सातारा:-निराधार वृद्धांच्या न्यायासाठी विकास हादवे यांची हाक; श्रावणबाळ अनुदान ५ हजार करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717484

1) निराधार वृद्धांच्या न्यायासाठी विकास हादवे यांची हाक; श्रावणबाळ अनुदान ५ हजार करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

सातारा :-राज्यातील निराधार वृद्धांचे जीवनमान उंचावण्यासाठी श्रावणबाळ योजनेअंतर्गत मिळणारे मासिक अनुदान वाढवून ते किमान पाच हजार रुपये करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विकास महादेव हादवे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या या योजनेतून लाभार्थ्यांना मिळणारी १५०० रुपयांची मदत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर अत्यंत अपुरी ठरत असल्याचे हादवे यांनी म्हटले आहे. वीजबिल, औषधोपचार, वैद्यकीय तपासण्या, अन्नधान्य तसेच इतर जीवनावश्यक खर्चात सातत्याने वाढ होत असताना या तुटपुंज्या रकमेत वृद्धांचा उदरनिर्वाह करणे कठीण बनले आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील अनेक लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम काढण्यासाठी बँकेपर्यंत जाण्यासाठी मोठा खर्च करावा लागतो. त्यामुळे मिळालेल्या मदतीतील मोठा हिस्सा प्रवासावरच खर्च होतो. अनेक वृद्धांना कुटुंबीयांचा आधार नसल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढत असल्याकडेही हादवे यांनी लक्ष वेधले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतील लाभार्थ्यांशी संवाद साधताना त्यांची बिकट परिस्थिती समोर आल्याचे सांगत, शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी अधिवेशनात श्रावणबाळ योजनेच्या अनुदानवाढीचा निर्णय घेऊन हजारो निराधार वृद्धांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
“वृद्धांना सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी श्रावणबाळ योजनेचे अनुदान वाढविणे ही काळाची गरज आहे. शासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा,” असे आवाहन विकास महादेव हादवे यांनी केले आहे.
2) सातारा:-आरपीएस स्टार न्यूजतर्फे लोकमाता अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन.

सातारा- भारतीय इतिहासातील आदर्श, न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी राज्यकर्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्व स्तरातून अभिवादन करण्यात येत आहे. समाजहित, महिला सक्षमीकरण आणि प्रजेला न्याय देणारा आदर्श राज्यकारभार यामुळे अहिल्याबाई होळकर यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे.
अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कार्यकाळात अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा, विहिरी आणि सार्वजनिक सुविधांची उभारणी करून जनकल्याणाला प्राधान्य दिले. त्यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असून लोकसेवा आणि सुशासनाचा आदर्श म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.
त्यांच्या जयंतीनिमित्त आरपीएस स्टार न्यूज परिवारातर्फे पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आदर्श समाजातील प्रत्येक घटकाने घेऊन सामाजिक बांधिलकी जपावी, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर यांना आरपीएस स्टार न्यूज परिवारातर्फे विनम्र अभिवादन!




