साताऱ्यात पोलिसांच्या अन्याय विरोधात निवृत्त शिक्षकाची गंभीर तक्रार…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) साताऱ्यात पोलिसांच्या अन्याय विरोधात निवृत्त शिक्षकाची गंभीर तक्रार…

(अजित जगताप)
सातारा दि: शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडवणाऱ्या साताऱ्यातील एका निवृत्त शिक्षकावर सातारा पोलिसांनी अन्याय केला. याबाबत सातारा येथील भरगच्च पत्रकार परिषदेत पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेबद्दलच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. दरम्यान याबाबत अद्यापही सातारा पोलिसांनी कोणताही खुलासा केला नाही. त्यामुळे त्यांच्या सविस्तर खुलाशाची प्रतीक्षा काही जागरूक पत्रकारांना आहे.
याबाबत भटक्या समाजातील निवृत्त शिक्षक
आण्णा शिवाजी पवार राहणार क्षेत्रमाहुली तालुका सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यातील काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. श्री .पवार यांनी उपस्थित पत्रकारांसमोर दावा केला आहे की, त्यांच्या चारचाकी वाहनाची सहा वेळा तोडफोड झाल्यानंतरही मूळ आरोपींवर कारवाई झालेली नाही. आरोपींना पाठीशी घालण्यासाठी पोलिसांनी त्यांना व त्यांच्या भाचा आकाश इंगवले यांच्यावरच जबरदस्तीने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला . त्यांची गावातून धिंड काढण्याची ही धमकी दिली आहे. सातारा पोलीस अधिकाऱ्यांकडून अमानुष मारहाण, जबरदस्तीने सह्या घेणे, तसेच त्यांच्या मुलीला अश्लील व मानसिक त्रासदायक प्रश्न विचारल्याचा आरोप करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षकांकडून अपमानास्पद व धमकीवजा वक्तव्य केल्याचाही उल्लेख तक्रार अर्जात करण्यात आला आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी पवार यांनी केली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पोलिसांच्या विरोधात वाढत्या तक्रारी होत असून विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्या विरोधात आमदार शशिकांत शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी तर थेट पोलीस अधीक्षक यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाचे सत्य जनतेसमोर आणण्यासाठी व पोलिसांची प्रतिमा उजळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असेही काहींनी नमूद केले आहे.
दरम्यान,आता सामान्य माणसाने सुद्धा पोलिसांच्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन तक्रार केली आहे. त्यामुळे ज्यांना सिंघम म्हणून प्रसिद्धी दिली आहेत. असे काही पोलिस अधिकारी चिंगम बनून कायदा सुव्यवस्था राबवण्याऐवजी ती पोलीस ठाण्याच्या बाहेर चिटकून सातारकर यांच्यावर अन्याय करत असल्याची टीका या निमित्त सुरू झालेली आहे. सामान्य माणसांना न्याय देण्याची भूमिका यापूर्वी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी केली होती. आजही चांगले पोलिस अधिकारी आहेत. परंतु त्यांना कायदा व सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये पोस्टिंग मिळत नसल्याची कुजबूज सुरू झालेली आहे.
2) सातारा:-सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सातारा जि. प. सी.ओ श्रीमती नागराजन यांचा गौरव.

(अजित जगताप)
सातारा दि. :
महाराष्ट्र शासनाच्या दीडशे दिवस कार्यालयीन सेवाविषयक बाबींमध्ये पारदर्शक, गतिमान सुप्रशासनाची उद्दिष्टे साध्य केले . यासाठी सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे गौरव करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाविषयक प्रगतीचे मूल्यांकन करण्याकरता दीडशे दिवसाचा सेवाकर्मी कार्यक्रम राबवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे मूल्यांकन करून गुणांकन करण्यात आले. यामध्ये सातारा जिल्हा परिषदेने शंभर टक्के गुण मिळवले आहे. याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचा गौरव करण्यात आला. एक कर्तबगार महिला अधिकारी म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सातारा जिल्ह्यामध्ये बहर आली आहे. स्मार्ट पी एस सी व स्मार्ट शाळा करण्यासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले आहे.
या गौरव सोहळ्याच्या वेळी माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे प्रमुख उपस्थिती होती
सुरुवातीस हा कार्यक्रम दिनांक ६ मे २०२५ ते महात्मा गांधी जयंती दिनांक २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीमध्ये घोषित करण्यात आला होता. तथापि ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थितीमुळे सदर दीडशे दिवसाच्या कार्यक्रमास १० जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
सदर कार्यक्रमाचे मूल्यमापन करून सेवा कर्मी कार्यक्रमांचे गुणांकन करण्यात आले. या गुणांकनामध्ये सातारा जिल्हा परिषदेस ८० पैकी ८० असे शंभर टक्के गुण मिळाले आहेत. सदर सेवा कर्मी कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना विषयक बाबी अद्यावत करणे, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व संवर्गाच्या पदोन्नतीने नियुक्ती देणे, सरळ सेवा नियुक्ती देणे, जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व संवर्गाच्या बिंदू नामावल्या प्रमाणीकरण करून घेणे, जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपा नियुक्ती करणे, कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केंद्र शासनाच्या ऑनलाईन प्रशिक्षण प्लॅटफॉर्म पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून सदर पोर्टल वरील पाच प्रशिक्षणे पूर्ण करणे व सर्व कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक अद्ययावत करणे या बाबींचा समावेश होता.
या सर्व बाबींमध्ये सातारा जिल्हा परिषदेमध्ये उत्कृष्ट कामकाज केल्यामुळे सदर बाबींच्या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या गुणांमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवून सातारा जिल्हा परिषदेने सर्वोत्कृष्ट कामकाज केले आहे.
चौकट —–
सदरच्या सन्मानाबद्दल आनंद वाटत असल्याचे सांगून हा पुरस्कार सातारा जिल्हा परिषदेच्या सर्व खातेप्रमूख, सर्व पंचायत समितींचे गट विकास अधिकारी तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी व जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी यांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. याचप्रमाणे भविष्यात देखील अशा सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर सातारा जिल्हा परिषद शासनामार्फत राबविणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन जिल्हा परिषदेचा नावलौकिक वाढवेल अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली.
3) सातारा:-आर.एस.एस.चे भागवत साताऱ्यात आले आणि सहकार्यवाहना भेटून निघून गेले…

(अजित जगताप)
सातारा दि: संघटन कौशल्य व राष्ट्रहिताची बांधणीआणि कट्टर हिंदुत्ववाद जोपासणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष असते. काल शनिवारी मोठ्या पोलिस बंदोबस्तात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच सहावे सरसंघचालक मोहन भागवत यांनी
साताऱ्यातील संघटनेचे जिल्हा सहकार्यवाह संदीप आठल्ये यांची भेट घेतली. विशेष म्हणजे भाजप पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांना ही बाजूला ठेवण्यात आले होते. संपूर्ण खाजगी दौरा असल्यामुळे अनेकांची भेट नाकारली.
शनिवारी दिनांक २८ मार्च रोजी
सायंकाळी सातारा शहरातील व्यंकट पुरा येथील श्री.आठल्ये यांच्या निवास स्थानी सदिच्छा भेट दिली. मोजकेच पण, निष्ठावंत तीस ते पस्तीस स्वयंसेवकांची गप्पागोष्टी करून त्यांनी घडामोडीचा कानोसा घेतला. सामान्य सातारकरांच्या अपेक्षा आणि सरकारचे धोरण याचीही माहिती घेतली. अत्यंत गोपनीय दौऱ्यामुळे प्रसारमाध्यमांनाही त्याची कल्पना दिली नाही.
सुमारे तासभर साताऱ्यात असूनही त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यां व्यतिरिक्त कोणाची भेट घेतली नाही. किंबहुना आपल्या दौऱ्यामुळे इतर कुणालाही त्रास होऊ नये. याचीही त्यांच्या पोलीस बंदोबस्त ताफ्याने काळजी घेतली होती.
सायंकाळी गजबजलेल्या सातारा शहरातील व्यंकटपुरा येथे अचानक पोलिसांचा ताफा आल्यामुळे स्थानिक लोकांनाही नवल वाटले होते. राष्ट्रीय स्वयं संघाचे सहकार्यवाह श्री सुहास आठल्ये हे सर्वांच्या परिचित आहेत. संघटनेच्या कामकाजातून त्यांनी आपली गेले अनेक वर्षांपासून ओळख निर्माण केली आहे. साक्षात सर संघचालक मोहन भागवत यांच्या आगमनाने संघाचे सर्वच उपस्थित कार्यकर्ते सुखावले होते. पंधरा वर्षांपूर्वी सातारा येथील कोटेश्वर मंदिरात सरसंघचालक मोहन भागवत यांची धावती भेट झाली होती. त्यानंतर ते प्रथमच भाजपची सत्ता आल्यानंतर साताऱ्यात येऊन सुद्धा कोणालाही भेटले नाहीत. फक्त संघटनेच्या मोजक्याच सदस्यांना त्यांनी भेट घेऊन मार्गदर्शन केले.
कर्नाटक राज्यातील बेळगाव नजीकच्या चिक्कोडी येथील लिंगायत समाजाचा कार्यक्रम आटोपून ते शनिवारी २८ मार्च रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहन भागवत व त्यांचा बंदोबस्ताचा ताफा सातारा शहरात आला होता. पुण्याला जाताना सातारा
शहरातील व्यंकटपुरा पेठेत राहणारे
संघाचे सातारा जिल्हा सहकार्यवाहक
संदीप आठले यांच्या घरी भेट घेण्यासाठी व संध्याकाळच्या भोजनासाठी ते खास आले होते. त्यांनी साधे भोजन म्हणजेच थालीपीठ
आणि दहीभात खाऊन समाधान व्यक्त केले. त्यानंतर सव्वा सात वाजता कडक पोलीस बंदोबस्तात ते पुण्याकडे रवाना झाले.
त्यांच्या भेटीदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये. यासाठी काही स्थानिक रहिवाशांना आधीच सातारा पोलिसांकडून सूचना
तसेच केवळ रहिवाशांसाठी विशेष
पासेसही जारी केले होते.
सरसंघचालक श्री मोहन भागवत यांच्या धावत्या दौऱ्यामुळे व्यंकटपुऱ्यातील श्री. आठल्ये यांचे शेजारी राहणाऱ्या इमारतीतील रहिवाशांना दर्शन झाले. अशी माहिती रहिवाशांनी दिली.




