सातारा:-लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नाव अन्य ठिकाणी देणे योग्य होईल – नरेंद्रदादा पाटील.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नाव अन्य ठिकाणी देणे योग्य होईल – नरेंद्रदादा पाटील.
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांची चौथी राजधानी म्हणून सातारा शहराची देशभरात नव्हे तर जगात ओळख आहे .जगातील एकमेव असा तोफे शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साताऱ्यातील पोवई नाका येथे आहे. या ठिकाणी असलेल्या चौकाला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नाव देण्याचा प्रयत्न होत असल्याच्या बातम्या साताऱ्यात पसरल्याने सर्वसामान्य शिवभक्तांमध्ये असंतोष पसरला आहे. याबाबत सातारा जिल्हा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्रदादा पाटील यांनी सौम्य शब्दात लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नाव अन्य ठिकाणी देणे उचित ठरेल असे प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले आहे.
सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पोवई नाक्यावर तोफा सोबत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. असा पुतळा जगामध्ये फक्त सातारा शहरातच आहे .त्यामुळे या परिसराला सच्चा व निष्ठावंत मावळ्यांनी शिवतीर्थ असे नामकरण केले आहे. सदर चौकाला लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नाव देण्याचा प्रयत्न त्यांचे नातू व पालकमंत्री शंभूराजे यांनी केल्याचे काही वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रसिद्ध झालेली आहे. त्याबाबत अद्यापही पालकमंत्र्यांनी रीतसर लेखी खुलासा केला असला तरी सातारा जिल्ह्यातील सर्वसामान्य मावळे, राजकीय पक्ष व संघटना व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रक बाजीचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर असणाऱ्या व्यक्तीसोबतच काही राजकीय मंडळींनी ही सहभाग नोंदवलेला आहे.
याबाबत शिवसेनेचे आक्रमक नेते व सातारा माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र दादा पाटील यांनी आक्रमक भाषा ऐवजी सौम्य भाषेत आपले मत व्यक्त केले आहे.लोकनेते बाळासाहेब देसाई हे महान व्यक्तिमत्व आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी संस्था व सार्वजनिक बांधकामे उभी करण्यासाठी प्रयत्न केला आहे. आजही अनेक जागेमध्ये कोनशिलावर त्यांचे नाव दिमाखात उभे आहे. हा त्यांच्या कार्याचा गौरव आहे. आदरणीय लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नाव कोयना धरणाला किंवा कराड विमानतळाला देणे उचित ठरणार आहे. त्यामुळे सातारा येथील लोकनेते बाळासाहेब देसाई चौक असा अट्टाहास चुकीचा आहे. आणि तो कुणी करणार नाही. त्यामुळे अन्य ठिकाणी त्यांच्या नाव देणे योग्य ठरेल.सातारा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी पोवई नाका येथील जागेत इतरांचं नाव लोक मान्य करणार नाहीत. असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
दरम्यान सदरच्या नामांतराचा वाद चांगलाच गाजत असून पण या बाबत श्री. शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती, आम आदमी पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पक्ष व इतर पक्षातील दुय्यम व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी निवेदन देण्याचा सपाटा लावलेला आहे. खरं म्हणजे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे यांनी एक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीचा संदर्भ घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून एक वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताने अनेकांना मत प्रदर्शित करण्याची व आपली बाजू मांडण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. मुळातच पोवई नाका परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी अनेक जण येतात. या जागेला छत्रपती शिवाजी महाराज किंबहुना शिवतीर्थ व्यतिरिक्त कुठलेही दुसरे नाव कुणी सहन करणार नाही. त्यामुळे आजोबा व नातू यांचा संदर्भ देवून ग्रामीण भाषेत तिखट शब्दात काहींनी नाव न छापण्याच्या अटीवर रागापोटी मत व्यक्त केले .
दरम्यान, याबाबत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई , शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंत शेलार यांनी शिवतीर्थावर लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने चौक तयार करणे. याबाबतचा समाज माध्यम व वृत्तपत्रात प्रसारित झालेल्या बातम्या चुकीच्या व विपर्यास करून प्रसारित करण्यात आलेले आहेत. असा खुलासा केलेला आहे. सदर प्रसिद्ध झालेल्या बातमीवर विश्वास ठेवू नये असे आवाहन आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली अशी माहिती मिळाली आहे.
_____________________________________
फोटो – पोवई नाका येथील ऐतिहासिक जागा व शिवसेना माजी जिल्हाप्रमुख नरेंद्रदादा पाटील