कृषी व व्यापारताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

सातारा:-राज्यातील सत्तांतराच्या घोळात सातारा जिल्हा बँक काही संचालकांनी साधला परदेशी दौरा?

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

राज्यातील सत्तांतराच्या घोळात सातारा जिल्हा बँक काही संचालकांनी साधला परदेशी दौरा?

सातारा दि: सर्वसामान्य शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची दि:१५ ऑगस्ट १९४९ साली स्थापना केली होती. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सावकारी पाशातून मुक्त करून त्यांना सहकारी तत्त्वानुसार सहकार्य करण्यासाठी सातारा जिल्हा बँक कटिबद्ध होती . आता संचालकांच्या परदेशी दौरा व सेवक भरती प्रक्रिया यामुळेच जिल्हा बँक गाजू लागली आहे. महाराष्ट्र राज्यातील सत्तांतराच्या घोळात सातारा जिल्हा बँक काही संचालकांनी परदेशी दौरा साधल्याची? आता टीका होऊ लागली आहे. याबाबत प्रसारमाध्यमानेही आपली भूमिका मांडल्यामुळे ग्रामीण भागात तो एक चर्चेचा विषय ठरला आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रामाणिक व पारदर्शक संचालक मंडळाने स्व हित न पाहता शेतकऱ्यांचे हित पाहिले. त्यामुळे खऱ्या अर्थाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वातंत्र्यसैनिक किसन वीर (आबा) यांचे स्वप्न साकार झाले. परंतु, अलीकडच्या काळामध्ये जिल्हा बँक संचालक होण्यासाठी साम- दाम- दंड- भेद याचा अवलंब झाला. आज यापैकी काही संचालक परदेशी दौऱ्यावर गेलेले आहेत.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या घोळात आपले हित साधावे म्हणून काही संचालक परदेशी शेतीचा प्रयोग व अभ्यास करून शेतकऱ्यांचे हित? साधणार आहेत. सदर संचालकांनी परदेशात शेतकऱ्यांचे हितासाठी कोणता अभ्यास केला ? याची परीक्षा घेण्यात यावी. अशी रास्त मागणी रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोनू साबळे, शेतकरी अजित निकम यांनी केली आहे. त्याचबरोबर विविध संघटनांनीही याबाबत आवाज उठवण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे शेतकऱ्यांचे रक्त शोषण करून प्रस्थापितांची चोचले पुरवणारी संस्था अशी खाजगी मध्ये नेहमीच चर्चा होताना दिसते. परंतु, सर्वच गोष्टी या नकारात्मक नसून काही सकारात्मक ही गोष्टी घडलेली आहेत. त्याबद्दल सातारा जिल्हा बँकेला आत्तापर्यंत ९९ पुरस्कार मिळाले असून भविष्यात पुरस्काराचे शतके साजरे करण्यात येईल. त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे. सातारा जिल्ह्यातील एकूण ९५३ विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शंभर टक्के वसुली होत असल्याने एक श्रीमंत बँक म्हणून राज्यात सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा नावलौकिक आहे .सध्याच्या स्थितीमध्ये २७१२ सभासद असून त्यापैकी८७ व्यक्तिगत सभासद आहेत. सदर व्यक्तिगत सभासदांची संख्या पाहता अनेक सभासद मयत झाले आहेत . त्यांच्या जागी त्यांच्या वारसांची अद्याप नियुक्ती केलेली नाही.
सलग चौदा वर्ष बँकेने एन पी शुन्य आणलेला आहे. परंतु परदेशी दौऱ्यामध्ये झालेल्या खर्चाचा कधीही तपशील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेला नाही. वास्तविक पाहता जिल्हा बँकेच्या कामकाजामध्ये अधिकारी व कर्मचारी तसेच नियमित कर्ज वसूल करणारे सोसायटीचे सचिव कर्मचारी व शेतकरी बांधव आहेत .यांना किमान श्रावणी सहलीसाठी मेरूलिंग, भैरोबाचा पायथा, अजिंक्यतारा, दक्षिण काशी वाई, क्षेत्र महाबळेश्वर, जरंडेश्वर ,धारेश्वर, यवतेश्वर या ठिकाणी तरी घेऊन गेलं पाहिजे. अशी मार्मिक टिपणी शेतकरी वर्ग करू लागलेले आहेत.
सदर बँकेच्या यंदाच्या निवडणुकीत अकरा जागा बिनविरोध झाल्या असून दहा जागा अटीतटीच्या लढती झाल्या होत्या. सध्या परदेशी दौऱ्यानिमित्त नार्वे ,डेन्मार्क, नेदरलँड, दुबई, स्वीडन, फिनलँड या ठिकाणी काही संचालक कुटुंबासह भेटी देत असल्याचे समजते. प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत असताना दुग्ध व फळे, फुले, भाजीपाला अशा शेतावर जाऊन अभ्यासपूर्ण माहिती घेण्याचे छायाचित्र ऐवजी प्रेक्षणीय स्थळाचे काही संचालकांचे फोटो पाहण्यास मिळत आहे. हे सामान्य शेतकऱ्यांच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रकार वाटू लागलेला आहे. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी आता संचालकांच्या परतीच्या प्रवासानंतर त्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून परदेशात केलेल्या अभ्यासाची परीक्षा द्यावी. अशी मागणी करण्यात येणार आहे. विविध शेतकरी संघटना तसेच शेतकरी वर्ग एकजुटीने जाब विचारण्यासाठी तयारी करत आहेत. त्यामुळे हा परदेशी दौरा चांगलाच गाजण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. यापूर्वी नवीन संचालकांचे कर्तव्य, जबाबदाऱ्या, सहकार क्षेत्राची पुढील आव्हाने आदी विषयांवर कार्यशाळा घेण्यात आली होती .ही कार्यशाळा महाबळेश्वर येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये घेतल्यामुळे टीकेची झोड उठली होती. तरी पुन्हा राज्यातील सत्तांतरच्या संघर्षांमध्ये परदेशी दौऱ्याची आखणी केल्यामुळे या विरोधात शेतकरी संतप्त झालेले आहेत. सदरचा दौरा नियोजित असला तरी जिल्हा बँकेच्या बाबत सातत्याने आक्रमक रित्या आवाज उठवणारे काही संचालक या परदेशी दौऱ्यावर गेले नाहीत. तसेच काही आजी -माजी संचालकांनी यापूर्वी सातारा जिल्हा बँकेमध्ये चाललेल्या कारभाराचे ताशेरे ओढले होते .आता मात्र , राजकीय धुलवडीमध्ये आता सर्वांनीच एकमेकांनी रंग लावल्यामुळे नेमकी कोणत्या रंगाची बाजू घ्यावी? असा बिकट प्रश्न आजी-माजी संचालकांना झाल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. .पूर्वी कुंपण शेत खात होतं असं म्हटलं जात होते. आता कुंपणच नव्हे तर आता बांधावरील गवत सुद्धा आता खाण्यास सुरुवात झाल्याची टीका सर्वसामान्य शेतकरी करीत आहेत. दरम्यान, सातारा जिल्हा बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजून घेता आली नाही.
——————————————————-
छाया – जिल्हा बँक संचालक मंडळाच्या परदेशी दौऱ्याने मिळालेल्या अनुभवाचे पुरस्कार प्राप्त चिन्ह? (छाया- अजित जगताप सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button