मेढा:-ओ बी सी आरक्षित जागेवर जावळीच्या दोन कुणबीमराठा उमेदवारांमध्ये हमरातुमरी..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

ओ बी सी आरक्षित जागेवर जावळीच्या दोन कुणबीमराठा उमेदवारांमध्ये हमरातुमरी..

मेढा दि: सातारा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जावळी तालुक्यामध्ये तीन आणि पंचायत समिती साठी सहा सदस्यांची निवडणूक होत आहे. यामध्ये( इतर मागासवर्गीय) ओ.बी.सी.आरक्षण असलेल्या म्हसवे जि. प. गटात भाजपचे वसंतराव मानकुमरे व शिवसेनेचे संदीप पवार या दोन उमेदवारांमध्ये मेढा तहसील कार्यालयाच्या आवारात
हमरातुमरी झाली. एकमेकांचा सातबारा मांडण्यात आला. यामुळे या गटात मूळ इतर मागासवर्गीयांपेक्षा ओ.बी. सी. पेक्षा कुणबीमराठा दाखला काढून निवडणूक लढवणाऱ्यांमध्येच आपापसातील तक्रारी वाढू लागलेली आहेत. याची निवडणूक आयोगाने नोंद घ्यावी. अशी मागणी पुढे आली आहे.
जावळी तालुक्यातील कुडाळ जिल्हा परिषद गट हा इतर मागासवर्गीय महिलांसाठी , कुसुंबी गट सर्वसाधारण महिलांसाठी आणि म्हसवे गट हा इतर मागासवर्गीय पुरुषांसाठी आरक्षित आहे. राजकीय दृष्ट्या वास्तविक पाहता मूळ इतर मागासवर्गीय ओ बी सी म्हणजेच ज्यांच्या जातीच्या दाखल्याला पाच वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे. अशा कुणबी मराठा उमेदवाराचा समावेश नैसर्गिकरित्या इतर मागासवर्गीय घटकांमध्ये आहे. तर नवोदित ज्यांनी दाखले काढलेले आहेत. त्यांना कुणबी मराठा दाखला मिळाला. परंतु, अनेक इच्छुकांना दाखला मिळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कागदपत्र सादर करताना त्यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. काहींनी दाखला खोटा काढल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली असतानाच जावळी तालुक्यात कुणबी मराठा दाखल्या बाबत कुणबी मराठा उमेदवारांनी तक्रार दाखल केल्यामुळे अजून कोणता पुरावा हवा? असे आता ओ बी सी नेते उघडपणे बोलू लागलेले आहेत. कोण बोल मराठ्यांमध्ये जर वादावादी होत असेल तर निवडणूक नको असा सूर मतदारसंघांमध्ये उमटला आहे.
वास्तविक पाहता कुणबी मराठा जातीच्या दाखल्याबाबत निवडणूक आयोग व तहसील कार्यालय योग्य निर्णय घेतीलच. परंतु, त्यासाठी भाजप व शिवसेना उमेदवाराने मेढा तहसील कार्यालयात पोलीस व अधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोरच अर्जाच्या छाननी दिवशीच एकमेकांचा उद्धार केला. वास्तविक पाहता लोकशाही मार्गाने शांततेत व कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करणारी निवडणूक झाली पाहिजे. अशी सामान्य मतदारांची इच्छा आहे. पोलीस यंत्रणा व निवडणूक आयोग बोटचेपीचे धोरण अवलंबत असल्याने सामान्यांना कायद्याचा बडगा आणि खुलेआम कायदा हातात घेणाऱ्यांना सुरक्षा असे चित्र जावळी तालुक्यात निर्माण झालेले आहे. ही फार चिंतेची बाब आहे. सन्माननीय भाजपचे नेते व निवडणूक प्रभारी आदरणीय सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच शिवसेनेचे जावळीचे नेते एकनाथ ओंबळे आणि ज्ञानेश्वर रांजणे या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांनी एकमेकांशी समन्वय साधून श्री मानकुमरे व श्री पवार यांच्यातील हा वाद मिटवावा. कारण, सर्वजण जावळी तालुक्यातील आहेत. त्यामुळे राजकारणाच्या पलीकडेही व्यक्तिगत नातेसंबंध जपण्यासाठी सर्वांनी शांतता राखावी. असे आवाहन सकल मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व ओबीसी संघटनेच्या नेत्यांनी केले आहे. अन्यथा मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम झाल्यास वादविवाद करणारे जबाबदार राहतील असा इशारा दिलेला आहे.




