सातारा:-फटाके- गुलाल आणि ढोल ताशा तयार पण जि. प. नूतन अध्यक्षाचा पत्ता नाही..
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) फटाके- गुलाल आणि ढोल ताशा तयार पण जि. प. नूतन अध्यक्षाचा पत्ता नाही..

(अजित जगताप).
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर गेली महिनाभर प्रतीक्षेत असलेल्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची धुरा कोणाच्या गळ्यात पडणार? हे गुलदस्त्यात आहे. अनेक तर्कवितर्क लढवले जात असले तरी अद्याप कोणत्या पक्षाचा कोण अध्यक्ष होणार? हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. त्यामुळे गुलाल- फटाके- ढोल ताशा तयार आहे पण अध्यक्षाचा पत्ता नाही. राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांची खूप इच्छा आहे पण नेत्यांनाही आदल्या दिवसापर्यंत गणित सोडवता आले नाही. हे सुद्धा स्पष्ट झाले आहे. सातारा जिल्हा परिषदेमध्ये एकूण ६५ सदस्यांच्या विचार विनिमय करून अध्यक्ष पद मिळणार आहे. इतर मागासवर्गीय महिलांसाठी अध्यक्ष पद राखीव झाल्यामुळे कुणबी मराठा प्रमाणपत्र नव्याने काढण्यात आलेल्या धनदांडग्यांना अध्यक्ष पद मिळावे. म्हणून काही सुपारी बहाद्दूर व ठराविक ठेकेदार व प्रस्थापित मंडळी सज्ज झालेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला मूळच्या इतर मागासवर्गीय समाजातून निवडून आलेल्या सदस्यांना फलटण पंचायत समितीच्या निवडणुकीत डावलले गेलेले आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीय समाजामध्ये नाराजी पसरली आहे. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होईल की प्रस्थापित कुणबी मराठा महिलेला संधी मिळेल? याबाबत आता उत्सुकता लागलेली आहे. सातारा जिल्ह्यात तिन्ही पक्षाकडे इतर मागासवर्गीय जातीच्या महिला निवडून आलेल्या आहेत. इतर मागासवर्गीयांमध्ये मूळचे कुणबी मराठा आहे. त्यांना संधी द्यावी. पण संधीसाधून संधी मिळाल्यास गोरगरीब कुणबी मराठा समाजावर सुद्धा इतर मागासवर्गीयांसारखा अन्याय होऊ नये. अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे. फलटण तालुक्यात फलटण पंचायत समिती सभापतीच्या निवडीत इतर मागासवर्गीय नाराज झालेले आहेत. सत्तेची जोडणी केल्यामुळे त्यांना स्वातंत्र्य विचार करता येत नाही. त्यामुळे काही तर मागासवर्गीय कार्यकर्ते व सदस्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. काही इतर मागासवर्गीय निवडून आलेले आम्ही मराठा समाजामुळेच निवडून आलो. असे छाती ठोक पणाने सांगत आहे. त्यांचे म्हणणे खरे आहे. कारण, अद्याप इतर मागासवर्गीय समाजामध्ये जनजागृती झालेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घुसखोरी सुरू आहे. हे सुद्धा आता लपून राहिलेले नाही. सातारा जिल्हा परिषदेमध्ये महायुतीतील सत्ताधारी भाजप जिल्हा परिषदेमध्ये शिरकाव करण्यासाठी डावपेच खेळत आहेत. खटाव, कोरेगाव आणि सातारा तालुक्यातील काही शिवसेना व राष्ट्रवादी मधील काही जिल्हा परिषद सदस्य हाताला लागल्याची अफवा सुरू झालेली आहे. त्याला अद्यापही दुजोरा मिळालेला नाही. सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजप २७ राष्ट्रवादी २० शिवसेना १५ काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना, अपक्ष प्रत्येकी एक असे बलाबल आहे. ३३ हा बहुमताचा आकडा फारसा लांब नाही. शिवसेना व राष्ट्रवादीने एकत्र निवडणूक लढल्यामुळे खऱ्या अर्थानं नैसर्गिकरीत्या अध्यक्ष- उपाध्यक्ष पदाचे ते खरे दावेदार आहेत. या निर्णायक क्षणी जावळी पॅटर्न सारखा धोकादायक प्रकार घडू नये. याची आता काळजी घ्यावी लागणार आहे. शुक्रवार दिनांक २० मार्च रोजी महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह वर्धापन दिन आहे. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पिण्याच्या पाण्यासाठी लढा दिला होता. आता लोकशाही व संविधान बचाव करण्यासाठी सदविवेक बुद्धीने जिल्हा परिषद सदस्यांनी निवडी करताना मतदान करावे. असे आवाहन पुरोगामी कार्यकर्त्यांनी केले आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा जपायचा असेल. तर खऱ्या अर्थाने मतदारांनी दिलेला कौल मान्य करणे हिताचे आहे. अन्यथा निवडणुका येतील व जातील पण राजकारणातील टपका कधी पुसला जाणार नाही याची सुद्धा नोंद घ्यावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान सहलीवरून आलेल्या सर्व सन्माननीय सदस्य व त्यांच्या नातेवाईकांनी आता विकास कामाकडे लक्ष द्यावे. आता त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी मतदान केल्यानंतर साधं चहा पाण्याला सुद्धा कोणी बोलवणार नाही. हे त्यांनी विसरू नये. असेही काहींनी सांगितले आहे.
2) कलेढोण:-तरसवाडी गारुडी भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान …

अजित जगताप
कलेढोण दि: सातारा- सांगली जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेल्या तरसवाडी- गारुडी भागात गुढीपाडव्याच्या सणाला अवकाळी पावसाने थैमान घातले. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याबाबत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केलेली आहे.

वर्षाचा पहिला हिंदू सण म्हणून गुढीपाडव्याची जय्यत तयारी सुरू असतानाच अवकाळी पावसाने थैमान घातले. विजेच्या कडकडासह गारा व वाऱ्यासह पाऊस कोसळल्याने तरसवाडी व गारुडी गावात शिवारामध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले. पाळीव गुरांच्या गोठ्यात सुद्धा पाणी साचले. उभ्या असलेल्या ज्वारी ,बाजरी भुई सपाट झाली. त्याचबरोबर डाळिंब- झेंडू या पिकांचे नुकसान झालेले आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शिवारातील काढणीला आलेला गहू काढल्या असल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला असला तरी अनेकांच्या कडबा व गवताच्या गंजी वादळ वाऱ्याने पसरून गेलेले आहेत.
काही ठिकाणी किरकोळ घराची पडझड झाली असून याबाबत महसूल विभागाने तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी नूतन जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश पाटील, गारुडी गावचे माजी सरपंच नागेश सरगर, प्रगतशील शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र पवार,उपसरपंच अनिल पवार, तुकाराम घुटुकडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केलेले आहे.
सांगली व सातारा जिल्ह्याच्या सीमेरेषेवर असलेल्या अनेक शेतकरी अल्पभूधारक आहे. काहींचे शेतीवर उदरनिर्वाह आहे. त्यांना आता सरकारी मदतीशिवाय पर्याय राहिलेले नाही. सुमारे सव्वाशे ते दीडशे हेक्टर क्षेत्राला अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. सध्या ज्वारी चार हजार क्विंटल व बाजरी तीन हजार क्विंटल दराने विक्री केली जात आहे. शासनाच्या धोरणानुसार मजुरीच्या निम्म्या सुद्धा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार नाही. अशी शंका घेतली जात आहे. आसमानी व सुलतानी संकटामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे .
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांना संकटासमयी दिलासा देण्यासाठी विमा उतरवला आहे. आता या विम्याची रक्कम केव्हा मिळणार? त्याबाबत निश्चित धोरण काय आहे? हे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन जिल्हा बँकेतून निवडून आलेल्या या भागातील संचालकांनी सांगावे. असं शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. त्यांना दिलासा देण्याचे काम आता सामाजिक संस्था तसेच जिल्हा बँक व सहकारी संस्थेने आणि शासनाने करावे. अशी ही मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान ,शासनाच्या निकषाप्रमाणे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई दिली जाईल असे महसूल व कृषी विभागकडून सांगण्यात आले.




