वाईत ‘भद्रेश्वर ११’ हाफ-पिच क्रिकेट स्पर्धेचा धमाका! सातारा जिल्ह्यासह बाहेरील संघांचा उत्स्फूर्त सहभाग; क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाईत ‘भद्रेश्वर ११’ हाफ-पिच क्रिकेट स्पर्धेचा धमाका!
सातारा जिल्ह्यासह बाहेरील संघांचा उत्स्फूर्त सहभाग; क्रीडाप्रेमींची मोठी गर्दी.

सातारा |
वाई, दि. २८ : वाई येथील भद्रेश्वर ११ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य हाफ-पिच क्रिकेट स्पर्धेला खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वाई तालुक्यासह सातारा जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरील अनेक नामांकित संघांनी स्पर्धेत सहभाग नोंदवल्याने सामने अत्यंत चुरशीचे झाले. रोमांचक लढतींमुळे मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी नगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक सचिन सावंत, सामाजिक कार्यकर्ते तेजस जमदाडे व प्रविण जाधव, लक्ष्मी ज्वेलर्स (वाई), श्री गुरुकृपा साडीज (वाई) तसेच बप्पा प्युअर व्हेज यांनी मोलाचे सहकार्य केले.
स्पर्धेचे नियोजन आणि व्यवस्थापन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी आयोजक समितीने विशेष मेहनत घेतली. आदेश जगताप, राहुल भोसले, अक्की इथापे आणि संकेत सणस यांनी उत्कृष्ट समन्वय साधत स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्णत्वास नेली. त्यांच्या नियोजनामुळे संपूर्ण स्पर्धा पारदर्शक, सुरळीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी अशा स्पर्धा मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देतात, अशी भावना उपस्थित मान्यवर आणि खेळाडूंनी व्यक्त केली.
भद्रेश्वर ११ च्या या दर्जेदार उपक्रमाचे वाई तालुक्यासह संपूर्ण क्रीडा क्षेत्रातून कौतुक होत असून, भविष्यात याहून अधिक भव्य आणि दर्जेदार क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला.
2) वाई काँग्रेसमध्ये उफाळला असंतोष; ब्लॉक अध्यक्ष निवडीवरून निष्ठावंत कार्यकर्ते आक्रमक!
सातारा | प्रतिनिधी
वाई, दि. २८ : सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीने नुकत्याच जाहीर केलेल्या ब्लॉक काँग्रेस अध्यक्षांच्या नियुक्तीवरून वाई तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक कार्यकर्त्यांचा विश्वास न घेता नियुक्त्या करण्यात आल्याचा आरोप करत संबंधित निवडींचा फेरविचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण, किसनवीर आबा, प्रतापराव भोसले आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा लाभलेल्या काँग्रेस पक्षात तळागाळातील कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना नाराज कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, नव्याने नियुक्त झालेल्या जिल्हाध्यक्षांची भेट घेऊन ब्लॉक अध्यक्षांच्या निवडीपूर्वी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, निरीक्षकांनी अर्ज स्वीकारून नावे थेट प्रदेश काँग्रेसकडे पाठविल्याचे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, निवड प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आलेले निरीक्षक संजय बालुगडे यांनी स्थानिक कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली नाहीत, तर केवळ अर्ज स्वीकारून ते पुढे पाठविले, असा आरोपही काही कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण निवड प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.
कार्यकर्त्यांनी असा इशाराही दिला आहे की, पक्षाचे राष्ट्रीय नेतृत्व संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असताना स्थानिक पातळीवरील अशा निर्णयांमुळे संघटनात्मक एकात्मतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. वाई तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वाढत असलेल्या असंतोषाचा आगामी राजकीय घडामोडींवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करून ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्तीचा फेरविचार करावा, अशी मागणी संबंधित निष्ठावंत कार्यकर्त्यांनी केली आहे.



