वाई शहरात टाऊन प्लॅनिंगचा बोजवारा; नियम पायदळी तुडवून बांधकामांना वेग, पालिका प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष की लाचारी?
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई शहरात टाऊन प्लॅनिंगचा बोजवारा; नियम पायदळी तुडवून बांधकामांना वेग, पालिका प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष की लाचारी?

सातारा | वाई प्रतिनिधी
वाई नगरपरिषद हद्दीत गेल्या काही वर्षांपासून नगररचना (टाऊन प्लॅनिंग) नियमांना हरताळ फासत मोठ्या प्रमाणावर अनधिकृत व नियमबाह्य बांधकामे सुरू असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. शहराचा नियोजित विकास करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या नगररचना नियमांची उघडपणे पायमल्ली होत असताना वाई नगरपरिषदेचा नगररचना व बांधकाम विभाग मात्र जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याची भावना नागरिकांमध्ये तीव्र झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासन भूमाफियांपुढे हतबल झाले आहे की ‘अर्थपूर्ण’ मौन बाळगत आहे, असा संतप्त सवाल वाईकर उपस्थित करत आहेत.
शहराच्या सुनियोजित विकासासाठी फ्रंट मार्जिन, साईड मार्जिन, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, रस्त्याची आवश्यक रुंदी, तसेच इतर बांधकाम नियमांचे पालन करणे बंधनकारक असते. मात्र वाई शहरातील अनेक नवीन व्यावसायिक संकुले तसेच निवासी इमारतींमध्ये या नियमांना अक्षरशः केराची टोपली दाखविण्यात आल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी तर रस्ते, नाले आणि सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करून मनमानी पद्धतीने बांधकामे उभी करण्यात आली असून काही ठिकाणी ही कामे अद्यापही सुरू आहेत.
या अनधिकृत बांधकामांविरोधात स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी वेळोवेळी पुराव्यांसह तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र नगरपरिषद केवळ नोटिसा बजावण्यापुरतीच मर्यादित राहिल्याचा आरोप होत आहे. प्रत्यक्षात जागेवर जाऊन कारवाई का होत नाही? नियमबाह्य बांधकामांवर हातोडा का चालवला जात नाही? अशा प्रश्नांची उत्तरे प्रशासनाकडे नसल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे काही लोकप्रतिनिधींची नावेही अशा बांधकामांशी जोडली जात असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे.
अनधिकृत बांधकामांचा सर्वाधिक फटका वाहतूक व्यवस्थेला बसत आहे. अनेक इमारतींमध्ये पार्किंगची सुविधा नसल्याने वाहनधारकांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागत आहेत. परिणामी शहरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय ड्रेनेज व्यवस्था, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सेवांवरही ताण वाढत असून शहराचे विद्रूपीकरण होत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.
वाई शहरातील वाढत्या अनधिकृत बांधकामांची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी, संबंधित कर्मचारी तसेच नियमबाह्य व विनापरवाना बांधकाम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय व नगरविकास विभागाकडे केली आहे. अन्यथा भविष्यात जनआंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे.
वाईकरांचा सवाल…
“नगररचनेचे नियम सर्वसामान्यांसाठीच आहेत का? नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार का?”




