फलटण:-डॉ.आंबेडकरांनी दिलेल्या शिका,संघटित व्हा व संघर्ष करा या मुलमंत्राचे पालन करा : सेवानिवृत्त न्यायाधीश विठ्ठलराव काकडे
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या शिका,संघटित व्हा व संघर्ष करा या मुलमंत्राचे पालन करा : सेवानिवृत्त न्यायाधीश विठ्ठलराव काकडे
फलटण – (प्रतिनिधी )
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आयुष्यभर विधार्थी म्हणून जगले. प्रसंगी वर्गाच्या बाहेरून शिकत स्वतःला घडवत देशाला राज्यघटना दिली. समाजाचा व स्वतःचा उद्धार करायचा असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका, संघटित व्हा व संघर्ष करा या मूलमंत्राचे पालन करा असे आवाहन सेवानिवृत्त न्यायाधीश विठ्ठलराव काकडे यांनी केले, ते पिंपरद, (ता. फलटण ) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या निमित्ताने फलटण तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्यांच्या गौरव समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्थ जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ, भारतीय बौद्ध महासंघाचे ट्रस्टी अरुण पोळ, कॅप्टन विश्वनाथ गायकवाड, पिंपरद स्कूल कमिटीचे अध्यक्ष जनार्दन भगत, जेष्ठ नेते बाळासाहेब कापसे, विश्वासराव मोरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समितीचे सल्लागार सचिन मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना विठ्ठलराव काकडे म्हणाले की, शिक्षणा शिवाय विचार येणार नाही विचार आल्याशिवाय संघटन होणार नाही व संघटन झाल्याशिवाय संघर्ष करता येणार नाही त्यामुळे स्वतःचा व समाजाचा उद्धार करायचा असेल शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे विठ्ठलराव काकडे म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मोफत शिक्षणाची सोय केली आहे त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. माता रमाईनी ज्या प्रकारे पती डॉ.आंबेडकरांना खंबीर साथ दिली तोच आदर्श घेत आजच्या स्त्रियांनी आपल्या कुटूंबाला साथ देत येणारी पिढी सुसंस्कृत व उच्च शिक्षित करण्याचे ध्येय बाळगावे असे आवाहन यावेळी काकडे यांनी केले.
भगवान बुद्धांनी दिलेल्या त्रिशरण व पंचशील याचे पालन केले तर जगातील दुसऱ्या कोणत्याही तत्त्वज्ञानाचे आपणास गरज लागणार नाही. असे शेवटी विठ्ठलराव काकडे म्हणाले.
पिंपरदच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचा डीजे व फटाके मुक्त भीमजयंती उत्सव हा महाराष्ट्रातील पहिला उपक्रम असेल असे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे विश्वस्त जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांनी सांगतानाच विविध महापुरुषांच्या जयंती मधून वेगवेगळे रंगाचे झेंडे दिसत आहेत मात्र तिरंगा कुठेच का दिसत नाही अशी खंत व्यक्त केली. डॉ.आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या सारख्या महापुरुषांच्या जयंती सर्व समाजाने एकत्र येऊन साजरा करणे हाच खरा लोकशाहीचा आदर्श असेल असे यावेळी बेडकीहाळ म्हणाले.डॉ. आंबेडकरांनी संविधानात दिलेले विचार समाजात रुजवणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेलं असे यावेळी बेडकीहाळ यांनी सांगून धर्म हा आज रस्त्यावर आणला जात असून त्याला वेगवेगळे रंग दिले जात असल्याची खंत व्यक्त केली. सत्य आहे तेच लिहावे व त्याचा प्रसार करावा असे आवाहन सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी पत्रकारांना केल्याचे शेवटी रवींद्र बेडकिहाळ यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेबांनी सर्वस्पर्शी काम केले आहे त्यांनी लोकशाही दिली मात्र राजकीय लोकशाहीने आपला गळा आवळल्याचे सूचक विधान जेष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांनी करतानाच राजकारणात आपला समाज राजकारणात गुरुफ़ुटून गेला असून इतरांना राजकारणात मोठे करण्यात आपला समाज गुंतला असून स्वतःचा राजकीय विचार आपण करत नसल्याची खंत प्रा. आढाव यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन मोरे यांनी करताना भीम जयंतीची संकल्पना विषद करताना, डीजे व फटाके मुक्त जयंती ही अभिनव संकल्पना राबवताना येणाऱ्या काळात समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यावर भर देणं असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ कोलवडकर यांनी केले तर आभार निरज मोरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.
आंबेडकर चळवळीला योगदान दिल्याबद्दल बु. बेबीताई कांबळे, बु. मोहनराव अहिवळे, बु. समुद्रलाल अहिवळे, बु. सूर्यकांत अहिवळे, बु. किसाबाई अहिवळे, बु. बी. टी. जावळे, बु. कुंदन मारुडा, बु. चंद्रकांत अहिवळे, बु. उल्फाताई चव्हाण, यांना मरणोप्रांत गौरवण्यात आले त्यांच्या नातेवाईकांनी गौरवपत्राचा स्वीकार केला तर, हरीश काकडे, विजय येवले, संजय निकाळजे, मधुकर काकडे, मुन्ना शेख, प्रा.रमेश आढाव, दत्ता अहिवळे,शामराव अहिवळे यांना गौरवपत्र देऊन त्यांच्या कार्याचा उचित सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वीज तांत्रिक कामगार युनियनचे सातारा जिल्हा सर्कल अध्यक्ष शरद मोरे, विक्रांत मोरे, विकास मोरे, राजेश भालेराव, प्रसन्न मोरे, समीर मोरे, राहुल मोरे, विकी मोरे, विजय बनसोडे, अमर मोरे, अभिजित मोरे, कुमार मोरे, नितीन मोरे, साजन कांबळे, तेजस मोरे, बापूराव मोरे, विनोद गायकवाड, जय मोरे, पंकज मोरे आदीनी परिश्रम घेतले.
गौरवसन्मान सोहळ्यानंतर पिंपरद गावातून भीम जयंती सोहळ्याची पारंपरिक वाद्यांसह चित्ररथांची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर पाण्याचा सडा मारून संपूर्ण गावातून रांगोळी काढून त्यावर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. या मिरवणुकीत बौद्ध भिक्कू श्रामणेर संघ,महार रेजिमेंटचे सेवानिवृत्त अधिकारी, समता सैनिक दल यांच्या सह पांढऱ्याशुभ्र वस्त्र परिधान करून बौद्ध बांधव मोठया संख्येने सहभागी झाले होते.या मिरवणूकी दरम्यान पिंपरद गावातील मान्यवरांना भारताचे संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली. ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.