महाबळेश्वर:-भीमनगर पिण्याच्या पाण्यासाठी एल्गार ! प्रशासनाच्या निष्क्रियते विरोधात कलेक्टर कार्यालय समोर उपोषण.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महाबळेश्वर:-भीमनगर पिण्याच्या पाण्यासाठी एल्गार ! प्रशासनाच्या निष्क्रियते विरोधात कलेक्टर कार्यालय समोर उपोषण.

महाबळेश्वर प्रतिनिधी: उत्तम भालेराव:
दिनांक 20 मार्च 2026 रोजी भीमनगर येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईविरोधात उभारलेले आंदोलन आता अधिकच पेटले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कलेक्टर कार्यालयासमोर करण्यात आलेल्या एकदिवसीय उपोषणाने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत हक्क असलेल्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. “पाणी हा आमचा हक्क आहे, भीक नाही!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला असून, प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांनी थेट सवाल उपस्थित केला आहे.
या आंदोलनाला आता विविध राजकीय व सामाजिक नेत्यांचा ठोस पाठिंबा मिळाला आहे. सातारा जिल्हा सदस्य अजित सपकाळ, महाबळेश्वर पंचायत समितीचे उपसभापती संजय मोरे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. दयानंद माने, युवा अध्यक्ष व शिवसेना (शिंदे गट) महाबळेश्वर प्रमुख गणेश उतेकर, भारतीय बौद्ध महासभा महाबळेश्वर तालुका अध्यक्ष नितीन गायकवाड तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष उत्तम भालेराव यांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला.
नेत्यांनी कलेक्टर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन भीमनगरच्या पाणी प्रश्नावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यांच्या ठाम पाठपुराव्यामुळे उद्यापासून भीमनगरमध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, अशी माहिती देण्यात आली.
दरम्यान, “जर कायमस्वरूपी तोडगा काढला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. ही लढाई केवळ पाण्यासाठी नसून स्वाभिमान, अस्तित्व आणि संविधानिक हक्कांसाठी असल्याचे आंदोलनकर्त्यांनी ठामपणे सांगितले.
आता प्रशासन या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करणार का, की फक्त तात्पुरत्या टँकरवरच प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




