वाई:-शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ! किसन वीर आणि खंडाळा कारखान्याकडून एफआरपीची २३४ कोटींची संपूर्ण रक्कम अदा.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ! किसन वीर आणि खंडाळा कारखान्याकडून एफआरपीची २३४ कोटींची संपूर्ण रक्कम अदा.

वाई | प्रतिनिधी
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी आणि सहकार क्षेत्रासाठी सकारात्मक ठरणारी बाब म्हणजे किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व किसन वीर-खंडाळा साखर उद्योग यांनी सन २०२५-२६ गळित हंगामातील एफआरपीची संपूर्ण रक्कम अदा करून शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरविला आहे. एकूण २३४ कोटी १४ लाख रुपयांहून अधिक रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
किसन वीर कारखान्याकडे ४ लाख ५३ हजार ६५६ मेट्रिक टन, तर खंडाळा कारखान्याकडे २ लाख ४५ हजार २८० मेट्रिक टन ऊस गाळपासाठी आला होता. प्रतिटन ३,३५० रुपये दराने देय असलेली एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे.
कारखान्याने यापूर्वी १५ जानेवारीपर्यंत गाळपासाठी आलेल्या ऊसाची संपूर्ण बिले अदा केली होती. त्यानंतर १६ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत गाळपासाठी आलेल्या ऊसाच्या बिलापोटी २५ कोटी ९४ लाख ८५ हजार ५७१ रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रमोद शिंदे यांनी सांगितले की, मागील चार गळित हंगामांमध्ये कोणत्याही बँकेचे वित्तसहाय्य न घेता आणि शेतकऱ्यांचा एकही रुपया थकीत न ठेवता कारखान्याने ऊसबिले अदा केली आहेत. एवढेच नव्हे तर सन २०२०-२१ हंगामातील सुमारे ६४ कोटी रुपयांची थकीत ऊसबिले देखील पूर्णपणे देण्यात आली आहेत.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचा कारभार पारदर्शक व प्रामाणिकपणे सुरू असल्याचा दावा शिंदे यांनी केला. काही व्यक्तींकडून कारखान्याची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न होत असला, तरी त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, आगामी २०२६-२७ गळित हंगामाच्या तयारीला सुरुवात झाली असून दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी व्यवस्थापन सज्ज असल्याचे सांगण्यात आले. तसेच कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यांकडेच गाळपासाठी द्यावा, असे आवाहन व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे व कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांनी केले आहे.
“एफआरपी वेळेत आणि पूर्ण मिळाल्याने शेतकऱ्यांचा कारखान्यावरील विश्वास अधिक दृढ झाला असून सहकार क्षेत्रातील आर्थिक शिस्तीचा आदर्श किसन वीर आणि खंडाळा कारखान्यांनी कायम ठेवला आहे,” अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
2) महाराष्ट्र समाजभूषण पुरस्काराने सौ. शीतल नायकवडी यांचा गौरव.

वाई | प्रतिनिधी
पुणे येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे व्हिजन फॅमिली व दर्शन प्रोडक्शन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार २०२६’ या भव्य पुरस्कार सोहळ्यात वाई येथील उद्योजिका, समाजसेविका आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेल्या सौ. शीतल संतोष नायकवडी यांना महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्यास महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पुणे महानगरपालिकेच्या माजी महापौर मंजुषा नागपुरे, श्रीनाथ भिमाले, स्वरदा बापट, अमित सोनवणे, रविराज काळे तसेच व्हिजन फॅमिलीचे संस्थापक आशिष जैन व ज्योती जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उद्योजकता, समाजसेवा, महिला सक्षमीकरण आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा उत्कृष्ट समतोल साधत समाजात सकारात्मक योगदान देणाऱ्या सौ. शीतल नायकवडी यांच्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल वाई तालुक्यासह सातारा जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
3) ढोल-ताशांचा गजर, गोड शिरा अन् नव्या स्वप्नांची सुरुवात! पसरणीच्या भैरवनाथ विद्यालयात नवागतांचा जल्लोषात प्रवेशोत्सव.

वाई, दि. १७ : शाळेचा पहिला दिवस म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवनाथ विद्यालय, पसरणी येथे इयत्ता पाचवी व आठवीच्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत यंदा आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, पुष्पगुच्छांच्या वर्षावात आणि गोड शिऱ्याच्या मेजवानीत पार पडलेल्या या प्रवेशोत्सवाने विद्यार्थ्यांसह पालकांच्याही चेहऱ्यावर आनंद फुलवला.
सोमवार, दि. १५ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आणि सौ. लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमापूजनाने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यासाठी शासनाकडून मिळणारी पाठ्यपुस्तके, वह्या आणि पेन यांचे वितरण करण्यात आले. यासोबतच कादंबरी संजीवन प्रभाळे यांच्या वतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत वह्या व पेन देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून, उपस्थित पालक आणि ग्रामस्थांनी या सामाजिक बांधिलकीचे मनापासून कौतुक केले.
कार्यक्रमाला विद्यालयाचे मुख्याध्यापक ए. एल. पवार, विद्यालय ट्रस्टचे अध्यक्ष अरुण श्रीपती शिर्के, स्कूल कमिटी सदस्य राजेंद्र शिर्के, राजेंद्र येवले, राष्ट्रसेवा दल वाई तालुका अध्यक्ष दत्तात्रय यशवंत महांगडे, पालक प्रतिनिधी अमृता प्रवीण महांगडे यांच्यासह शिक्षकवृंद, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त, सुसंस्कार आणि परिश्रमाचे महत्त्व पटवून देत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षणाच्या माध्यमातून मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संदेशही विद्यार्थ्यांना देण्यात आला.
प्रवेशोत्सवाची रंगत वाढवण्यासाठी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना गोड शिरा देण्यात आला. नवीन पुस्तके, वह्या, ढोल-ताशांचा उत्साह आणि गोड जेवण यामुळे शाळेचा पहिलाच दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा आणि संस्मरणीय ठरला.
पसरणी परिसरातील पालकांनी विद्यालयाच्या या स्वागतशील उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय घेत असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साह, आनंद आणि प्रेरणेच्या वातावरणात झाल्याने संपूर्ण विद्यालय परिसर नव्या उमेदीने भारावून गेला.
4) वाई:-चिमुकल्यांच्या हास्याने दुमदुमली शाळा! जगताप विद्यालयात प्रवेशोत्सवाचा जल्लोष; नवागतांचे औक्षण करून स्वागत.

वाई दि. १७ : नवे दप्तर, नवीन पुस्तके, चेहऱ्यावर उत्सुकता आणि मनात शाळेची ओढ… अशा आनंददायी वातावरणात गंगापुरी, वाई येथील श्री विठ्ठलराव जगताप नगरपालिका शाळा क्रमांक ५ मध्ये नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात संपन्न झाला. पहिल्याच दिवशी चिमुकल्यांच्या किलबिलाटाने संपूर्ण शाळा परिसर आनंदाने दुमदुमून गेला.
नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा परिसर आकर्षक रांगोळ्या, रंगीबेरंगी फुगे आणि तोरणांनी सजविण्यात आला होता. शाळेत प्रथमच पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षक, पालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने औक्षण करून तसेच गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात होत असल्याने पालकांमध्येही विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व नवप्रवेशित विद्यार्थ्यांना अंकलिपी व लेखन साहित्याचे किट भेट देण्यात आले. हे साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अधिकच खुलून दिसत होता.
या कार्यक्रमास वाई नगरपरिषदेचे नगरसेवक अजित शिंदे, नगरसेविका डॉ. पद्मश्री चोरगे, रुपाली वनारसे, वैशाली शिंदे, सीए विनय लोखंडे आणि स्वप्निल गायकवाड हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
प्रशालेचे वरिष्ठ मुख्याध्यापक विकास जाधव, सेवाज्येष्ठ अध्यापक विलास कोळी यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष धुरगुडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वरिष्ठ मुख्याध्यापक विकास जाधव यांनी केले.
प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विशेष म्हणजे, पहिल्या दिवसाचा आनंद अधिक गोड करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले. गोड जेवणाचा आस्वाद घेताना चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद हेच या प्रवेशोत्सवाचे खरे यश ठरले.
5) पाटण:-बेकायदेशीर मदरसा बांधकामावरून पाटण तालुका पुन्हा पेटला!; सकल हिंदू समाजाचा प्रशासनाला अल्टिमेटम.

मोरगिरी- पेठशिवापूर येथील गट क्रमांक ५२/२ मधील कथित बेकायदेशीर मदरसा बांधकाम तात्काळ पाडण्यात यावे, अन्यथा पाटण तालुक्यात भव्य जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा सकल हिंदू समाज पाटण तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
सकल हिंदू समाजाच्या शिष्टमंडळाने नुकतेच तहसीलदारांची भेट घेऊन या बांधकामाची सखोल चौकशी करून ते अनधिकृत असल्यास तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. निवेदनात नमूद केल्यानुसार, पेठशिवापूर येथील या बांधकामाविरोधात सुमारे चार वर्षांपूर्वी ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. त्यावेळी प्रशासनाकडे विविध कागदपत्रे आणि पुरावे सादर करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाने संबंधित कामाला स्थगिती दिली होती.
सन २०२१ ते २०२६ या कालावधीत हे बांधकाम पूर्णपणे बंद होते. मात्र, गेल्या काही दिवसांत कोणतीही नवीन प्रशासकीय परवानगी न घेता पुन्हा बांधकाम सुरू झाल्याचा आरोप सकल हिंदू समाजाने केला आहे. त्यामुळे मोरगिरी परिसरासह संपूर्ण पाटण तालुक्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सकल हिंदू समाजाचे अरुण रंगराव मोरे, पवन तिकुडवे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले. “संबंधित बांधकाम बेकायदेशीर असल्यास प्रशासनाने तातडीने ते थांबवून आवश्यक कारवाई करावी. अन्यथा सकल हिंदू समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येईल,” असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
दरम्यान, या मागणीमुळे पाटण तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




