दहिवडी:-दुष्काळी माण -खटावला पाणी देण्याचे श्रेय खरं म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांनाच.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
दुष्काळी माण -खटावला पाणी देण्याचे श्रेय खरं म्हणजे सर्वपक्षीय नेत्यांनाच.
दहिवडी दि: सातारा जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता जावली- पाटण- महाबळेश्वरला अतिवृष्टीने तसेच दरड कोसळल्याने आपत्ती येत असते.दुसऱ्या बाजूला माण – फलटण या तीन तालुक्यात भीषण दुष्काळ परिस्थितीने लोकांना स्थलांतरित व्हावे लागले होते. आता सर्व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रयत्नाने व स्थानिक पातळीवर छोट्या- मोठ्या नेते व कार्यकर्त्यांनी केलेल्या संघर्षाला चांगली फळ येत असून हे श्रेय सर्व पक्षालाच आहे. अशा शब्दात माण -खटावची जनता सर्वपक्षीय नेत्यांचे आभार मानत आहेत .
दुष्काळी भागामध्ये बौद्धिक क्षमता मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा व त्यामध्ये कार्यरत असणाऱ्या माण -खटावच्या अधिकाऱ्यांनी आपल्या मातृभूमीसाठी शासकीय आदेश तसेच शासकीय यंत्रणा यांचा पुरेपूर वापर करून दुष्काळ कायमस्वरूपी मिटवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. आज त्यापैकी काही वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत तर काही सध्या कार्यरत आहेत. त्याच पद्धतीने विविध राजकीय पक्ष व संघटनेमध्ये विखुरलेल्या अनेक मान्यवर नेते मंडळींनी दुष्काळ कायमस्वरूपी घालवण्यासाठी जिहे – कठा पुर,टेंभू, उरमोडी, तारळी या योजनेची पायाभरणी केली. खरं म्हणजे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या निर्मितीसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५ साली विशेष प्रयत्न केले. त्याला मोलाची साथ मिळाली ते सर्व शिवसैनिक सध्या अस्तित्वात असले तरी विविध राजकीय पक्षात विखुरले आहेत. त्याच पद्धतीने येथील काही नेत्यांनी सुद्धा पूर्वाश्रमीच्या पक्षाला जय महाराष्ट्र करून इतर पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे जन्मदात्या आईचा गौरव होणे हे खरं म्हणजे मानवी स्वभावाचा गुणधर्म आहे. त्यानंतर आपण पालन पोषण करणाऱ्या अनेक मातांचे आपण आभार मानतो .दुष्काळ घालवण्यासाठी जन्मदात्या राजकीय आई समवेत मावशी, आत्या, बहीण अशा अनेकांचे योगदान लाभलेले आहे. हे नाकारून चालणार नाही.
कायम दुष्काळाची आणि टँकरची मागणी करणाऱ्या माण -खटावला खऱ्या अर्थाने संजीवनी देण्याचे काम हे १९९९ सालानंतर गतिमान झालेले आहे. यामध्ये शिवसेना, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप पक्षाचे योगदान नाकारण्याचा कृतज्ञतापणा कुणी करू नये. कारण, ज्यांच्या श्रेय आहे त्यांना द्यावे लागेल. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भाग हा राजकीय दृष्ट्या दुष्काळीच राहिला होता. परंतु खऱ्या अर्थाने या दुष्काळी माण – खटावला पाणी देण्याचे श्रेय हे खऱ्या अर्थाने माजी आमदार धोंडीराम वाघमारे व भाऊसाहेब गुदगे त्याचप्रमाणे सदाशिव तात्या पोळ ,डॉ. दिलीप येळगावकर , आ.जयकुमार गोरे यांचे खूप मोठे योगदान आहे. हे सुद्धा विसरता येणार नाही . हे सामुदायिक कार्याचे महत्त्व पूर्ण यश लाभले आहे.
जिहे – कठापूर योजनेचे काम पंचवार्षिक पाच निवडणुकांमध्ये जय -पराजय शिकवून गेला. पण पाणी आलं नाही.आजही काही गावांना पाणी मिळत नाही. याची मात्र छातीठोकपणाने कुणीही श्रेय घेत नाही. शेवटी यशस्वी झाल्यानंतर हारतुरे, पुष्पगुच्छ व गुलालाची उधळण होते. पण, ज्यांचे पाण्या वाचून हाल अपेष्टा सुरू आहेत. अशांची अश्रू पुसण्याचे काम जो नेता करतो तोच खरा नेता असतो. आज पाहता उपसा सिंचन योजनेचे पाणी हे शेवटच्या टोकापर्यंत जाण्यासाठी अनेकांनी संघर्ष केला आहे .आतापर्यंत अंदाजे १२०० कोटी रुपये निधी या योजनेसाठी खर्च झाले असले तरी या निधीला खूप मोठी गळती लागलेली आहे. या गळतीचा शोध घेतला तर गाळात अडकलेले अनेक भ्रष्टाचार उघडकीस येतील. वास्तविक पाहता जिहे – कठापूर योजनेचे काम पूर्णत्वास येण्यासाठी अजून काही वर्ष वाट पहावी लागणार आहे. अजूनही आंधळी बोगद्याचे काम पूर्ण झालेले नाही. श्री प्रभू श्रीरामचंद्र यांचा १४ वर्षानंतर वनवास संपला पण, माण -खटावचा वनवास अजूनही संपलेला नाही.
प्रत्येक वेळी प्रशासकीय मान्यता त्यानंतर सुधारित मान्यता असा पाठ शिवनी चा खेळ या भागातील लोकांनी पाहिला आहे. अशा पद्धतीने घोड्याला गाजर दाखवून त्याला पुढे पुढे प्रवास करावयास भाग पाडले जाते तशा पद्धतीने विधानसभा निवडणुकीत अशाच पद्धतीने गाजर दाखवले जाते. वास्तविक पाहता खटाव आणि माण तालुक्यातील सुमारे बावीस हजार एकर क्षेत्र हे सिंचनाखाली येणार आहे. पण आता या क्षेत्रामध्ये आता झाडू झुडपं सुद्धा उगवण्याची क्षमता राहिलेली नाही. तरीसुद्धा एक टी एम सी पाणी अधिकचे मिळणार आहे आणि त्याबाबत शुभारंभ पुन्हा एकदा होत आहे. माण -खटाव तालुक्याला पाणी मिळणे हा तेथील मतदार व नागरिकांचा अधिकार आहे. हा अधिकार डाउनलोड करता येत नाही.तरी ही भव्य दिव्य प्रमाणात मोठा शो केला जात आहे.दुष्काळी जनतेच्या तोंडाला बाहेरून आणलेले हिरवेगार पाने पुसण्याचा प्रयत्न होत आहे. हे खरं म्हणजे दुष्काळी भागातील इतिहासाची मोडतोड आहे. त्याबद्दल येणारा काळ कधीच माफ करणार नाही. प्रत्येक जण हा उगवत्या सूर्याला नमस्कार करणारा नसतो तर ज्या सूर्याने आपल्याला दिवसभर प्रकाश दिला. त्या मावळत्या सूर्यालाही नमस्कार करून त्यांचे आभार मानणे मनाचा मोठेपणा दाखवून दिला जातो.अन्यथा माण -खटावच्या जनतेने आता निश्चय केला आहे . आता खऱ्या अर्थाने माण -खटावचा संघर्ष पेटला आहे . त्यातून आता स्वाभिमानाची ज्योत हीच खऱ्या अर्थाने माण खटावच्या भागाला पाणी देण्यासाठी तेवित राहणार आहे. हे मात्र खरे आहे. त्यामुळे किती ही मोठा गाजावाजा केला. जाहिरातबाजी केली. फटाके वाजवून स्वागत केले तर काही होणार नाही. आता पाणी शिवारात आल्याशिवाय माण- खटावची जनता खरे मानणार नाही. हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज लागणार नाही.