महाबळेश्वर तालुक्यातील पंचक्रोशीच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा निवेदन; तातडीने कारवाईची मागणी.
पत्रकार अनंत जाधव मुंबई जिल्हा उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महाबळेश्वर तालुक्यातील पंचक्रोशीच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा निवेदन; तातडीने कारवाईची मागणी.

मुंबई / महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील पंचक्रोशी परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा माजी विशेष कार्यकारी अधिकारी (S.E.O.) पत्रकार अनंत शंकर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा सविस्तर निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. यापूर्वीही अनेक वर्षांच्या कालावधीत अनेक वेळा निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांना आजही रस्ते, पूल, आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक वाहतुकीच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अनंत जाधव यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले की, सातारा जिल्ह्यात उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री आणि पालकमंत्री असूनही पंचक्रोशीतील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. शासनाने आता तरी या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित निर्णय घ्यावा, अशी त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली.
मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या :
१. झांजवड ते तळेमाळ रस्ता पूर्ण करावा : सुमारे १ किलोमीटरचा हा रस्ता पूर्ण करून संपूर्ण डांबरीकरण करण्यात यावे. त्यामुळे नागरिकांचा सुमारे ७० किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास वाचणार असून वाहतुकीस मोठा दिलासा मिळेल.
२. वाडा कुंभरोशी ते तापोळा रस्ता रुंदीकरण : खड्डेमय झालेल्या या रस्त्याचे तीन पदरी रुंदीकरण करून वाहतूक सुरळीत करावी. तसेच देवळी ते कळमगाव मार्गाचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करावे.
३.चतुरबेट येथील बंधारा बांधणे: मागील अनेक वर्षांपासून वाहून गेलेला चतुरबेट येथील बंधाऱ्याच्या जागी नवीन बंधारा बांधावा अथवा किंवा कोल्हापूर पद्धतीचा (K.T.) बंधारा मंजूर करून बांधण्यात यावा.
४. दुधगाव आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम : आरोग्य उपकेंद्रासाठी निधी मंजूर होऊनही दोन वर्षे उलटली तरी काम सुरू झालेले नाही ते तत्काळ सुरू करण्यात यावे. देशाला स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली तरी अजून नागरिकांना आरोग्यासाठी झगडावे लागत असेल व एका उपकेंद्रासाठी तीन दशके ताटकळत रहावे लागत असेल तर येथील जनतेसाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे.
५. एस.टी. महामंडळाची मिनी बस सेवा सुरू करावी : वाडा कुंभरोशी ते तापोळा दरम्यान दर दोन तासांनी मिनी बस सेवा सुरू करून विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.
अनंत जाधव यांनी निवेदनात नमूद केले की, राज्यात कोट्यवधी रुपयांचे विकास प्रकल्प होत असताना पंचक्रोशीतील नागरिक अजूनही रस्ते, आरोग्य आणि वाहतूक यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित विभागांना आदेश द्यावेत, अशी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जोरदार मागणी केली आहे.
स्थानिक नागरिकांनीही या मागण्यांना पाठिंबा दर्शवित शासनाने विलंब न लावता विकासकामांना गती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पंचक्रोशीतील विकासाच्या दृष्टीने हे निवेदन महत्त्वाचे मानले जात असून, आता शासन कोणती भूमिका घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.




