वाई:-‘उत्कर्ष’च्या प्रत्येक शाखेत आण्णांना भावपूर्ण अभिवादन; सेवाभावी विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-‘उत्कर्ष’च्या प्रत्येक शाखेत आण्णांना भावपूर्ण अभिवादन; सेवाभावी विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार.

वाई : उत्कर्ष पतसंस्था वाईचे संस्थापक तथा दूरदर्शी नेतृत्व म्हणून ओळख असलेले स्व. आनंद (आण्णा) कोल्हापुरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त संस्थेच्या सर्व दहा शाखांमध्ये भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. प्रत्येक शाखेत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व सभासदांनी स्व. आण्णांच्या सेवाभावी आणि समाजाभिमुख विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त केला.
मुख्य शाखेत झालेल्या प्रमुख कार्यक्रमात वातावरण अत्यंत भावूक आणि प्रेरणादायी झाले होते. स्व. आण्णांनी संस्थेच्या स्थापनेपासून सर्वसामान्य नागरिकांना विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमांचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला.
संस्थेच्या चेअरमन सौ. अनुराधा कोल्हापुरे यांनी स्व. आण्णांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, “अपार कष्ट, प्रामाणिकपणा आणि समाजसेवेच्या भावनेतून आण्णांनी उत्कर्ष पतसंस्थेचे रोपटे लावले. आज त्या रोपट्याचा भव्य वटवृक्ष झाला असून हजारो सभासदांचा विश्वास हीच त्यांची खरी कमाई आहे. त्यांनी घालून दिलेल्या मूल्यांवर चालत संस्थेचा विस्तार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
ज्येष्ठ सभासद खंडागळे गुरुजी म्हणाले, “आण्णा हे केवळ संस्थापक नव्हते, तर अनेकांसाठी प्रेरणास्थान होते. त्यांनी जपलेली माणुसकी, प्रामाणिकपणा आणि समाजाप्रती असलेली तळमळ आजही आम्हाला प्रेरणा देते.”
उपस्थित मान्यवरांनीही स्व. आण्णांच्या नेतृत्वामुळे उत्कर्ष पतसंस्था ही केवळ आर्थिक संस्था न राहता सामाजिक बांधिलकी जपणारी विश्वासार्ह चळवळ बनल्याचे नमूद केले. पारदर्शक कारभार, तंत्रज्ञानाचा वापर आणि सामाजिक उपक्रमांतील सक्रिय सहभाग यामुळे संस्थेने वेगळी ओळख निर्माण केली असल्याचेही सांगण्यात आले.
या कार्यक्रमास चेअरमन सौ. अनुराधा कोल्हापुरे, उपाध्यक्ष अॅड. रमेश यादव, संचालक श्री अमर कोल्हापुरे, श्री संजय वाईकर, श्री मदन साळवेकर, श्री सागर मुळे, सौ. मंगला अहिवळे, श्री वैभव फुले, श्री श्रीकांत शिंदे, श्री भूषण तारू, श्री शरद चव्हाण, श्री सलीमभाई बागवान, सौ. अलका घाडगे, सौ. नीला कुलकर्णी, मुख्य व्यवस्थापक श्री प्रकाश पवार, शाखा व्यवस्थापक श्री साजिद मुल्ला तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उत्कर्ष पतसंस्थेच्या सर्व शाखांमध्ये झालेल्या या कार्यक्रमातून स्व. आनंद (आण्णा) कोल्हापुरे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या सेवाभावी, प्रामाणिक आणि समाजकेंद्री कार्यपद्धतीचा वारसा पुढील अनेक वर्षे संस्थेच्या वाटचालीला दिशा देत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
2) वाई:-साळी समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गणपतराव लंटिंगे यांचे निधन.

वाई, दि. १२ : ओझर्डे येथील साळी समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गणपतराव तुकाराम लंटिंगे (वय ८४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने ओझर्डे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वाई येथील अडत व्यापाऱ्याकडे दिवाणजी म्हणून त्यांनी अनेक वर्ष प्रामाणिकपणे काम पाहिले. सामाजिक कार्याची आवड जपत त्यांनी ओझर्डे गावातील सोंगे यात्रा तसेच जिव्हेश्वर समाज जयंती उत्सवात हिरिरीने सहभाग नोंदवला होता.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मोलमजुरी व अर्धकुशल कामे करून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना संस्कारित केले. साधी राहणी, प्रामाणिकपणा आणि समाजकार्याची तळमळ यामुळे त्यांना समाजात मानाचे स्थान होते.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वाई शहर स्वकुळ साळी समाजाचे सचिव रविंद्र लंटिंगे यांचे ते वडील होत.
त्यांच्यावर ओझर्डे येथील सोनेश्वर स्मशानभूमीत मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.




