वाई:-जनता शिक्षण संस्थेचा १२/०७/२०२३ रोजी ५६ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.
पत्रकार वैष्णवी शिंदे:-9146802009

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे
वाई दि.13
जनता शिक्षण संस्थेचा १२/०७/२०२३ रोजी ५६ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न.
“बालवाडी हे शिक्षणाचे पहिले केंद्र असून, संस्कारक्षम पीढी निर्माण करणेचा पाया खऱ्या अर्थाने बालवाडीतच घातला जातो, म्हणूनच त्यांची संख्या भारतामध्ये वाढली पाहिजे. त्यादृष्टीने भारतात मूलभूत शिक्षण प्रणालीत बदल झाला पाहिजे. या कारणास्तव नवीन शैक्षणिक धोरण आता येऊ घातले आहे. जसे साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बोलका असला पाहिजे तसा शिक्षण संस्थेचा अध्यक्ष अभ्यासू असला पाहिजे तरच शिक्षण क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्रांती होईल. उच्च पदावर असतानाही जे नम्र असतात; तीच खरी माणसं असतात. जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण आहेत. म्हणून नवीन शैक्षणिक धोरणात माणूस बनवण्याचा प्रयत्न करणारे धोरण आता राबवलं पाहिजे” असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या ५६ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा.नारायण चौधरी, संस्थेचे सदस्य श्री. केशवराव पाडळे, श्री, सुरेश यादव, माजी प्र.प्राचार्य रमेश डुबल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे हे मान्यवर उपस्थित होते.
प्राचार्य लवटे पुढे म्हणाले की, “भारतामधील शिक्षण प्रणाली ही नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने कात टाकत आहे. ही शिक्षण प्रणाली निरंतर स्वरूपाची असून, माणसाला स्वावलंबनाकडे घेऊन जाणारी आहे. जोपर्यंत भारतीय पुरुष स्वावलंबी होणार नाही, तोपर्यंत भारत सक्षम होणार नाही. जगात सगळ्यात प्रभावशाली शैक्षणिक धोरण फिनलंड या देशाचे असून, त्याच धोरणजवळ जाणारी ही नवीन शैक्षणिक प्रणाली भारतात येऊ घातली आहे. त्यामुळे भारतातील शिक्षण धोरणामध्ये अमुलाग्र बदल दिसून येईल “.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना मा. मदनदादा भोसले म्हणाले की, ” वर्धापन दिनाला गेल्या वर्षभरात आपण काय केलं? काय करायचं राहून गेलं. आणि आता पुढच्या काळात आपणास काय करायचं आहे? याचा गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे. जनता शिक्षण संस्था आणि महाविद्यालयाच्या उभारणीसाठी वाई परिसरातील कार्यकर्त्यांनी स्वतःची जमीन बँकेस तारण देऊन निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांच्या कष्टाने व त्यागाने जनता शिक्षण संस्थेची उभारणी झाली आहे. संस्था एक कुटुंब आहे म्हणून संस्थेप्रती कृतज्ञ असणं फार महत्त्वाचा आहे. आपणास काळाची चाहूल घेत पुढे जावं लागेल. भविष्याची गरज लक्षात घेऊन, नवनवी कौशल्ये विकसित करणारे व्यावसायिक कोर्सेस महाविद्यालयांमध्ये चालू केले पाहिजेत. त्याचाच भाग म्हणून स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस पुढच्या वर्षभरात सुरू करणार आहोत. संस्था गेली अनेक वर्षे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचं निरंतर काम करत आहे. तसेच यावर्षापासून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींनाही मोफत शिक्षणासाठी महाविद्यालयाचे दार खुलं केलेलं असून, महाराष्ट्रातील हिंगोली, अमरावती, बीड, धाराशिव व नाशिक जिल्ह्यातील मुलींनी प्रवेश घेतला आहे. या मुलां-मुलींची सर्व जबाबदारी संस्था घेत आहे. त्यामुळे एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे”.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी यांनी प्रास्ताविकामध्ये जनता शिक्षण संस्थेची जडणघडण कशी झाली, या संदर्भात थोडक्यात माहिती दिली. संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रामध्ये यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे प्राचार्य सुनीलकुमार लवटे व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. संस्थेचे खजिनदार प्रा. नारायण चौधरी यांनी आभार मानले. तर प्रा.गणेश चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी जनता शिक्षण संस्था संचलित सर्व माध्यमिक शाळांमधील तसेच किसन वीर महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ शाखेतील आजी-माजी प्राध्यापक, शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.