वाई:-राजर्षी शाहू महाराज हे सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करणारे आदर्श राजे होते – प्रा.रमेश डुबल.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई दि. 27
राजर्षी शाहू महाराज हे सर्वसामान्य जनतेसाठी कार्य करणारे आदर्श राजे होते – प्रा.रमेश डुबल.
राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या कार्यातून समाज परिवर्तनावर भर दिला. सर्व धर्मातील लोकांना समान संधी दिली. शिक्षणाद्वारे समाजाचा विकास होऊ शकतो अशी त्यांची ठाम धारणा होती. समाजात समानता प्रस्थापित व्हावी म्हणून त्यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. मानवी जीवनाला उन्नत करण्याचे काम त्यांनी अविरत केले. त्यामुळे समाज समाजसुधारकांच्या कार्याचे स्मरण व गौरव करणे हे आपले परम कर्तव्य आहे असे प्रतिपादन किसन वीर महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा. रमेश डुबल यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील स्टाफ वेलफेअर समितीच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त प्रा. रमेश डुबल प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कला विभागाचे उपप्राचार्य, प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, तसेच प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे, प्रा. डॉ. विनोद वीर, स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट, डॉ. शिवाजी ताटे, डॉ. राहुल वळीव, श्री. अर्जुन जाधव, श्री बाळासाहेब टेमकर आदी उपस्थित होते.
प्रा. डुबल पुढे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज हे वसाहतवाद कालखंडात आपल्या कोल्हापूर संस्थानात नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करणारे पहिले राजे होते. त्यामुळे सर्वसामान्य स्तरातील लोकांना प्रशासन कार्यात नोकरी करण्याची संधी प्राप्त झाली. बहुजन समाजास प्रगती करता आली. शाहू महाराज यांचे कार्य आजही आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज यांनी सामाजिक न्याय, शिक्षण व शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. सर्व धर्मातील मुला-मुलींना मोफत शिक्षण व बोर्डिंगची व्यवस्था करणे हा त्यांचा क्रांतिकारी निर्णय होता. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुला मुलींना शिक्षण घेता आले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन व कार्यावर आणखी सखोल संशोधन करणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी राजश्री शाहू महाराज यांचे कार्य अंगीकारले पाहिजे हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल.
स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख डॉ. राहुल वळीव यांनी केली तर डॉ. शिवाजी ताटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.