ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सांगलीच्या इतिहासातील शौर्य दिवस 24 जुलै.

प्रतिनिधी:- अभिजीत बल्लाळ कराड :-8421223931

सांगलीच्या इतिहासातील शौर्य दिवस – २४ जुलै
२४ जुलैची ती क्रांतिकारकांची ऐतिहासिक उडी आणि सांगलीतील तुरुंग फोडण्याच्या घटनेला आज ७९ वर्षे पूर्ण होत आहेत. चित्तथरारक असा तो दिवस आणि त्या दिवसाची शौर्यगाथा ही अनोखीच. स्व. वसंतदादा व त्यांच्या सहकारी क्रांतिवीरांच्या रक्ताने रक्तबंभाळ झालेले ते सांगलीचे रस्ते भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पाऊलखुणा होत्या.


२२ जून १९४३ रोजी रात्री वसंतदादा आणि हिंदूराव पाटील सांगली शहरातील जयश्री टॉकीजला सिनेमा पहायला गेले. सिनेमा पाहून रात्री फौजदार गल्लीतील आपल्या मुक्कामावर आले. त्यांच्या शोधासाठी कित्येक दिवसरात्र एक करून कंटाळलेल्या पोलिसांना वसंतदादा फौजदार गल्लीत असल्याची बातमी कुणीतरी दिली. पोलिस सशस्त्र फौजफाटा घेवून फौजदार गल्लीत आले. एकंदर परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा दादांना अंदाज येताच त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन होण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी दादांसह सर्वांना अटक करून सांगलीच्या तुरुंगात नेले.
देशात स्वातंत्र्यासाठी चाललेले क्रांतियुद्ध आणि त्यात स्वतः उतरून लढण्याची त्यांची तळमळ आणि जिद्द यामुळे ते तुरुंगात अडकून पडणे शक्य नव्हते. दादा व क्रांतिवीरांच्या विरोधात खटले दाखल करून त्यांना कडक शिक्षा व्हावी या प्रयत्नात पोलीस होते. तर दादा मात्र कोणत्याही परिस्थितीत तुरुंग फोडून बाहेर पडण्याच्या तयारीला लागले होते. आणि तो दिवस उजाडला..

शनिवार तारीख २४ जुलै १९४३,
दादांचे वकील पाटणकर यांना सेशन्स कोर्टात काम निघाल्याने सोमवार २६ जुलैची तारीख निकालासाठी देण्यात आली. निकाल लागण्यापूर्वीच तुरुंगातून पळून जाण्याचा निर्धार दादांनी केला. दुपारी अडीचच्या सुमारास शौचाचे निमित्त करून दादा खोलीच्या बाहेर पडले. तुरुंगातील इतरही क्रांतिवीर शौचासाठी बाहेर पडले. नियोजनाप्रमाणे सर्व क्रांतीकारी बराकीतून बाहेर आले. दादा, बंदूकधारी पहारेकरी आणि हिंदुराव पाटील सोबत होते त्याच संधीचा फायदा घेत दादांनी पहारेकऱ्यास घट्ट पकडले. हिंदुराव पाटलांनी बंदूक हिसकावून घेतली आणि ते तुरुंगाच्या प्रवेशद्वाराकडे धावले. तुरुंगाच्या तटावरील व घंटीजवळील बंदूकधार्यांकडील बंदूकाही हिसकावून घेण्यात आल्या.
वसंतदादांसह सर्वजण तटाकडे धावत सुटले. तटावर गेले. तटाभोवतीच्या खंदकात भरपूर पाणी होते, त्यामुळे पोहून जाणे सोपे होते. दादांसह सर्वांनी खंदकात उड्या मारल्या. आणि शेवटी हिंदुराव पाटलांनी खंदकात उडी मारली. दुर्दैवाने त्यांची उडी खंदकातील पाण्यात पडण्याऐवजी काठावर पडल्यामुळे त्यांचे दोन्ही पाय मोडले. पाय मोडल्यामुळे त्यांना प्रयत्न करूनही जागचे हालता आले नाही.
बाकी सर्व क्रांतिवीर हवेत गोळीबार करत दादांसोबत सांगलीच्या बाजारात येऊन कृष्णा नदीकडे धावत सुटले. क्रांतिकारकांनी तुरुंग फोडल्यामुळे पोलीस यंत्रणा त्वेषाने पाठलाग करत होती. पुढे हवेत गोळीबार करत बेफाम सुटलेले क्रांतिकारक आणि पाठीमागे धावणारे पोलीस व घोडेस्वार. धावून धावून थकलेले आण्णासाहेब पत्रावळे एका ठिकाणी थांबले. त्यांनी शरणागती पत्करूनही पोलिसांना दया आली नाही. ते गोळीचे शिकार बनले. ते देशासाठी हुतात्मा झाले.
पुढे कृष्णानदीपर्यंत पोहोचलेल्या बाबुराव जाधवांनी नदीत उडी घेतली. पण ते पोलिसांच्या गोळीला बळी पडले. रक्ताने माखलेला त्यांचा देह कृष्णा नदीत वाहून गेला. एका क्रांतिकारकाला कृष्णामाईने आपल्यात सामावून घेतलं. हे सर्व दादांच्या डोळ्यासमोर घडत होते. दादा मात्र मोठ्या हिंमतीने आलेल्या प्रसंगाला सामोरे जात पोलिसांशी लढत होते. त्यांनी एका उंबराच्या झाडाचा आश्रय घेतला. दुर्दैवाने त्यांच्या बंदुकीची कळ खराब झाली. आणि झाडाच्या बुंध्याआड त्यांच्या उघड्या पडलेल्या खांद्यातून गोळी आरपार गेली. दादा रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडले.
त्यांना उपचारासाठी सांगलीच्या सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर दादांच्या जीवाचा धोका टळला. दादांच्या विरोधात न्यायमूर्ती दिवेकर यांच्यापुढे खटला चालला. २१ सप्टेंबर १९४४ रोजी तुरुंग फोडण्याच्या गुन्ह्याखाली दादांना सहा वर्षे कोठडी आणि ५०० रु. दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. आणि दादांना येरवड्याच्या तुरुंगात पाठवण्यात आले.
दादांच्या संघर्षमय आणि खडतर जीवनातील तो एक महत्वाचा टप्पा होता. क्रांतीची मशाल मनात पेटवून ब्रिटिशांविरोधात आंदोलनाचे अग्निकुंड पेटविणाऱ्या सांगलीतील क्रांतिकारकांनी देशात इतिहास घडविला. त्यांनी गाजविलेल्या अनेक शौर्याच्या घटनांनी ब्रिटिश साम्राज्याला हादरवले. यामध्ये स्व. वसंतदादांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगलीचा जेल फोडण्याची घटना सर्वाधिक गाजली. एका चित्रपटातील कथेला शोभेल यापद्धतीने जेल फोडण्याचे नियोजन क्रांतिकारकांनी केलं होतं… आज या घटनेला ७९ वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्त स्व. वसंतदादा पाटील व त्यांच्या सहकारी क्रांतिवीरांना विनम्र अभिवादन.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button