वाईकरांच्या लढ्याला यश; सुरूर–वाई रस्ता ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाईकरांच्या लढ्याला यश; सुरूर–वाई रस्ता ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश.

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
महाबळेश्वर–पाचगणी रस्त्यावरील खड्डे युद्धपातळीवर बुजवण्याचे निर्देश; मंत्रालयात अधिकाऱ्यांची कानउघाडणी.
सातारा/मुंबई, दि. १३ : महाबळेश्वर–पाचगणी परिसरातील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेविरोधात नागरिकांनी पुकारलेल्या ‘बंद’ची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. मंत्रालयात झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करत सुरूर ते वाई रस्त्याचे काम ३० एप्रिलपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच महाबळेश्वर–पाचगणी दरम्यानच्या रस्त्यावर असलेले खड्डे तातडीने पॅचवर्कद्वारे बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीत सुरूर–वाई रस्ते विकासकामाचा वेग वाढवून ते निश्चित मुदतीत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी महाबळेश्वर–पाचगणी रस्त्यावर खड्डेमुक्तीसाठी युद्धपातळीवर पॅचवर्क करण्याचे आदेश देण्यात आले. रस्ते विकासकामे केवळ वेळेत पूर्ण होण्यापेक्षा त्यांचा दर्जाही उच्च असावा, यासाठी प्रशासनाने प्रभावी देखरेख ठेवावी, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
तसेच वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील प्रस्तावित रस्ते विकासकामांना गती देण्याबाबतही अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
काही दिवसांपूर्वी खराब रस्त्यांमुळे संतप्त झालेल्या महाबळेश्वर आणि पाचगणीकरांनी कडकडीत बंद पाळला होता. या आंदोलनाला वाईकरांनीही उत्स्फूर्त पाठिंबा दिला होता. नागरिकांच्या या संघटित आवाजामुळेच शासन दरबारी हालचाली होऊन थेट मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली, अशी चर्चा परिसरात रंगली आहे.
या बैठकीला आमदार मनोज कोरडे , रस्ते विभागाचे सचिव संजय दशपुते , एमएसआयडीसीचे मुख्य अभियंता, महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे , पाचगणीचे नगराध्यक्ष दिलीप बागडे , मुख्याधिकारी योगेश पाटील , नगरसेवक ऍड. संजय जंगम , रोहित ढेबे , शेखर कासुर्डे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
चौकट :
“स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना होत असलेला त्रास सहन केला जाणार नाही. प्रशासनाने आणि ठेकेदारांनी समन्वयाने काम करून दिलेल्या मुदतीत रस्ते चकाचक करावेत.”
— शिवेंद्रराजे भोसले व मकरंद पाटील




