वाई:-कृष्णाकाठी उसळणार अध्यात्माचा महापूर! वाईत पहिल्यांदाच ‘लघु कुंभमेळा’; नागा संन्यासी, महामंडलेश्वरांसह लाखो भाविकांची मांदियाळी २१ ते २५ मे दरम्यान महागणपती घाट होणार भगवामय; दक्षिण काशीच्या इतिहासात सुवर्णक्षण.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कृष्णाकाठी उसळणार अध्यात्माचा महापूर!
वाईत पहिल्यांदाच ‘लघु कुंभमेळा’; नागा संन्यासी, महामंडलेश्वरांसह लाखो भाविकांची मांदियाळी
२१ ते २५ मे दरम्यान महागणपती घाट होणार भगवामय; दक्षिण काशीच्या इतिहासात सुवर्णक्षण.

वाई प्रतिनिधी :
वाई, दि. १६ : अनेक ऋषीमुनींची तपोभूमी आणि ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळख असलेल्या वाई शहरात प्रथमच अत्यंत भव्य स्वरूपात ‘लघु कुंभमेळा – २०२६’ चे आयोजन करण्यात आले असून, कृष्णाकाठी भक्ती, अध्यात्म आणि संस्कृतीचा महासागर उसळणार आहे. वाई नगरपरिषद आणि ‘लघु कुंभ सेवा समिती, शक्ती शिवगंगा अटल आश्रम’ यांच्या संयुक्त विद्यमाने २१ ते २५ मे २०२६ या कालावधीत महागणपती घाट येथे हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे.
या संदर्भातील माहिती देण्यासाठी वाई नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत, मदन गोसावी महाराज आणि आयोजकांनी सविस्तर माहिती दिली.
आयोजकांनी सांगितले की, हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यांप्रमाणेच वाईचे धार्मिक महात्म्य जगासमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे. केवळ धार्मिक उत्सव नव्हे, तर भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन आणि तरुण पिढीला साधू-संतांच्या विचारांची ओळख करून देण्याचा हा उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाच दिवस विविध धार्मिक विधी
या सोहळ्याची सुरुवात गुरुवार, २१ मे रोजी गुरुपुष्यामृत योगात छावणी भूमी पूजन आणि छावणी प्रवेशाने होणार आहे. त्यानंतर शुक्रवार, २२ मे रोजी धर्मध्वजा आरोहण, शनिवार, २३ मे रोजी श्री विष्णूयाग व सार्वजनिक हवन, रविवार, २४ मे रोजी हिंदू महासभा व भव्य दीप प्रज्वलन, तर सोमवार, २५ मे रोजी नागा संन्यासींचे पावन स्नान, रथ शोभायात्रा आणि महिला कलश शोभायात्रा असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. दररोज सायंकाळी ६.३० वाजता ‘श्री कृष्णामाई आरती’चे आयोजन करण्यात आले आहे.
नागा संन्यासींसह दिग्गज साधू-संतांची उपस्थिती
या लघु कुंभमेळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे देशभरातून येणारे विविध आखाड्यांचे साधू-संत आणि नागा संन्यासी. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरी जी महाराज, गिरनारचे पीठाधीश्वर, राजस्थान आणि दिल्ली येथील शनी देवस्थानचे पीठाधीश्वर यांच्यासह विविध विद्यांचे जाणकार, हठयोगी, खडेश्वरी, ऊर्ध्वबाहू आणि नागा संन्यासी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. राज्यातील मंत्री, खासदार, आमदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरही उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
लाखो भाविकांसाठी चोख नियोजन
भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने व्यापक नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण परिसरात २४ तास सीसीटीव्हीद्वारे देखरेख ठेवली जाणार असून, स्वतंत्र प्रवेश व निर्गमन मार्ग, लाईव्ह अनाउन्समेंट सिस्टीम आणि आपत्कालीन मार्ग तयार करण्यात आले आहेत. रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि वैद्यकीय मदत केंद्रही सज्ज ठेवण्यात येणार आहे.
याशिवाय साधू-संतांसाठी निवास आणि महाप्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून, जे भाविक प्रत्यक्ष उपस्थित राहू शकणार नाहीत त्यांच्यासाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि युट्युबद्वारे थेट प्रक्षेपणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
“दक्षिण काशीचा ऐतिहासिक क्षण”
“वाईच्या या पवित्र भूमीत येणारा प्रत्येक भाविक सकारात्मक ऊर्जा घेऊन परतेल. हा आपल्या परिसरासाठी ऐतिहासिक क्षण असून, सर्व समाजबांधवांनी सहपरिवार उपस्थित राहून साधू-संतांचे दर्शन घ्यावे आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा,” असे आवाहन नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी केले.




