वाई :-महात्मा गांधींचा श्रम व सत्याचा मार्ग अंगिकारा- मा. प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे :-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
महात्मा गांधींचा श्रम व सत्याचा मार्ग अंगिकारा- मा. प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे.
बागेची स्वच्छता करुन गांधी व शास्त्रीजी यांची जयंती केली साजरी
वाई: ०२, राष्ट्रपिता म. गांधींनी सत्य व अहिंसा हे दोन मूलमंत्र जगाला दिले. त्यांचे सत्याचे प्रयोग अखिल मानव जातीला मार्गदर्शक आहेत. त्यांनी आपल्या आचरणातून श्रमालाही प्रतिष्ठा मिळवून दिली एन.एस.एसच्या स्वयंसेवकांनी श्रमाबरोबरच म. गांधींचा सत्याचा मार्ग अंगिकारावा असे प्रतिपादन किसन वीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन व स्वच्छता अभियान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. स्टाफ सेक्रेटरी डॉ. हणमंतराव कणसे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी श्री. राहुल तायडे यांची उपस्थिती होती.
डॉ. फगरे म्हणाले, एन.एस.एसचे स्वयंसेवक महाविद्यालयाला समाजाशी जोडतात. समाजात जाऊन त्यांनी कृतीतून श्रमाचे महत्त्व सर्वांना पटवून द्यावे. श्रमामुळे माणसाची कार्यक्षमता वाढते. समाजात सेवावृत्तीने काम करणाऱ्या प्रत्येकाचा आपण आदर करावा. आयुष्यात सत्याच्या मार्गावर चालने हीच गांधीजी व शास्त्रीजी यांना खरी आदरांजली ठरेल. महामानवांच्या विचारांचे पाईक होऊन स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा असे त्यांनी सांगितले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. हणमंतराव कणसे म्हणाले, कोविड-१९ च्या काळात खऱ्या अर्थाने मानवाला स्वच्छतेते महत्त्व पटले. गांधी व शास्त्रीजी यांनी स्वच्छतेची सूचिता यापूर्वीच सांगून ठेवलेली आहे. शास्त्रीजींची जय जवान जय किसान ही उदघोषणा पुन्हा एकदा अंगिकारुन शेतीला प्रतिष्ठा मिळवून द्यायला हवी. शेतकरी जगला तर जग सुखी होईल त्यामुळे शेतीला दुसरा कोणताही पर्याय होऊ शकत नाही.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला राष्ट्रपिता म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अपर्ण करुन आदरांजली वाहण्यात आली. महाविद्यालयाच्या आंब्याच्या बागेत स्वयंसेवकांनी श्रमदान केले.
प्रकल्प अधिकारी डॉ. अंबादास सकट यांनी प्रास्ताविक केले. प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी आभार मानले. श्री. जयवंत खोत यांनी सूत्रसंचालकन केले. कार्यक्रमास एन.एस.एसचे स्वयंसेवक हजर होते.