जावळी तालुक्यात नऊ जागेसाठी ६२ टक्के मतदान.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

जावळी तालुक्यात नऊ जागेसाठी ६२ टक्के मतदान.

मेढा दि: नैसर्गिक वरदान लाभलेल्या जावळी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद आणि सहा जावळी पंचायत समितीच्या जागेसाठी शांततेत मतदान पार पाडले. सरासरी ६२ टक्के मतदान झाले आहे. मतदान केलेल्या यंत्रणा मेढा या ठिकाणी आणण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्तात युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झालेले आहेत.
जावळी तालुक्यात कुसुंबी, कुडाळ, म्हसवे जिल्हा परिषद गट व जावळी पंचायत समिती सहा जागेसाठी कुसुंबी, आंबेघर, सायगाव, कुडाळ, म्हसवे व खर्शी बारामुरे गणात निवडणुकीत ६२ टक्के मतदान झाले. तालुक्यात एकूण १५४ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया दुपारपर्यंत वाढली होती. जावळी तालुक्यातील सुमारे ९२ हजार मतदारांपैकी सुमारे ५७ हजार मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. परगावातील मतदारांसाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे मताची टक्केवारी वाढण्यास मदत झाली. कुसुंबी व म्हसवे गटात चांगलीच चुरस पाहण्यास मिळाली. पण, कुडाळ गटात फारसा विरोध दिसून आला नसला तरी कुडाळ गणात तुल्यबळ लढत पहाण्यास मिळाली. सायगाव गणातील मेढा – सातारा रस्त्यावर गणाचे उमेदवार हे बिभवी गावातील असल्याने येथील मतदानाबाबत उत्सुकता लागली आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी राजश्री मोरे व सहाय्यक निवडणूक अधिकारी दत्ता जावळीचे तहसीलदार प्रविण मुदुगुल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने चोख नियोजन केले होते. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या सह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तालुक्यात एकूण १०३४ कर्मचारी व २३ क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. सकाळपासून सायंकाळपर्यंत सर्व मतदान केंद्रांवर शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात मतदान झाले. कोणताही अनुचित प्रकार किंवा तणावाची घटना घडली नाही. दोन्ही गटाचे समर्थक व कार्यकर्ते आपापल्या ओळखीच्या मतदारांपर्यंत निवडणूक चिन्ह पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते. त्याबाबतही कुणीही तक्रार केली नाही.
या निवडणुकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे, नरेंद्र पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, दगडू सपकाळ यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले होते.




