वाई:- ज्ञान अमूल्य आहे ते लुटता येत नाही.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई : दि. 13
ज्ञान अमूल्य आहे ते लुटता येत नाही.
मा. डॉ. उदय निरगुडकर
वाई दि. १२/०७/२०२५ “चांगलं बीज पेरलं की चांगलं रोप उगवतं,” याचा उत्तम नमुना म्हणजे जनता शिक्षण संस्था. संस्थेच्या ‘जय किसान मुलांचे वसतिगृह’ मधून घडलेला विद्यार्थी सोमनाथ सानप, याचे उदाहरण देताना शिक्षण संस्थांच्या समाजरचना बदलण्याच्या सामर्थ्यावर ड.निरगुडकर यांनी विश्वास व्यक्त केला. तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीचा उल्लेख करताना, तंत्रज्ञान हे शिक्षणाला केवळ साधन म्हणून नव्हे, तर एक नवा दृष्टिकोन देत असते. मात्र, शिक्षण पद्धती फक्त तांत्रिक ज्ञानापुरती मर्यादित राहता कामा नये, तर मूल्यसंस्कार, चारित्र्य, आणि समाजभावनेची जोपासना करणारे असावे, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार, प्रसिद्ध लेखक व वक्ते डॉ. उदय निरगुडकर यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती .
डॉ. निरगुडकर म्हणाले, देशाच्या विकासात केवळ भौतिक साधनांचा नव्हे, तर सामाजिक संस्कारांचा फार मोठा वाटा असतो, जपानच्या उदाहरणातून त्यांनी शिस्त, स्वच्छता आणि एकत्र कुटुंब पद्धती यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना उद्देशून ते म्हणाले की, शिक्षक हे चॅम्पियन नसले तरी, चॅम्पियन घडवणारे गुरुजन आहेत. तसेच, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांची आकलनशक्ती कमी होत चालली आहे, ही बाब त्यांनी गंभीरतेने मांडली. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञाननिष्ठा आणि मूल्यनिष्ठा निर्माण करणे हेच नव्या शैक्षणिक धोरणाचे खरे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षणव्यवस्थेतील सध्याच्या समस्यांवर आणि भविष्यातील दिशानिर्देशांवरील त्यांचे मत विचारप्रवृत्त करणारे होते. त्यांनी ठामपणे सांगितले की, “शाळा हे प्रयोगाचे आणि स्वप्नांचे माहेरघर असले पाहिजे. अभ्यासक्रम स्थिर असला, तरी विद्यार्थी सतत बदलत असतात, म्हणून अध्यापन अद्ययावत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.” भाषणाचा समारोप करताना ते म्हणाले, “ज्ञान हे लुटता येत नाही. आक्रमण करून संपत्ती लुटता येते, परंतु ज्ञान अमूल्य आहे. शिक्षक हा समाजाचा सेवक असून, त्याच्याकडे समाज घडवण्याची खरी किल्ली असते.”
अध्यक्षीय मनोगतात मा. मदनदादा भोसले संस्थेच्या स्थापनेपासूनचा प्रेरणादायी प्रवास सांगताना म्हणाले, १९६० साली महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर शिक्षणाची गरज ओळखून तत्कालीन मंडळींनी जमिनी गहाण ठेवत संस्थेची उभारणी केली. आज बदलत्या काळात कौशल्याधिष्ठित शिक्षणाची गरज अधिक असल्याचे स्पष्ट करून त्यांनी नव्या वाटचालीचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला संस्थेचे सचिव डॉ. चौधरी यांनी प्रास्ताविकामध्ये जनता शिक्षण संस्थेची जडणघडण कशी झाली हे सांगताना संस्थेची स्थापना बहुजन समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी झाल्याचे सांगत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, देशभक्त किसन वीर आणि आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांची संस्था स्थापनेमागील दूरदृष्टी अधोरेखित केली. संस्थेच्या वाटचालीत आदरणीय भाऊंच्या दूरदर्शी नेतृत्वाचे आणि काळानुरूप बदलांचे महत्व अधोरेखित करताना त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या “जय किसान मुलांचे वसतिगृह” या उपक्रमाचा विशेष उल्लेख करत विद्यमान अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या नेतृत्वाखाली संस्थेत कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आणि प्राध्यापक सोमनाथ सानप याने बीड ते जय किसान मुलांचे वसतिगृह पर्यंतची वाटचाल सांगितली. आदरणीय भाऊंच्या आशीर्वादाने आणि जनता शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ५ वर्षे विद्यार्थी ते प्राध्यापक हा प्रवास सांगताना त्याने या यशाचे सर्व श्रेय आदरणीय भाऊ आणि जनता शिक्षण संस्थेला दिले. सानप यांच्या प्रवासाची वाटचाल ऐकताना उपस्थित भारावून गेले.
संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी त्यांचे पालक आणि मुख्याध्यापक यांचा सत्कार प्रमुख पाहुणे मा. डॉ. उदय निरगुडकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. प्राचार्य डॉ. फगरे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली, उपप्राचार्य बाळासाहेब कोकरे यांनी आभार मानले तर डॉ. मंजुषा इंगवले आणि प्रा. दिपाली चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमप्रसंगी जनता शिक्षण संस्था संचलित सर्व माध्यमिक शाळांमधील तसेच किसन वीर महाविद्यालयाच्या कनिष्ठ व वरिष्ठ शाखेतील आजी- माजी प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.