वाई:-किसनवीर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी देव पाण्यात घातले आहेत.
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
!*!! होय, देव पाण्यात घातले आहेत !!*
सातारा जिल्ह्यातील सर्वात जास्त म्हणजे ५ तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसनवीर साखर कारखान्याचा सन २०२२ -२३ चा गळीत हंगाम १४ मार्च २०२३ रोजी संपला. गळीत हंगामाचा समारोप कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला, समारोप कार्यक्रमात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष श्री नितीन पाटील यांनी भल्या बुऱ्या गोष्टींचा उहापोह केला, शेतकऱ्यांना संभोधित करत असताना काही विरोधक कारखाना बंद पडावा म्हणून देव पाण्यात घालून बसल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी कारखान्या संदर्भात देव पाण्यात घातले आहेत ही गोष्ट खरी आहे परंतु बँकेच्या अध्यक्षांनी सांगितले ते अर्धसत्य आहे, २० वर्षांपूर्वी कार्यक्षेत्रातील लोकांचे कारखान्याविषयीचे अनुभव काही फार चांगले नाहीत पूर्वी ज्या घटना घडल्या आहेत त्याची पुनरावृत्ती होऊ नये, ऐकाऐकी कारखान्याच्या गोडाऊनला आग लागू नये, साखरेच्या पोत्यांना पाय फुटून साखरपोती अचानक गायब होऊ नयेत, कारखान्याचे खाजगीकरण होऊ नये, कोणा बड्या नेत्याच्या घशात कारखाना जाऊ नये, ज्या कारखान्यावर अनेक लोकांचे प्रपंच उभे आहेत ते सहकार मंदिर धुळीस मिळू नये म्हणून तमाम शेतकऱ्यांनी देव पाण्यात घातले आहेत अशी प्रतिक्रिया वाई तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री कल्याण पिसाळ-देशमुख यांनी दिली आहे.
सत्ता परिवर्तनाकरता शेतकऱ्यांसमोर सत्ताधाऱ्यांनी अनेक आणाभाका घेतल्या,भली थोरली आश्वासने दिली प्रत्यक्षात मात्र नवीन व्यवस्थापनाला भागभांडवला करता शेतकऱ्यांपुढे व कामगारांपुढे हात पसरावे लागले, शेतकऱ्यांच्या नावे कर्जे काढून शेअर्स गोळा केले, कामगारांच्या नावे कर्जे काढून त्यांनाच फक्त ५.५ महिन्यांचे पगार दिले गेले, वाई तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे अनुयायी स्वतः अंगचे हुशार असल्यामुळे त्यांनी ऊस इतर खाजगी कारखान्यांना घातला, आतापर्यंत ज्या विरोधकांना आमदार गटाने नाडले त्यांचाच ऊस अपरिहार्यतेमुळे किसनवीर कारखान्याकडे गाळपासाठी आला, त्यांच्या पुण्याईवरच काही लाख टन उसाचे गाळप झाले, खंडाळा व किसनवीर दोन्ही कारखान्यांकडून फक्त पहिल्या २ पंधरावड्यांची ऊसबिले शेतकऱ्यांना मिळालेली आहेत. ३ ते ३.५ महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी कारखान्याकडे घातलेल्या ऊसाची बिले अजूनपर्यंत मिळालेली नाहीत, पैसे दिले नाहीत, मार्च अखेरीस कशीबशी सोसायटीची बिले जमा केली आहेत ते सुद्धा शेतकऱ्यांच्या खांद्यावरील कर्जाचा बोजा कमी केल्याची बतावणी करत आहेत, उपकाराची भाषा बोलत आहेत, वस्तुतः कारखाना, जिल्हा बँक व सोसायटी तिन्ही वेगवेगळ्या संस्था आहेत. सोसायटी आणि बँकेचा कारखान्याच्या ऊस बिलाशी कसलाही संबंध नाही, तरीसुद्धा जिल्हा बँक अधिकारी कारखान्यावर जाऊन जबरदस्तीने शेतकऱ्यांची बिले जिल्हा बँकेत जमा करण्यास भाग पाडतात हे कारखाना व्यवस्थापनाच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. एखदा पैसे जिल्हा बँकेत आले की विकास सेवा सोसायट्या पैसे काढून घेतात पीक कर्ज मागे ठेवून जिल्हा बँकेच्या इतर कर्जाची रक्कम भरून घेतात, पीक कर्ज थकीतच राहते मार्च अखेरीची बतावणी करून नेत्यांचे हस्तक सोसायटीत बसून स्वतःचे पैसे देऊन थकलेल्या शेतकऱ्यांची पीककर्जे नवी जुनी करून देतात त्या बदल्यात ते शेतकऱ्यांकडून भरमसाठ व्याजाची वसुली करतात, सोसायटीने १ ते १.५ लाख पीककर्ज मंजुरी दिली तर शेतकऱ्यांच्या ७/१२ वर १५ ते १६ लाखाचा ई-करार जिल्हा बँक करते त्यामुळे इतरत्र कुठेही शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही,कारखाना व्यवस्थापनाच्या सहकार्यामुळे जिल्हा बँक व सोसायट्या शेतकऱ्यांची गळचेपी करतात त्यामुळे शेतकरी स्वतः आर्थिक नियोजन करू शकत नाही, वेळेवर शेतीची कामे करू शकत नाही, त्यामुळे शेतकरी ह्या आर्थिक दृष्टचक्रात दिवसेंदिवस रूतत चालला आहे.
२ दिवसांपूर्वी कवठे गावच्या यात्रेनिमित्त सालाबादप्रमाणे बगाड उत्सव संपन्न झाला, काळभैरवनाथाच्या बगाडावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली त्या हेलिकॉप्टर मध्ये खुद्द जिल्हाबँकेचे अध्यक्ष श्री नितीन पाटील विराजमान होते आता ह्या ग्रँड एंट्री मध्ये भक्ती भाव होता का सत्तेचा आणि पैशाचा उन्माद होता हा एक संशोधनाचा विषय आहे. ३ वर्षापासून तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर पैसा नाही, यात्रा साजरी करायची तर चार ठिकाणी हात पसरावे लागतात, दुसरीकडे नेत्यांची राजेशाही जीवन पद्धती बघितली तर इतका करंटेपणा यांच्यामध्ये कसा काय येतो हा एक सर्वसामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे.तमाम कवठे ग्रामस्थांची दोन आराध्य दैवते आहेत, एक काळभैरवनाथ व दुसरे थोर स्वातंत्र्य सेनानी, देशभक्त, कै.किसन तथा आबासाहेब वीर, सध्याचे तालुक्यातील सत्ताधारी कै.किसनवीरांच्या विचारांचा वारसा सांगतात, खरेतर सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक श्वासावर कै.किसनवीर आबांच्या कार्यकर्तृत्वाचा अंमल आहे, आबांच्या मृत्यूनंतर तब्बल २७ वर्षांनी स्वर्गीय आबासाहेब वीरांचे स्मारक झाले, आबांच्या पूर्वपुण्याईवर ज्या लोकांची राजकीय कारकीर्द बहरली त्याच अनुयायांनी त्यांच्या स्मारका विषयी इतकी उदासीनता दाखवली तर कवठेकरांच्या हृदयात काळभैरवनाथाच्या बरोबरीचे स्थान असणाऱ्या स्वर्गीय आबासाहेब वीरांच्या पुतळ्यावर हवाई पुष्पवृष्टी होण्याचे भाग्य त्यांच्या नशिबी कुठले ? हरऐक प्रकारे कै.आबासाहेब विरांचे नाव मिटवण्याचा हा प्रयत्न असू शकतो परंतु कै.किसन वीर ही कोणी व्यक्ती नव्हे तर तो एक विचार आहे, तो असा संपता संपणारा नाही.
लोकांच्या हितासाठी कारखाना चालवण्याचे धाडस केले, कारखाना वाचवण्यासाठी शेतकऱ्याच्या खांद्यावर कर्जाचे ओझे ठेवले, हे कमी की काय आता कारखाना बंद पडावा म्हणून विरोधकांनी देव पाण्यात घातल्याचे वारंवार सांगितले जाते एकंदरीत कारभाऱ्यांचे वागणे पाहिले तर हा कारखाना खाजगी व्यक्तीच्या दावणीला जातो की काय अशी शंका शेतकरी घेऊ लागला आहे, वारंवार तशा पद्धतीची वक्तव्ये कारभाऱ्यांकडून केली जातात “मनी वसे ते स्वप्नी दिसे” या उक्तीप्रमाणे कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा बँकेच्या अध्यक्षांची कारखाना प्रकरणी वाटचाल दिसत असल्याचे कल्याण पिसाळ- देशमुख यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकार म्हटलेले आहे.
श्री कल्याण पिसाळ-देशमुख, ओझर्डे
उपाध्यक्ष – वाई तालुका काँग्रेस कमिटी.
फोन – ९८५०४१२९०९