वाई नगरपरिषदेत प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड; सभेत नगरसेवकांचा संताप.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई नगरपरिषदेत प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड; सभेत नगरसेवकांचा संताप.

मुख्याधिकाऱ्यांच्या अरेरावीवर, अधिकाऱ्यांच्या मनमानीवर चौफेर हल्लाबोल; सर्वसाधारण सभेत तीव्र नाराजी.
वाई, दि. २६ : वाई नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. २५) पार पडली. या सभेत प्रशासनाच्या कामकाजावर, अधिकाऱ्यांच्या शिस्तीवर आणि विकासकामांच्या अंमलबजावणीवर नगरसेवकांनी जोरदार नाराजी व्यक्त केली. नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी अधिकाऱ्यांना नियमपालनाबाबत थेट जाब विचारत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर कठोर शब्दांत टीका केली.
सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक अजित शिंदे यांनी प्रशासनाकडून नगरसेवकांना आवश्यक माहिती दिली जात नसल्याचा आरोप केला. यावेळी त्यांच्यासह नगरसेवक शैलेंद्र देवकुळे आणि नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्यात शाब्दिक वाद झाला. नगराध्यक्षांनी हस्तक्षेप करून हा विषय शांत केला.
प्रभाग क्रमांक ७ व ८ मधील विकासकामांवरून संबंधित नगरसेवकांमध्ये वाद निर्माण झाला. अखेरीस नगरसेवक भारत खामकर यांनी मध्यस्थी करत प्रत्येक नगरसेवकाने आपल्या प्रभागातील कामांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
सभेला राष्ट्रवादी (अजित पवार गट) चे गटनेते संग्राम पवार यांच्यासह काही नगरसेवक तसेच भाजपाचे तीन नगरसेवक अनुपस्थित होते. त्यांच्या गैरहजेरीची सभागृहात चर्चा रंगली.
नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी, कार्यालयीन वेळ आणि हालचाल नोंदवहीबाबत प्रश्न विचारले. मात्र कोणत्याही अधिकाऱ्याला समाधानकारक उत्तर देता आले नाही. मुख्याधिकारी सलग दोन दिवस दुपारपर्यंत कार्यालयात अनुपस्थित असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.
मुख्याधिकाऱ्यांनी “माझा कार्यकाळ संपला आहे, कार्यक्षम अधिकारी आणा,” असे उत्तर दिल्याने लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. तसेच शहराला दिवसातून दोन ते चार वेळा पाणीपुरवठा होत असल्याचा त्यांचा दावा अनेक नगरसेवकांनी वास्तवाशी विसंगत असल्याचे सांगितले.
नगराध्यक्षांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावरही गंभीर प्रश्न उपस्थित करत काही कर्मचाऱ्यांवर हॉटेलमधील कचरा उचलण्याच्या बदल्यात गैरप्रकार होत असल्याचा आरोप केला. प्रशासनातील शिस्तभंग आणि दप्तर दिरंगाईमुळे नगरपरिषदेचे आर्थिक नुकसान झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून त्याची वसुली केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सभेत एकूण १७७ विषयांवर चर्चा झाली. काही विषयांना मंजुरी देण्यात आली, तर काही पुढील सभेसाठी तहकूब करण्यात आले. दरम्यान, संपूर्ण सभेत उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के यांनी कोणतीही भूमिका न मांडल्याने त्यांच्या मौनाचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.
एकंदरीत, या सभेतून नगरपरिषदेच्या प्रशासनाविषयी लोकप्रतिनिधींची तीव्र नाराजी समोर आली असून, येत्या काळात प्रशासनाच्या कामकाजात सुधारणा होते का, याकडे वाईकरांचे लक्ष लागले आहे.




