शिर्डी:-“युवा शक्तीने नशामुक्त भारताचा संकल्प पूर्ण करावा; ‘युवा शक्ती जागर’ यात्रेतून राज्यभर जनजागृती – ना. राधाकृष्ण विखे पाटील”
पत्रकार आदिनाथ कडू अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिर्डी:-“युवा शक्तीने नशामुक्त भारताचा संकल्प पूर्ण करावा; ‘युवा शक्ती जागर’ यात्रेतून राज्यभर जनजागृती – ना. राधाकृष्ण विखे पाटील”

शिर्डी | प्रतिनिधी | दि. २७
देशाला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या मोहिमेत भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो) सक्रिय सहभाग घ्यावा आणि “युवा शक्ती जागर” यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील युवकांमध्ये नशामुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णकांत महाडीक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या “युवा शक्ती जागर” यात्रेचे शुक्रवारी शिर्डीत आगमन झाले. यानिमित्त आयोजित युवा मेळाव्यात युवक कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील बोलत होते.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, सरचिटणीस अशोक पवार, भाजयुमो उत्तर जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, नगराध्यक्षा जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, शहराध्यक्ष रविंद्र गोंदकर यांच्यासह उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजप व भाजयुमोचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशाला नक्षलवादमुक्त करण्यासाठी प्रभावी मोहीम राबविली असून, आता अमली पदार्थमुक्त भारत घडविण्यासाठी व्यापक अभियान सुरू केले आहे. अमली पदार्थांचे रॅकेट देशाच्या सामाजिक व्यवस्थेला मोठा धोका निर्माण करीत असल्याने या विरोधातील लढा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे विखे पाटील यांनी नमूद केले. युवकांमध्ये जाऊन प्रबोधन करण्याची जबाबदारी भाजयुमोने स्वीकारावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
भारत हा जगातील सर्वात युवा देश असून देशाच्या विकासात तरुणांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मागील बारा वर्षांत स्टार्टअप, मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडियासारख्या उपक्रमांतून युवकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या आहेत. देशाची युवा शक्ती ही बुद्धिमत्ता आणि ऊर्जेचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग गुंतवणूक होत असून त्याचा सर्वाधिक लाभ युवकांनाच मिळणार आहे. अहिल्यानगर जिल्हा संरक्षण (डिफेन्स) उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र बनत असून आत्मनिर्भर भारत अभियानामुळे उद्योग क्षेत्रात नव्या संधी निर्माण होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची महत्त्वाची जबाबदारी भाजयुमोवर आहे. समाजात सरकारची विकासकामे प्रभावीपणे मांडण्यात कमी पडल्यामुळे काही प्रवृत्ती युवकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात; मात्र अशा प्रवृत्तींना जनाधार नसल्याचेही विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले.
भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष कृष्णकांत महाडीक यांनी यात्रेमागील उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, राज्यातील तरुणांना राष्ट्रवादी विचारांच्या प्रवाहात जोडण्याबरोबरच महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा समजावून सांगणे तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती युवकांपर्यंत पोहोचविणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजयुमो उत्तर जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी यांनी केले.




