श्रीरामपूर:-“धरण उशाला अन् कोरड घशाला”

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
“धरण उशाला अन् कोरड घशाला”
नुकताच हिवाळा संपलाय, उन्हाळा सुरू झालेला आहे.
अजून पाणी टंचाईच्या तीव्र झळा बसत नसल्या तरी मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर येथील नागरिकांना किमान सहासात दिवसांनी पाणी मिळते म्हणतात! बीडकरांना दहापंधरा दिवसांनंतर, बदनापूर पंधरावीस दिवसानंतर,ते सुद्धा स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी नाथसागर निर्माण करून ठेवला म्हणून आज शक्य झालेलं आहे.तथापि जिल्ह्यातील अनेक वाड्यावस्त्यांवर खेड्यातील गांववस्तींवर पाणी टंचाईचे सावट दिवसागणिक पसरत आहे.तेव्हा पाणी टंचाई म्हणजे आमच्या मराठवाड्याच्या पाचवीला पुंजलेले एक शुक्लकाष्ठ आहे! त्यावर शासन प्रशासन अलगदपणे मौन बाळगून असते, अन् उगवला दिवस घालवायचं काम चालू असतं.यदाकदाचित पाणी टंचाईबाबत आरडाओरड झाली, अन् पाणी मिळावे म्हणून नागरिकांकडून मागणी करण्यात आली असेल तर लगेचच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची तात्पुरती उपाययोजना योजना सुरू केली जाते.लोकांचा आवाज दाबला जातो,लोकांना तेवढ्या काळासाठी शांत केले जाते.आणि मग यातून फक्त मराठवाड्याचा टँकरवाडा आजवर निर्माण होऊ शकलेला आहे, दुसरे तरी काय?परंतु त्यावर अजून काही कायमस्वरुपी तोडगा काढल्या जात नाही.जेथे पिण्यासाठी परेसे पाणी नसते, त्या भागात शेती सिंचनासाठी कोण कोणाला काय म्हणणार? शेतकरी आत्महत्याग्रस्त होतोय.सुशिक्षित तरुण रोजगाराअभावी आमच्या राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते म्हणून पुढा-यांच्या अवतीभवती फिरताना दिसतात! अशावेळी लोकप्रतिनिधींना फक्त आपला पाच वर्षांचा कार्यकाळ निभावून न्यायचा असतो.जनतेच्या जीवनमरणाचा पाणी टंचाईचा प्रश्न असला तरी त्यासाठी टोकाच्या भूमिकेतून राज्य शासनाकडं म्हणणं मांडायचं धाडस दाखविले जात नाही.वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या मर्जीतून आपण उतरता कामा नये,अशा प्रकारची दुटप्पी भूमिका त्यामागे असू शकते,हेच आमच्या मराठवाड्यातील जनतेचे दुर्दैव म्हणावे लागते! मराठवाड्यातील अनेक जिल्हा, तालुका, शहरात दररोजच्याला पाणी मिळत नाहीत.त्यासाठी किमान तीनचार दिवसांनंतरच पाणी मिळते! आणि मग आमच्या प्रत्येकाच्या मनाला प्रश्न असा पडतो की, लोकशाही राज्यव्यवस्थेत आमची तहान कधी भागणार? राज्याच्या काही भागात बागायती शेतमळे आजही हिरवेगार फुलतांना दिसतात! तर तेथील जनता जागरूक अन् राजकीय नेतृत्व धमकदार आहे म्हणून काय? अन् चार वेळेला राज्याचे मुख्यमंत्री पद मराठवाड्याकडे आलेले आहेत.तरीसुध्दा मराठवाड्याचा पाणीप्रश्न जैसे थे असतो! आम्ही मात्र पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेले का असावे? असं का होतंय.?एरवी आमच्या मराठवाड्याच्या कष्टकरी कामगार, शेतक-यांच्याच वाट्याला लाचारी जिणे का भोगावे लागते? आमच्यासाठी असा भेदभाव का? तर दुस-या बाजुला आजवर पाणी टंचाई निवारणार्थ कित्येकदा उपाययोजना राबविताना किती तरी अब्जावधी रुपयांचा निधी खर्चून झालेला असल्याचे राज्य शासनाचे अर्थसंकल्पातील आकडे दर्शवितात! आणि मग नैसर्गिक अवर्षणप्रवणस्थितीने पाणी प्रश्न जसा निर्माण झाला तो अजून कायम का आहे?आणि म्हणूनच यामध्ये नेमकी चुक ती कोणाची असणार ?हा प्रश्न शेवटी उरतोच! वास्तविक पाहता पाणी हा द्रव्य घटक प्रत्येकाला रोज गरजेचा असतो. त्याबाबत आपण एवढे निष्काळजी कसे आहोत? याबाबत आपण सतत दुसऱ्यांवर अवलंबून असतो.दुस-यांनाच जबाबदार समजतो.हे एक व्यक्ती म्हणून आपला विचार बरोबर आहे काय?तर नैतिकदृष्ट्या बरोबर नाही.तेव्हा एकमेकांवर ढकलून कुरघोडी करण्यापेक्षा आपल्या सर्वांच्या जीवन जगण्याचा प्रश्न आहे.हे प्रत्येकाने जाणीवपूर्वक समजून घ्यायला हवं.आपसी मतभेद, राजकीय मतभेद, पक्षभेद बाजूला सारून अवघा मराठवाडा एकवटायला हवा! त्यानंतर राज्य शासनाने आणलेला समन्यायी वाटप कायदा २००५ नुसार मराठवाड्याच्या हक्काचे,हिश्याचे पाणी मिळवून घेणे कायदेशीर बाब ठरते.शिवाय आपापसात कुणा बाबतही लहानमोठा भेद न बाळगता झालं गेलं विसरून एकोप्याने एकत्र येऊन पाणी टंचाईचा प्रश्न सोडवून घेणेच आपल्या गरजेचे आहे.
अन्यथा विकसित मराठवाडा आपले स्वप्नच होऊ नये?