धोम:-(वाई)-श्री नरसिंह हायस्कूल, धोम येथे नवीन क्रीडा सुविधा व इमारतींचे भव्य उद्घाटन.
पत्रकार रेखा येवले सातारा जिल्हा महिला उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) धोम:-(वाई)-श्री नरसिंह हायस्कूल, धोम येथे नवीन क्रीडा सुविधा व इमारतींचे भव्य उद्घाटन.

सातारा प्रतिनिधी रेखा येवले
धोम (ता. वाई) :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित श्री नरसिंह हायस्कूल, धोम येथे सातारा जिल्हा शासकीय क्रीडा अनुदानातून उभारण्यात आलेल्या संरक्षण भिंत, स्वच्छतागृह, प्रेक्षक गॅलरी तसेच मुख्याध्यापक कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे माजी सहसचिव व माजी प्राचार्य राजेंद्र शेजवळ सर उपस्थित होते, तर विशेष अतिथी म्हणून व्यवस्थापन मंडळाचे सदस्य महेशजी गायकवाड यांनी उपस्थिती लावली.
यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत पोळ, सल्लागार समितीचे उपाध्यक्ष अशोक आप्पा मराठे, तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव गायकवाड, माजी अध्यक्ष रामचंद्र पोळ, प्रकाश पोळ, वरखडवाडीचे माजी सरपंच किसन नाना वरखडे तसेच राष्ट्रीय व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांचे पंच अंकुश नाना वरखडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षकवृंदांनी मोलाचे सहकार्य केले. यामध्ये चंद्रकांत धोंगडे, वैभव देसाई, अमर वसावे, सौ. संगीता देसाई, कु. उमा येवले, कृष्णा कांबळे, नाना चिंचकर व संदीप म्हाळुंकर यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दत्तात्रय देसाई यांनी केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख कृष्ण कांबळे यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर आभार प्रदर्शन धोंगडे सर यांनी केले.
याच कार्यक्रमादरम्यान धोम गावच्या माजी केंद्र प्रमुख सौ. सुमन पोळ यांनी विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विद्यालयाला एक संगणक संच देण्याची घोषणा केली. त्यांच्या या उदार योगदानाबद्दल विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले.
एकूणच, या नवीन सुविधा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या ठरणार असून, विद्यालयाच्या प्रगतीच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
2) चिखली:-ज्यांनी आयुष्यभर समाजासाठी झटले, त्यांना गावकऱ्यांचा अखेरचा सलाम.

सातारा प्रतिनिधी अनिल वाडकर
वाई तालुका | प्रतिनिधी
वाई तालुक्यातील चिखली गावातील ज्येष्ठ व जाणते समाजकार्यकर्ते आदरणीय अमृता वाडकर यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दिनांक 27 मार्च 2026 रोजी दुपारी 2 वाजता राहत्या वाडकरवाडी येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.
स्वर्गीय वाडकर हे त्यांच्या सामाजिक कार्यामुळे गावात सर्वांच्या परिचयाचे व आदरणीय व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी आयुष्यभर समाजसेवेचा ध्यास घेत अनेक उपक्रमांद्वारे गावाच्या विकासात मोलाचे योगदान दिले होते.
अंत्यविधीच्या वेळी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कार्याची आठवण जागवली.
त्यांच्या निधनाने चिखली गावावर शोककळा पसरली असून, एक कर्तृत्ववान समाजसेवक हरपल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.




