मुंबई:-प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या ‘फिनिक्स’ पक्ष्यांचा ‘वर्षा’वर सन्मान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव..!
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मुंबई:-प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घडलेल्या ‘फिनिक्स’ पक्ष्यांचा ‘वर्षा’वर सन्मान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव..!

मुंबई:-(24 जून 2026)
संकटांवर मात करून शिक्षणाच्या बळावर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या भारतीय जैन संघटना (BJS) संचालित वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाच्या (WERC) माजी विद्यार्थ्यांचा गौरव नुकताच एका विशेष सोहळ्यात करण्यात आला. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी हा भावूक आणि प्रेरणादायी अभिनंदन सत्कार सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला. वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाच्या गेल्या ३२ वर्षांच्या दैदिप्यमान प्रवासात लातूरचे भूकंपग्रस्त, अनाथ, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांतील तसेच आदिवासी समाजातील हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले. आज हे विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करून समाजात मानाचे स्थान मिळवत आहेत. याच यशस्वी विद्यार्थ्यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित श्री. पद्माकर गोरे लिखित ‘फिनिक्स (यशोगाथा)’ या पुस्तकाचे प्रकाशन या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. “प्रतिकूल परिस्थितीवर केवळ शिक्षणाच्या आणि जिद्दीच्या बळावर मात कशी करता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे हे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांची बदललेली जीवनगाथा समाजासाठी नेहमीच दीपस्तंभासारखी काम करेल,” असा सूर याप्रसंगी उमटला. या सोहळ्याला महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, दिव्यज फाउंडेशनच्या संस्थापक श्रीमती अमृता फडणवीस, भारतीय जैन संघटनेचे (BJS) संस्थापक श्री. शांतिलाल मुथ्था, कु. दिविजा फडणवीस, श्री. विलास राठोड आणि BJS च्या मैनेजिंग डायरेक्टर कोमल जैन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिक्षणाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या WERC च्या या शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. हजारो वंचित आणि गरजू विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे हे अवाढव्य सेवाकार्य यशस्वीरीत्या पूर्ण पार पाडण्यात श्री. पंडित राठोड आणि श्री. संचित यादव यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण व मोलाचे सहकार्य लाभले. हा सोहळा केवळ सत्कार सोहळा न राहता, संघर्षातून यशाकडे गेलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासाचा एक अभूतपूर्व उत्सव ठरला.




