पुणे:-सिताराम थोपटे भाजीमंडई घेत आहे “अखेरचा श्वास”.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण.
सिताराम थोपटे भाजीमंडई
घेत आहे “अखेरचा श्वास”.
पुणे, दि. 28 (शफिक शेख):- पुण्यातील नरपतगीर चौकातील शाहू उद्यानाशेजारील सुमारे 50 वर्षांपूर्वीची गजबजलेली आणि खूप जुनी अशी सिताराम थोपटे भाजीमंडई ही अखेरचा श्वास घेत आहे.
1970 च्या आसपास स्थापन झालेल्या या सिताराम थोपटे भाजीमंडईमध्ये सोमवार पेठ, रास्ता पेठ, काळावाडा, केईएम हॉस्पिटलमागील भाग अगदी नाना पेठेतूनही गृहिणी, पुरूष मंडळी आणि बालकेसुद्धा भाजीपाला, फळे आणि इतर अनेक आवश्यक वस्तू खरेदी करण्यातसाठी येत असत. सकाळी 6:00 वाजल्यापासून ते सायंकाळी 5:00 वाजेपर्यंत ही भाजीमंडई सुरू असते. या भाजीमंडईसोबत अनेक जुन्या आठवणी या येथील नागरिकांशी निगडीत आहेत. याला चिटकूनच संत गाडगेबाबा धर्मशाळा असल्याने त्यामध्ये राहणा-या लोकांनाही ही अत्यंत आपुलकीची अशी मंडई होती. जणू ही भाजीमंडई नाही तर एक वारसा म्हणून जपली जात होती. ग्राहकांनी नेहमीच भरगच्च असलेली ही भाजीमंडई या परिसराच्या जीवंत असल्याचे उदाहरण देत होती.
परंतु कालांतराने आज परिस्थिती उलट आहे. आज येथे ग्राहकांची वानवा आहे. याला अनेक कारणे आहेत. येथील भाजीविक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार घरोघरी पोहोचणारे भाजीचे टेम्पो, या मंडईच्या आसपास वाढलेल्या इतर छोटया-छोटया मंडई, ग्राहकांची वाढलेल्या अपेक्षा आणि महागाई यामुळे या मंडईमध्ये ग्राहकांचे येईनासे झाले आहे. येथे भाजीविक्रेत्यांना त्यांच्या कुटुंबाचे पालनपोषणही करण्याइतपत व्यवसाय होत नसल्याचे येथील भाजीव्यावसायिक यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील भाजीविक्रेत्यांपैकी अर्धेही भाजीविक्रेते उरले नाहीत. अशाच काही भाजीविक्रेत्यांशी आमच्या प्रतिनिधींनी साधलेला संवाद –
“दोन वेळचे जेवणही मिळणे मुश्कील”- शेख दाम्पत्य
या मंडईमधील सर्वात जुने आने वयस्कर असे चॉंद शेख आणि मुमताज शेख हे दाम्पत्य जेव्हा मंडई सुरू झाली तेव्हापासून येथे भाजीविक्रीचा व्यवसाय करीत होते. परंतु आता जेव्हढयाचा माल आणला आहे तेवढे पैसे निघणेही मुश्कील झाले होते. त्यामुळे एवढया जुन्या दाम्पत्यानेही भाजीमंडई सोडून दुसरीकडे कुठे व्यवसाय करणे पत्करले.
“नागरिकांनी आपला वारसा जपणे गरजेचे” – शंकर मामा
येथील आणखी एक जुने भाजीविक्रेते शंकर मामा यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, ही भाजीमंडई सुमारे 50 वर्षांपासूनही अधिक जुनी आहे. ही आपली धरोहर आहे. परंतु ही आता नष्ट होत चालली आहे. येथील नागरिकांना आणि इतर परिसरातील नागरिकांनीही ही धरोहर जपण्याची आवश्यकता आहे.
“आमच्यासाठी ही मंडई म्हणजे आमचे घरच” – शाहीद शेख
येथील तरूण भाजीविक्रते शाहीद शेख यांनी सांगितले की त्यांच्या वाड-वडिलांपासून ते येथे व्यवसाय करीत आहेत. त्यांना येथेच व्यवसाय करावयाचा आहे. परंतु अशा बिकट परिस्थितीमुळे त्यांनाही दुसरीकडे मार्ग शोधावा लागत आहे.
तसेच येथील इतर भाजीविक्रेते विष्णू चौधरी, शहनाज शेख, शशी मामा, स्वामी काका, धनराज तालीकोटी, सुनील मामा, अनील मामा अशा अनेक भाजीव्यवसायिकांना अजूनही या परिसरातील नागरिकांवर पूर्ण विश्वास आहे की ते पुन्हा भाजी खरेदीसाठी या मंडईत येतील आणि ही मंडई पुन्हा पूर्वीप्रमाणे बहरून येईल.