कणकवली:-“शिकारीच्या बहाण्याने थरारक कट! कणकवलीत बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुकादमसह तिघे पोलिसांच्या ताब्यात”
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) “शिकारीच्या बहाण्याने थरारक कट! कणकवलीत बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या; मुकादमसह तिघे पोलिसांच्या ताब्यात”
जिल्हा प्रतिनिधी शैलेश मेस्त्री
कणकवली : शहरातील प्रतिथयश बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी वेगवान कारवाई करत मुख्य संशयिताला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, सुशांत दळवी हे गुरुवारी रात्री त्यांच्या मुकादम अमर सत्यवान कदम (वय 19, ओरोस-डोंगरेवाडी) याच्यासोबत शिकारीसाठी गेले होते. याच दरम्यान काही कारणावरून अमरने सुशांत यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळी झाडून त्यांची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली आणि अमर कदम याला ताब्यात घेत कसून चौकशी सुरू केली आहे. या तपासादरम्यान पोलिसांनी गावठी कट्ट्यासदृश्य हत्यारही जप्त केले आहे.
या प्रकरणात अमर कदम याच्यासोबत आणखी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, खूनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस विविध अँगलने तपास करत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे कणकवली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
2) कणकवली रेल्वे स्थानकाचा विकास वेगात; सरकत्या जिन्याचे भूमिपूजन व वातानुकूलित कक्षाचे उद्घाटन उत्साहात.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली रेल्वे स्थानकाच्या विकासाला गती देणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमांचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला. मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सरकत्या जिन्याच्या (एस्कलेटर) कामाचे भूमिपूजन तसेच नव्याने उभारण्यात आलेल्या वातानुकूलित कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये आमदार निरंजन डावखरे, कोकण रेल्वेचे डीओ सुनील गुप्ता, अधिकारी शैलेंद्र बापट, शैलेश आंबोडकर, प्रशांत गाड, सुनील नारकर, तसेच आरपीएफचे कोकण विभागीय आयुक्त यश मिश्रा यांचा समावेश होता. याशिवाय अधिकारी गोकुळ सोनोल, कणकवली रेल्वे स्थानकाचे आरपीएफ पोलीस निरीक्षक राजेश सुरवाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक गणेश उर्फ बंडू हर्णे, संध्या तरसे यांच्यासह कोकण रेल्वे व आरपीएफचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी कणकवली रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. प्रवाशांच्या सोयीसाठी सरकत्या जिन्याची सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार असून वातानुकूलित कक्षामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी सेवा मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे कणकवली रेल्वे स्थानकाच्या सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होणार आहे.
3) सिंधुदुर्ग:-सुशांत दळवी हत्या प्रकरणात नवे वळण; पोलिसांच्या भूमिकेवर माजी आमदारांचा गंभीर सवाल
कणकवलीत पत्रकार परिषदेत आरोपांची सरबत्ती; सखोल तपासाची मागणी तीव्र.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशांत दळवी हत्या प्रकरणाला आता नवे वळण मिळत असून या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेबाबत गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. “शिकारीच्या नावाखाली प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न होत आहे,” असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला.
कणकवली येथील विजय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वैभव नाईक यांनी धक्कादायक गौफ्यस्फोट करत सांगितले की, सुशांत दळवी यांना काही दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षातील एका नेत्याकडून धमकी देण्यात आली होती. त्यामुळे या हत्येमागे मोठे षडयंत्र असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर यांनीही सिंधुदुर्ग पोलिसांवर थेट निशाणा साधला. पोलिस दबावाखाली काम करत असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, या प्रकरणातील तपासावर जनतेचा विश्वास उरलेला नाही. पोलिसांनी अटक केलेला आरोपी हा खरा मुख्य आरोपी नसून या प्रकरणामागे दुसराच सूत्रधार असू शकतो, अशी चर्चा जनतेमध्ये सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या प्रकरणात एका सरकारी वकिलाने माध्यमांना आरोपीसंदर्भात माहिती दिल्यामुळे संशय अधिकच बळावल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा सखोल आणि निष्पक्ष तपास करण्याची मागणी त्यांनी केली.
सुशांत दळवी हा शिवसैनिक असल्याचे नमूद करत, त्याला न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही दोन्ही माजी आमदारांनी दिला. या प्रकरणामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





