वाई:- किसन वीरच्या खेळाडूंची कर्तबगारी महान – दिनानाथ सिंह.
महिला पत्रकार वैष्णवी शिंदे:-9146802009

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
महिला पत्रकार वैष्णवी शिंदे
वाई दि.24 किसन वीरच्या खेळाडूंची कर्तबगारी महान – दिनानाथ सिंह
शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा हिंदकेसरींच्या हस्ते सन्मान…
वाई शहरातील किसन वीर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात केलेली कामगिरी महान आहे. त्यांनी प्राप्त केलेल्या पुरस्कारांची महती आणि संख्या पाहता क्रीडा क्षेत्रात या महाविद्यालयाने दबदबा निर्माण केला आहे. यशामुळे खेळाडूंना महत्व मिळते. ते महत्व जपण्यासोबत वाढविण्याचे काम इथं ज्या ताकदीने होत आहे ते अभिमान वाटावे असे आहे, असे गौरवोद्गार हिंद केसरी दिनानाथ सिंह यांनी वाई येथे काढले.
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून हिंदकेसरी पै. दिनानाथ सिंह बोलत होते. यावेळी महाराष्ट्रकेसरी शिवाजीराव पाचपुते, जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, संचालक श्री. केशवराव पाडळे, खजिनदार प्रा. नारायण चौधरी यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना हिंदकेसरी म्हणाले, की महाराष्ट्राची संस्कृती महान आहे. ती नव्या पिढीने जतन केली पाहिजे. विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता प्रयत्नाची पराकाष्ठा केली तर यशस्वी जीवनाची वाट सापडेल. जीवनात आई, वडील आणि गुरू यांचे आशीर्वाद असल्याशिवाय यशाचे शिखर कोणी गाठू शकत नाही. त्यामुळे आई, वडील आणि गुरूंचा आदर करा.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात मदनदादा म्हणाले, खेळाडू जर देशाच्या गौरवामध्ये भर घालत असतील तर शासनाने त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. यासाठी यापुर्वीही प्रयत्न केले आणि यापुढेही करत राहणार. विद्यार्थ्यांनी परिस्थितीचे कारण पुढे न करता अथक प्रयत्न करणे गरजेचे आहे. खेळाबरोबरच ज्या-ज्या क्षेत्रात विद्यार्थी यशस्वी होतात त्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. स्नेहल मांढरे आणि मयुर रोकडे या दोन विद्यार्थ्यांसह यापूर्वी एकता शिर्के, कालिदास हिरवे या विद्यार्थ्यांना मिळालेला शिवछत्रपती पुरस्कार त्यांच्या कर्तबगारीची दखल घेणारा आहेच शिवाय महाविद्यालयाचा क्रीडा क्षेत्रातील दबदबा वाढवणारा आहे.
प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांनी प्रास्ताविकात, महाविद्यालयाच्या यशामध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे असते असे सांगून यशवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली तर इतरांना त्यातून प्रेरणा मिळते व प्रोत्साहन लाभते, असे नमूद केले.
शिवछत्रपती पुरस्कार विजेती स्नेहल मांढरे म्हणाली, परिस्थिती कितीही बिकट असली तरी गुणवत्ता असेल तर त्याची दखल घेतलीच जाते. माझ्या यशाची पायाभरणी या संस्थेने केली, मदनदादांनी पहिली आर्थिक मदत दिली. पुढे अनेक मदतीचे हात लाभले. आई वडिल व कुटुंबियांनी भक्कम साथ दिली त्यामुळे हे यश असून सर्वांनीच मदत करणार्यांसोबत व आई वडिलांप्रती कायम कृतज्ञ रहावे.
यावेळी शिवछत्रपती पुरस्काराबद्दल स्नेहल मांढरे, मयुर रोकडे यांचा मानपत्र देवून तसेच महाविद्यालयाचे आदर्श विद्यार्थी हर्ष दत्तात्रय बोराटे, सुषमा अजित पिसाळ आणि सर्व बक्षिस प्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रा. डॉ. सुनील सावंत यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. डॉ. हणमंतराव कणसे यांनी शैक्षणिक अहवालाचे, कॅप्टन समीर पवार यांनी क्रीडा अहवालाचे, डॉ. अंबादास सकट यांनी एन.एस.एस. अहवालाचे, डॉ. धनंजय निंबाळकर यांनी कला व सांस्कृतिक अहवालाचे वाचन केले. डॉ. शिवाजी कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंजूषा इंगवले व सौ. रेश्माबानो मुलाणी यांनी केले. मानपत्राचे लेखन राहुल तांबोळी यांनी केले.
कार्यक्रमास माजी प्राचार्य, माजी प्राध्यापक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, सेवक, पालक व विद्यार्थी विद्यार्थिंनी बहुसंख्येने उपस्थित होते.
.. .. . . . . . . . . . . . . . . . . . . .
अश्रूंचा बांध फुटलाः
स्नेहल मांढरे या विद्यार्थिनीने अक्षरश: अडचणींचा पहाड फोडून शिवछत्रपती पुरस्कारापर्यंत धडक मारली. तिच्या याच वाटचालीचा आढावा घेणार्या मानपत्राचे वाचन सुरु असताना स्नेहल, तिचे कुटुंबिय आणि इतर अनेक उपस्थितांसोबत मदनदादा भोसले यांच्याही डोळ्यांमधून जेव्हा पाणी वाहू लागले तेव्हा वातावरण भावपूर्ण झाले. पुढे या भावपूर्ण वातावरणातच स्नेहल मांढरे, मयुर रोकडे व इतर गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.