प्रवेश करताना ऋषीकांत शिंदे (छाया – अजित जगताप, मुंबई)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button