सातारा:-महाराणी येसूबाई साहेबांच्या शौर्याला साताऱ्याची कृतज्ञ मानवंदना; ३०७ वा शौर्य आगमन दिवस उत्साहात.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सातारा:-महाराणी येसूबाई साहेबांच्या शौर्याला साताऱ्याची कृतज्ञ मानवंदना; ३०७ वा शौर्य आगमन दिवस उत्साहात.

सातारा:-छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी आणि छत्रपती शाहू महाराजांच्या मातोश्री महाराणी येसूबाई साहेब या स्वराज्याच्या इतिहासातील त्याग, संयम, धैर्य आणि स्वामीनिष्ठेचे तेजस्वी प्रतीक मानल्या जातात. इ.स. १६८९ मध्ये रायगड मोगलांच्या ताब्यात गेल्यानंतर त्यांनी आपल्या पुत्र शाहू महाराजांसह तब्बल २९ वर्षांहून अधिक काळ मोगलांच्या कैदेत राहूनही स्वराज्याशी असलेली निष्ठा कधीही डळमळू दिली नाही. त्यांच्या त्यागामुळेच मराठा साम्राज्याची आशा जिवंत राहिली आणि पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याला नवी दिशा मिळाली. अशा या महान राजमातेच्या ऐतिहासिक सातारा आगमनाच्या स्मरणार्थ ३०७ वा ‘शौर्य आगमन दिवस’ अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला.

महाराणी येसूबाई फाउंडेशनचे अध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या विशेष पुढाकाराने ग्रामपंचायत संगम माहुली आणि जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्था, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा-वेण्णा संगमावरील महाराणी येसूबाई साहेब समाधीस्थळ येथे हा अभिवादन सोहळा पार पडला. नुकतेच या समाधीस्थळाला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आल्याने यंदाच्या कार्यक्रमाला विशेष ऐतिहासिक महत्त्व लाभले.
कार्यक्रमाची सुरुवात शिववंदनेने झाली. त्यानंतर अध्यक्ष सुहास राजेशिर्के व मान्यवरांच्या हस्ते समाधीपूजन करून महाराणी येसूबाई साहेबांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पारंपरिक मर्दानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संगम माहुली येथील विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वराज्याचा इतिहास जाणून घेतला.
या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, युवा नेते संग्राम बर्गे आणि ज्येष्ठ पत्रकार विनोद कुलकर्णी यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. तर श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि पत्रकार हरीश पाटणे यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी जिज्ञासा संस्थेचे विक्रांत मंडपे, योगेश चौकवाले, जयश्री चौकवाले, निलेश पंडित, नीलिमा पंडित, निशांत पंडित, शिवप्रतिष्ठानचे धनंजय खोले, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने, उपसरपंच कोळपे तसेच संगम माहुली ग्रामस्थ, शिवप्रेमी, इतिहासप्रेमी आणि विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी महाराणी येसूबाई साहेबांचे स्वराज्याप्रती असलेले अतुलनीय योगदान, त्याग, धैर्य, दूरदृष्टी आणि राष्ट्रनिष्ठेचे स्मरण करत त्यांना भावपूर्ण अभिवादन केले. आजच्या पिढीने त्यांच्या जीवनातून राष्ट्रप्रेम, संकटातही खंबीरपणे उभे राहण्याची वृत्ती आणि स्वाभिमानाची प्रेरणा घ्यावी, असा संदेश यावेळी देण्यात आला.
हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सुहास राजेशिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली बंटीराजे भोसले, दिलीप गायकवाड तसेच येसूबाई फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत संगम माहुली आणि जिज्ञासा इतिहास संशोधन व संवर्धन संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.




