वाई:-धक्कादायक! वैकुंठ रथावरून ग्रामसभेत खळबळ; अध्यक्षांवर पैसे उकळल्याचा आरोप, चौकशीची जोरदार मागणी.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्राण्याचे चव्हाण – 8208717483

1) वाई:-धक्कादायक! वैकुंठ रथावरून ग्रामसभेत खळबळ; अध्यक्षांवर पैसे उकळल्याचा आरोप, चौकशीची जोरदार मागणी.

सातारा
वाई, दि. ३१ : उडतरे (ता. वाई) येथील विशेष ग्रामसभा वैकुंठ रथाच्या मुद्द्यावरून चांगलीच गाजली. ‘उत्तरा ज्येष्ठ नागरिक संघा’चे अध्यक्ष प्रवीण बाबर यांच्याविरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, वैकुंठ रथ वापरण्यासाठी मृतांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतल्याचा तसेच संघटनेच्या खुर्च्या भाड्याने देऊन आर्थिक गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप केला.
ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सभेत ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य व वैकुंठ रथाचे प्राथमिक वर्गणीदार शंकरराव पवार (पाटील) यांनी हा मुद्दा उपस्थित करत थेट अध्यक्ष प्रवीण बाबर यांच्यावर निशाणा साधला. “लोकवर्गणीतून उभारलेल्या वैकुंठ रथाचा वापर करण्यासाठी दुःखी कुटुंबांकडून पैसे घेतले जातात,” असा आरोप त्यांनी केला.
या आरोपानंतर सभागृहात एकच खळबळ उडाली. अनेक ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवरांनीही बाबर यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली. वैकुंठ रथाबरोबरच संघाने खरेदी केलेल्या खुर्च्या खासगी कार्यक्रमांसाठी भाड्याने देण्यात येतात आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांचा हिशोब स्पष्ट नसल्याचा आरोपही करण्यात आला.
ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करत, वैकुंठ रथ ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावा अशी भूमिका मांडली. तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील सार्वजनिक करण्याची मागणीही करण्यात आली.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आणि नागरिकांच्या वर्गणीतून हा वैकुंठ रथ उभारण्यात आला होता. मात्र त्याचा कथित व्यावसायिक वापर होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
या वादळी ग्रामसभेला सरपंच अर्चना पवार, उपसरपंच प्रकाश पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रतापराव पवार, तुकाराम पवार, सुरेश पवार, मोहन पवार, विलास बाबर, प्रदीप बाबर, मारुती पवार, सचिन पवार, रमेश पवार, राहुल शिंदे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, ग्रामसभेत करण्यात आलेले आरोप संबंधित व्यक्तींनी फेटाळलेले किंवा त्यावर अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, या प्रकरणातील सत्यता चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.
2) पाचवडजवळचा गतिरोधक की मृत्यूचा सापळा? प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात!

हायवे-सर्व्हिस रोडवरील गोंधळ वाढला; ना फलक, ना रिफ्लेक्टर्स, मोठ्या अपघाताची भीती.
सातारा |
पाचवड, दि. ३१ : पाचवड नजीक राष्ट्रीय महामार्गालगत उडतारे–पाचवड सर्व्हिस रोडवर बसविण्यात आलेला गतिरोधक आणि वाहतुकीचे नियोजन नसल्याने हा परिसर आता वाहनचालकांसाठी अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. चुकीच्या तांत्रिक रचनेमुळे आणि सूचना फलकांच्या अभावामुळे दररोज अपघाताची शक्यता निर्माण होत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल वाहनचालक व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महामार्गावरून वेगाने सर्व्हिस रोडवर येणारी वाहने आणि पाचवडकडून उडतारेच्या दिशेने जाणारी वाहने एकाच ठिकाणी समोरासमोर येत असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे. वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याने चालकांचा गोंधळ उडत असून अनेकदा अपघाताचे प्रसंग थोडक्यात टळत आहेत.
विशेष म्हणजे, या मार्गावर ‘वन वे’, ‘राँग वे’, ‘स्लो डाउन’ यांसारखे अत्यावश्यक सूचना फलकच नसल्याने बाहेरगावाहून येणारे चालक चुकीच्या दिशेने वाहन चालवतात. परिणामी समोरासमोर वाहन येण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.
रात्रीची परिस्थिती तर अधिक भयावह आहे. अपुरी प्रकाश व्यवस्था, गतिरोधकावर रिफ्लेक्टर्सचा अभाव आणि रस्त्यावर लेन मार्किंग नसल्याने चालकांना मार्गाचा अंदाज येत नाही. त्यामुळे एखादा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी येथे अनेक किरकोळ अपघात आणि वाहनचालकांमधील वादाच्या घटनाही घडल्या आहेत.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने स्पष्ट दिशादर्शक फलक बसविणे, गतिरोधक व रस्त्यालगत रिफ्लेक्टर्स लावणे, लेन मार्किंग करणे तसेच वाहतुकीसाठी सुरक्षित तांत्रिक उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, “एखादा निष्पाप जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून, महामार्ग विभाग आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
3) मलकापूर:- ‘ज्ञानदीप’ अखेर सेवामुक्त! मुख्याध्यापिका मिनाक्षी सावंत यांच्या गौरव सोहळ्याने मलकापूर भावुक

चार दशकांच्या शैक्षणिक सेवेला मानाचा मुजरा; मान्यवरांच्या उपस्थितीत कर्तृत्वाचा गौरव.
कराड |
मलकापूर दि. ३१ : हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देत शिक्षणाचा दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल, आगाशिवनगर (मलकापूर) येथील मुख्याध्यापिका सौ. मिनाक्षी सावंत यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित गौरव सोहळा भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. त्यांच्या प्रदीर्घ, समर्पित आणि प्रेरणादायी शैक्षणिक कारकिर्दीला यावेळी मान्यवरांनी सलाम करत कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे संचालक (केंद्रीय राज्यमंत्री दर्जा) तथा भाजपा प्रदेश सचिव भरत पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून मनोज घोरपडे उपस्थित होते. सह्यगिरी शिक्षण संस्था आणि न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीने सौ. मिनाक्षी सावंत यांचा आ. मनोज घोरपडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आ. मनोज घोरपडे यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीचे कौतुक करत, “या विद्यालयाचा परिसर शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध असून शिक्षणाचा दर्जा उत्कृष्ट आहे. त्यामुळे या संस्थेचे भवितव्य उज्ज्वल आहे,” असे सांगितले.
अध्यक्षीय भाषणात भरत पाटील यांनी शाळेच्या कार्याचा गौरव करताना, “गोरगरीब विद्यार्थ्यांना कोणतेही डोनेशन न घेता दर्जेदार शिक्षण देणारी ही संस्था समाजासाठी आदर्श आहे. पालकांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या शाळेला प्राधान्य द्यावे,” असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे सचिव प्रल्हाद साळुंखे यांनी प्रास्ताविक करत संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही गेल्या चार वर्षांत संस्थेने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीची माहिती त्यांनी दिली.
या सोहळ्यास सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित पाटणकर, नगराध्यक्ष तेजस सोनवले, विविध समित्यांचे पदाधिकारी, नगरसेवक, शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, सह्यगिरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अर्पण करणाऱ्या सौ. मिनाक्षी सावंत यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण निरोप दिला. टाळ्यांच्या कडकडाटात आणि शुभेच्छांच्या वर्षावात पार पडलेला हा सोहळा अनेकांच्या स्मरणात कायम राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




