महाबळेश्वर–तापोळा प्रमुख महामार्गासाठी प्रशासन सज्ज; पर्यायी मार्गाच्या कामाला वेग, १०५ गावांतील नागरिकांनी संयम बाळगावा.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुकाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483

महाबळेश्वर–तापोळा प्रमुख महामार्गासाठी प्रशासन सज्ज; पर्यायी मार्गाच्या कामाला वेग, १०५ गावांतील नागरिकांनी संयम बाळगावा.

महाबळेश्वर तालुका प्रतिनिधी: उत्तम भालेराव महाबळेश्वर, दि. २८ जुलै २०२६ : दिनांक २६/०७/२०२६ पासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर–तापोळा हा १०५ गावांची जीवनवाहिनी असलेला प्रमुख महामार्ग मोठ्या प्रमाणावर खचल्याने काही काळासाठी १०५ गावांचा संपर्क विस्कळीत झाला होता. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आज दुपारी तहसील प्रशासन, वन विभाग, नगरपालिका प्रशासन व १०५ गाव नियोजन समिती यांच्या संयुक्त उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
या बैठकीत रस्ता दररोज खचत असल्याने तात्पुरता पर्यायी मार्ग उपलब्ध करून नागरिकांची गैरसोय दूर करणे, तसेच वाहतूक शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. संबंधित शासकीय यंत्रणांनी तातडीने पर्यायी मार्गाचे काम सुरू केले असून, नागरिकांचा संपर्क पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
बैठकीस सातारा जिल्हा परिषद सदस्य अजीजदादा सपकाळ, पंचायत समिती उपसभापती संजयभाई मोरे, सातारा जिल्हा युवासेना जिल्हाध्यक्ष विशालभाऊ सपकाळ, तालुका प्रमुख गणेश उतेकर, संविधान प्रचारक उत्तम भालेराव, गणेश सपकाळ, सुभाष कारंडे, संपत जाधव,राम सपकाळ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि १०५ गाव नियोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाबळेश्वर–तापोळा हा १०५ गावांचा प्रमुख दळणवळण मार्ग असून माखारिया हायस्कूल ते कारवी आळा या दरम्यान नवीन रस्ता उभारण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. संबंधित विकासकाम लवकरच सुरू होणार असून भविष्यात अधिक सुरक्षित आणि सक्षम रस्ता नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
संविधानाने प्रत्येक नागरिकाला सुरक्षित प्रवासाचा आणि मूलभूत सुविधांचा अधिकार दिला आहे. त्या दृष्टीने प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते समन्वयाने कार्यरत असून, नागरिकांच्या जीविताचे संरक्षण हेच सर्वोच्च कर्तव्य मानून सर्व यंत्रणा कार्य करत आहेत.
१०५ गावांतील सर्व नागरिकांना विनंती आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक तेवढ्याच कारणासाठी प्रवास करावा. पर्यायी मार्गाचे काम वेगाने सुरू असून, लवकरच वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरू करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जनतेने धीर, संयम आणि सहकार्य राखावे, अशी सर्व संबंधित यंत्रणांची संयुक्त विनंती आहे.




