सातारा:-अशा यशवंत विचारांने सातारा जिल्ह्याचा विकास नक्की होणार का???
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) सातारा:-अशा यशवंत विचारांने सातारा जिल्ह्याचा विकास नक्की होणार का???

सातारा प्रतिनिधी अजित जगताप
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्हा छत्रपतींची राजधानी आहे. लोकशाहीमध्ये घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश साताऱ्यात झाला होता. त्यामुळे सातारा जिल्ह्याला महत्त्व आहे. या जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक हिरे- रत्ने- माणिक- मोती तयार झाले. त्यांनी कधीही राजकीय लाभासाठी सहलीचा विचार केला नव्हता. आता यशवंत विचारांना तिलांजली देऊन जे काय घडते? त्यामध्ये सातारचा विकास होणार का? असा मार्मिक प्रश्न सुज्ञ मतदार विचारत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका गेले तीन वर्षे लांबणीवर पडल्या होत्या. या निवडणुका पार पडून एक महिन्याचा कालावधी झाला आहे. पंचायत समितीला १३ मार्च आणि जिल्हा परिषदेला २० मार्च ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सत्ता स्थापन होणार आहे. त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकशाहीमध्ये लोकांचे लोकांसाठी चालवलेले राज्य असा त्याचा ढोबळ अर्थ आहे. अलीकडच्या काळामध्ये काही उमेदवारांना साड्या, पैसे वाटप आणि दारू- मटणाचा प्रसाद व पेड न्युज आणि पॅकेज दिल्याशिवाय मत आणि प्रसिद्धी मिळत नाही. समाज माध्यमावर तर धुमाकूळ चाललेला आहे. असे आता आरोप होत आहेत.
अशा या अद्भुत लोकशाहीच्या प्रक्रियेतून निवडून आलेल्यांना सत्तेसाठी काय पण करावे लागत आहे. अर्थात आता राजकीय विचारधारा बदललेली आहे. सामान्य माणसांना निवडणुकीत सहभागी होणे . आर्थिक दृष्ट्या अवघड झालेले आहे. त्यामुळे आरक्षण जागेतही आता घुसखोरी व आर्थिक निकषावर निवडणुका जिंकता येतात. हे सुद्धा सिद्ध झालेले आहे.
सातारा जिल्ह्याचा विचार केला तर निवडणुकीच्या कालावधीमध्ये स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजपकडे २७ आणि भाजपचाच पराभव करून निवडून आलेले एक सदस्य असे २८ जिल्हा परिषद सदस्य तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे २० आणि शिवसेनेकडे १५ व एक काँग्रेस आणि एक शेतकरी संघटना असे पक्षीय बलाबल आहे. यातून आता सत्तेचे समीकरण जुळवताना महायुती की महाविकास युती हे लवकरच सिद्ध होणार आहे. त्या अगोदर अनेकांच्या सहली झाल्या. आणि थकवा घालून परतीच्या प्रवासाला काहीजण निघालेले आहेत. वास्तविक पाहता मतदारांच्या सुखदुःखामध्ये जाहीरनाम्यात लिहिल्याप्रमाणे आपण २४*७ सहभागी होणारे गेले पंधरा दिवस गायब होते. अशा मिस्टर इंडिया चित्रपटासारख्या गायब होणारा सदस्य- सदस्या यांना राजकीय पक्षाच्या आदेशानुसार पुन्हा एकदा मतदार संघात प्रकट व्हावे लागणार आहे.
ज्यांनी नैतिकदृष्ट्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदान केले आहे. त्याच सुज्ञ मतदारांनी लोकशाही बळकटी करण्यासाठी मतदार संघातील सुखदुःखाच्या प्रसंगी चोली वरून आलेल्या सदस्यांना आपण का उपस्थित राहिल्या नाही? याचा जाब विचारावा. अन्यथा म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ खूपच सोकवला जाईल. त्याची जाणीव ठेवावी.
काही राजकीय पक्षाच्या माता-भगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा आहेत. परंतु त्यांची पाठ राखण करणाऱ्या पती राजांनी निदान त्यांना मुक्त स्वातंत्र्य देऊन सातारा जिल्हा परिषद सभागृहात तरी त्यांच्या शेजारी बसू नये. हीच माफक अपेक्षा महिला दिनानिमित्त करावी वाटत आहे. अशा जबाबदार व्यक्तींच्या वागणुकीमुळे सातारा जिल्ह्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण विचारांचा वारसा जपणारी पिढी संपली असून आता फक्त सत्ता व खोट्या प्रतिष्ठेपाई काही लुडबुड सुरू आहे. याची मात्र इतिहासात नोंद झाली आहे. ती कधीही पुसता येणार नाही.
2) सातारा:-गॅस सिलेंडर महागाईने साताऱ्यात साजरा झाला महिला दीन…

सातारा दि: भाजप पुरस्कृत केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये अकरा महिन्यात दुसऱ्यांदा वाढ केली आहे. महिला दिनाचे औचित्य साधून झालेली ही वाढ महिलांना दीन करणारी ठरली आहे. आखाती देशातून तेल व गॅसचा पुरवठा होत असला तरी या ठिकाणी युद्ध होत आहे त्यामुळे हे गॅस सिलेंडर वाढ झाल्याचे सांगण्यात येत असले तरी मोदी है तो मुमकिन है.. यावर विश्वास ठेवला जर युद्ध पूर्णविराम झाल्यानंतर गॅस सिलेंडर दरवाढ कमी होईल का? असा मार्मिक प्रश्न साताऱ्यातील महिलांनी भाजपच्या महिला आघाडीला विचारला आहे.
घरगुती सिलेंडरचे दर ६० रुपये वाढले तर १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडर मध्ये ११५ रुपयाची वाढ झाली आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ यांच्यामध्ये वाढ करण्याशिवाय हॉटेल, ढाबा, घरगुती खानावळ, खाद्य विक्री टपरी आणि व्यवसायिकांना पर्याय राहिलेला नाही. भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून बेरोजगारी, महागाई आणि गुन्हेगारी यांचा त्रिवेणी संगम पाहण्यास मिळत आहे. विश्वगुरू तिच्या धोरणामुळे देशालाच नव्हे तर गल्लीबोळात सुद्धा लोकांना शिमगा करावा लागत आहे. अशी आता काँग्रेस पक्षासारखे महिला वर्ग टीका करू लागलेले आहेत.
काँग्रेसचे सरकार ज्यावेळी सत्तेत होते. त्यावेळेला गॅस सिलेंडरची वाढ झाल्यानंतर मोर्चा, निदर्शने व आंदोलन करणारे भाजपच्या महिला कार्यकर्त्या आता सत्तेत सहभागी झाल्याने मूग गिळून गप्प आहेत. त्यांना स्वातंत्र्य मिळाले नसून त्यांना आता इतर महिलांपुढे भाजप पक्षाचे ध्येय धोरण घेऊन जाण्यास अडचणी वाढत आहेत. निदान त्यांची अडचण ओळखून तरी गॅस दरवाढ मागे घ्यावी असे सुचित करण्यात आले आहे. आप की बार.. महागाई भाजपा सरकार.. अशी नवीन घोषणा दिली जात आहे. ८मार्च महिला दिनाच्या पूर्वसंध्येला गॅस सिलेंडर वाढ कमी करण्यासाठी भाजप पुरस्कृत केंद्र व राज्य सरकारला करामध्ये कपात करावी लागणार आहे. कारण , भारतीयांना जगणे मुश्किल झाले असताना आता पुण्यामध्ये स्मशान भूमीतील गॅस वाहिनी बंद करण्याची वेळ आलेली आहे. रुग्णालयातील ऑक्सिजन गॅस पुरवठा करण्यास सुद्धा भविष्यात अडचणी येणार आहेत. एकूण सर्वच पातळीवर भाजपला अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असल्यामुळे गव्हाच्या सोबत किडे सुद्धा रखडले जात आहेत. अशी स्थिती राष्ट्रवादी व शिवसेनेची झालेली आहे. उज्वल योजनेच्या लाभार्थींसाठी तर आता पुन्हा एकदा जळण गोळा करण्याची वेळ आलेली आहे. ग्रामीण भागामध्ये महिलावर्ग चिंताग्रस्त झाल्या असतानाच भाजप पुरस्कृत नारीशक्ती संगम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी मधून महिला वर्ग बाजूला होत आहेत.
आज जागतिक महिला दिन साजरा करत असताना गॅस दरवाढीमुळे चांगलाच भडका उडाला आहे. महिलांच्या सबलीकरणाबाबत मार्गदर्शन करताना गॅस दरवाढीबाबत बोलताना भाजप नेत्यांची पाचावर धारण बसली आहे. असे चित्र संपूर्ण देशात दिसत आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये एप्रिल २०२५ मध्ये सिलेंडरच्या किमतीत. ५० रुपयांनी वाढ झाली होती. त्यावेळी स्थानिक विक्रीकर आणि मूल्यवर्धित करामुळे ही वाढ झाल्याचे समर्थन केले होते. आता युद्धाचे कारण सांगून गॅस दरवाढीबाबत भूलथापा दिल्या जात आहेत. महिला दिन साजरा होत असतानाच महिलांना गोड सरबत दाखवून कडू डोस पाजला जात आहे. त्यामुळे महिला वर्गांना आता लाडक्या बहिणी योजनेचे कौतुक थांबून लाडक्या बहिणीला आधार देण्यासाठी महिला दिन तसेच रोजा निमित्त गॅस सिलेंडरची दरवाढ मागे घ्यावी. अशी मागणी सातारा जिल्ह्यातील महिलांच्या वतीने शाहूपुरी येथील सौ. साक्षी समीर वहागावकर, सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला पदाधिकारी सौ. वैशाली जाधव, श्रीमती नलिनी जाधव व करिष्मा सय्यद, रेखा सकटे यांच्यासह अनेक महिलांनी केली आहे.
दरम्यान , सातारा जिल्ह्यातील महिला वर्ग गॅस सिलेंडरच्या भाव वाढीमुळे त्रस्त असताना भाजप महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मौन धारण केले आहे. त्यांच्या या बोटचेपी धोरणामुळे भाजप गरीब व कष्टकरी आणि भाजपला मतदान करणाऱ्या हिंदू माता भगिनी बाबतीत निर्दयी असल्याची टीका होऊ लागलेली आहे. आता गॅस दरवाढ मागे घेऊन आपण सर्वच लाडक्या बहिणींच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. हे दाखवण्याची वेळ आली आहे. असेही महिलांनी नमूद केले आहे.




