कराड:-कराडकरांसाठी दिलासादायक बातमी! बहुप्रतीक्षित ६ पदरी उड्डाणपूल अंतिम टप्प्यात; श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) कराड:-कराडकरांसाठी दिलासादायक बातमी! बहुप्रतीक्षित ६ पदरी उड्डाणपूल अंतिम टप्प्यात; श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश.

कराड दि. २३ : कराड शहरातील वाहतूक कोंडीची दीर्घकालीन समस्या सोडविणारा आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील प्रवास अधिक वेगवान व सुरक्षित करणारा बहुप्रतीक्षित सहापदरी उड्डाणपूल आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. कोल्हापूर नाका परिसरातील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावरील एका बाजूची वाहतूक छोट्या वाहनांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून, त्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या पार्श्वभूमीवर सातारा लोकसभेचे माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सांगितले की, १७ व्या लोकसभेचे सदस्य असताना कराडच्या कोल्हापूर नाका परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन त्यांनी संसदेत सहापदरी उड्डाणपुलाची आग्रही मागणी केली होती. या मागणीची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्काळ दखल घेत प्रकल्पास मंजुरी दिली आणि कामाला गती मिळाली.
श्रीनिवास पाटील म्हणाले की, “गडकरी यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळेच हा महत्त्वाचा प्रकल्प आज पूर्णत्वाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. कराड शहरातील नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि उद्योजक यांना याचा मोठा लाभ होणार आहे.”
या उड्डाणपुलामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून, महामार्गावरील वाहनांचा प्रवास अधिक गतिमान होणार आहे. दररोज हजारो वाहनचालकांचा वेळ व इंधनाची बचत होणार असून, अपघातांचे प्रमाण कमी होण्यासही मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
यावेळी श्रीनिवास पाटील यांनी देशभरात रस्ते, महामार्ग, पूल आणि बोगद्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नितीन गडकरी यांच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी सांगितले की, गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील दळणवळण व्यवस्थेला नवा वेग मिळाला असून, सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने विशेष लक्ष दिले आहे.
तसेच, काही काळापूर्वी गडकरी यांनी कराड भेटीदरम्यान सातारा–शेंद्रे सहापदरी महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण केले होते, याची आठवण करून देत श्रीनिवास पाटील यांनी सातारा जिल्ह्याविषयी गडकरी यांनी दाखवलेली आत्मीयता आणि विकासनिष्ठ भूमिका जिल्हावासी कायम स्मरणात ठेवतील, अशा भावना व्यक्त केल्या.
फोटो ओळ : कराड येथील कोल्हापूर नाका परिसरातील बहुप्रतीक्षित सहापदरी उड्डाणपूल अंतिम टप्प्यात पोहोचला असून, एका बाजूची वाहतूक प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे.
2) कराड:-“कृष्णा हॉस्पिटलची कमाल! माजी सैनिकावर वायरलेस पेसमेकरची यशस्वी शस्त्रक्रिया; १७ लाखांचा अत्याधुनिक उपचार मोफत”

कराड दि. २३ : वैद्यकीय क्षेत्रात मैलाचा दगड ठरलेली आणि अत्यंत गुंतागुंतीची मानली जाणारी पश्चिम महाराष्ट्रातील पहिली ‘ड्युअल चेंबर लीडलेस पेसमेकर’ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये यशस्वीपणे पार पडली. विशेष म्हणजे, साधारणपणे १७ लाख रुपयांपर्यंत खर्च असणारी ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया एका ७१ वर्षीय माजी सैनिक रुग्णावर माजी सैनिक अंशदान आरोग्य योजना अंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली. छातीवर कोणतीही चिरफाड न करता थेट हृदयात वायरलेस उपकरणे बसवण्याचा हा प्रगत प्रयोग यशस्वी करून कृष्णा हॉस्पिटलने आपल्या वैद्यकीय शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
संबंधित ७१ वर्षीय माजी सैनिक रुग्णाला ‘कम्पलीट हार्ट ब्लॉक’ असल्याने पूर्वीच पारंपरिक पेसमेकर बसविण्यात आला होता. मात्र, कालांतराने त्यांच्या छातीच्या दोन्ही बाजूंना वारंवार संसर्ग होऊ लागल्याने डॉक्टरांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. या संसर्गामुळे रुग्णावर यापूर्वी दोनदा शस्त्रक्रियाही कराव्या लागल्या होत्या. अशा अत्यंत संवेदनशील परिस्थितीत पुन्हा पारंपरिक पेसमेकर बसविणे जीवघेणे ठरू शकत होते. त्यामुळे कृष्णा हॉस्पिटलच्या हृदयरोग विभागाने अत्याधुनिक उपचारपद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला.
कृष्णा हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णासाठी ‘दुहेरी कक्ष लीडलेस पेसमेकर’ प्रणालीचा पर्याय निवडला. या तंत्रज्ञानामध्ये छातीवर कोणताही कट न देता, मांडीतील रक्तवाहिनीतून कॅथेटरच्या सहाय्याने थेट हृदयामध्ये सूक्ष्म उपकरणे बसविली जातात. या प्रणालीत हृदयाच्या वरच्या व खालच्या कक्षात दोन स्वतंत्र सूक्ष्म उपकरणे बसवली जातात, जी कोणत्याही वायरशिवाय परस्पर समन्वय साधून हृदयाची नैसर्गिक गती नियंत्रित ठेवतात. पारंपरिक पेसमेकरमधील तारा किंवा छातीवरील शस्त्रक्रियेमुळे होणारा संसर्गाचा धोका यात पूर्णपणे टळतो. या उपचारानंतर रुग्णाला कमी वेदना झाल्या व त्यांचे पुनर्वसन जलद गतीने होऊन त्यांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.
“लीडलेस पेसमेकर तंत्रज्ञान हे हृदयरोग उपचार क्षेत्रातील क्रांती आहे. पेसमेकरशी संबंधित संसर्ग झालेले, रक्तवाहिन्यांत अडथळे असलेले किंवा पारंपरिक पेसमेकरमुळे गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका असलेल्या रुग्णांसाठी ही पद्धत अधिक सुरक्षित आणि वरदान ठरत आहे,” असे डॉ. अभिजीत शेळके (हृदयरोग विभागप्रमुख, कृष्णा हॉस्पिटल) यांनी यावेळी सांगितले.
टीम ‘कृष्णा’चे कौतुक
कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व हृदयरोग विभागप्रमुख डॉ. अभिजीत शेळके यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सोमनाथ, डॉ. प्रशांत पवार, डॉ. रमेश कवडे, कॅथलॅबमधील तांत्रिक कर्मचारी व परिचारिका यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. तसेच, विद्यापीठाचे उपकुलसचिव एस. ए. माशाळकर व सहकाऱ्यांनी ई.सी.एच.एस. योजनेची प्रशासकीय मंजुरी वेळेत मिळवून दिल्यामुळे रुग्णाला १७ लाखांचा उपचार मोफत मिळू शकला.
‘कृष्णा’ : प्रगत इलेक्ट्रोफिजिओलॉजी सेवांचे दक्षिण महाराष्ट्रातील केंद्र
कृष्णा हॉस्पिटलमध्ये गेल्या ११ वर्षांपासून स्वतंत्र ‘इलेक्ट्रोफिजिओलॉजी विभाग’ कार्यरत आहे. या विभागाच्या माध्यमातून सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह उत्तर कर्नाटक आणि गोवा येथील रुग्णांनाही सेवा दिली जाते. येथे इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडी, रेडिओफ्रिक्वेन्सी एब्लेशन, आयसीडी प्रत्यारोपण, सीआरटी उपकरणे यांसारख्या जटिल हृदय गतीविकारांवर अत्यंत परवडणाऱ्या दरात उपचार उपलब्ध आहेत. सुसज्ज कॅथलॅब आणि दर्जेदार पायाभूत सुविधांमुळे कृष्णा हॉस्पिटलने प्रगत हृदयविकार उपचारांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
3) कराड:-१२७ विद्यार्थ्यांनी घडवला योगाचा अद्भुत आविष्कार! हौसाई विद्यालयात मानवी साखळीतून साकारले आंतरराष्ट्रीय योग दिनाचे बोधचिन्ह.

मलकापूर दि. २३ : मलकापूर येथील हौसाई विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन अत्यंत उत्साह, शिस्त आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यंदाच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते विद्यालयातील तब्बल १२७ विद्यार्थ्यांनी मानवी साखळीच्या माध्यमातून साकारलेले आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आकर्षक बोधचिन्ह. विद्यार्थ्यांच्या या कल्पक आणि देखण्या सादरीकरणाने उपस्थितांसह परिसरातील नागरिकांचीही वाहवा मिळवली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शारीरिक शिक्षण शिक्षक ऋषिकेश पोटे यांनी योग दिनाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांना योगाचे आरोग्यदायी फायदे समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगासने, प्राणायाम आणि श्वसनक्रिया शास्त्रोक्त पद्धतीने करून घेतल्या. योगामुळे शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधला जातो तसेच निरोगी जीवनशैलीसाठी योग हा प्रभावी मार्ग असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना योगामुळे शरीराची लवचिकता वाढते, स्नायूंना बळकटी मिळते आणि मानसिक शांतता प्राप्त होते, असे सांगितले. “योग हा केवळ व्यायाम नसून जीवन जगण्याची एक सकारात्मक पद्धत आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय विचारधारेचा संदेश देणारा योग दिन जागतिक ऐक्याचे प्रतीक बनला आहे,” असे ते म्हणाले.
प्राचार्य सतीशकुमार सावळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पवार मॅडम, पाटील मॅडम, बालाजी मुंडे, प्रकाश बाबर, खुरपे सर, नायकवडी सर, धनाजी पाटील, हिंगमिरे मॅडम, सुधाकर कांबळे, रघुनाथ पाटील, चव्हाण सर, विकास शिंगाडे, किरण कुंभार, अशोक साठे आणि महेंद्र आंबवडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
योग ही प्राचीन भारतीय संस्कृतीची जगाला लाभलेली अमूल्य देणगी असून, तिच्या माध्यमातून निरोगी आणि संतुलित जीवनाचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हौसाई विद्यालयातील हा योगोत्सव संस्मरणीय ठरला असून सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.
4) कराड:-मान्सूनची दडी; शेतकरी, सर्वसामान्य आणि प्रशासन तिहेरी संकटात!

कराड | प्रतिनिधी
कराड दि. २३ : राज्यभर मान्सूनने अचानक घेतलेल्या विश्रांतीमुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासन या तिन्ही घटकांसमोर गंभीर आव्हाने उभी ठाकली आहेत. पावसाअभावी खरिपाच्या पिकांवर संकटाचे ढग दाटले असून, दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने महागाईचा भडका उडाला असून पिण्याच्या पाण्याची टंचाईही अधिक गडद होत चालली आहे.
खरिपाच्या हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून बियाणे, खते आणि इतर साहित्य खरेदी करून पेरण्या पूर्ण केल्या होत्या. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने अनेक ठिकाणी पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले असून, आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे.
दुसरीकडे, पावसाअभावी शेतीमालाचे उत्पादन घटण्याची शक्यता निर्माण झाल्याने बाजारपेठेत भाजीपाला, कडधान्ये आणि फळांची आवक कमी झाली आहे. परिणामी घाऊक आणि किरकोळ बाजारात दरवाढ झाली असून, महागाईचा थेट फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. घरगुती खर्चाचे गणित बिघडल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
पावसाच्या कमतरतेमुळे राज्यातील अनेक धरणांमधील जलसाठाही झपाट्याने कमी होत आहे. अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली असून, प्रशासनाला आपत्कालीन उपाययोजना राबवाव्या लागत आहेत. पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये टँकरची संख्या वाढविणे, जलस्रोतांचे नियोजन करणे तसेच जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यावर भर दिला जात आहे.
मान्सूनचे पुनरागमन लवकर न झाल्यास शेती, पाणीपुरवठा आणि महागाईची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांचे लक्ष आकाशाकडे लागून राहिले असून, समाधानकारक पावसाची प्रतीक्षा अधिकच तीव्र झाली आहे.




