वाई:-“संस्कृती टिकण्यासाठी भाषेची वैविध्यता जपणे आवश्यक” – डॉ. महेश देवकर
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
वाई दि.12
“संस्कृती टिकण्यासाठी भाषेची वैविध्यता जपणे आवश्यक” – डॉ. महेश देवकर
” आपल्या देशाला बहुभाषिकतेचे वरदान लाभले आहे. प्राचीन काळापासून आपला देश विविध भाषांची भूमी म्हणून ओळखली जाते. आपली ताकद बहुभाषिकतेमध्ये असल्याने; वैविध्य हाच आपल्या संस्कृतीचा मूळ आधार आहे. त्यामुळे एक राष्ट्र एक भाषा हा विचार रुजू शकत नाही.” असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली भाषा व बौद्ध अध्ययन विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. महेश देवकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व किसन वीर महाविद्यालय, वाईच्या ग्रंथालय विभाग व अंतर्गत दर्जा हमी कक्षाच्या वतीने भारतीय भाषा दिनानिमित्त आयोजित ‘भारतीय भाषा, संस्कृती आणि आजचा युवक’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. महेश देवकर बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून जनता शिक्षण संस्थेचे खजिनदार प्रा.नारायणराव चौधरी, संचालक सुरेश यादव, मराठी विश्वकोश कार्यालयातील संतोष गेडाम उपस्थित होते.
डॉ. देवकर म्हणाले की, “विचार सुंदर असतील तर भाषाही सुंदर बनते. भाषा हे संवादाचे माध्यम असून ती आपली संस्कृती आहे. संस्कृती व अस्मिता टिकवायची असेल, तर आपल्या मातृभाषेबरोबरच इतर भाषांची वैविध्यता जपली पाहिजे. भाषेशी मैत्री वाढवत सोबत इतर भाषांचाही आदर केला पाहिजे. ज्ञाननिर्मिती हा भाषेचा आविष्कार असून ती भाषिक संस्कृती असते. भाषा ही संस्कृतीशी घट्ट जोडलेली आहे. विद्येमुळे मुक्ती मिळत असल्याने विविध भाषेतील साहित्याचे वाचन गरजेचे आहे. वाचनाने अनुभवविश्व व्यापक होत असल्याने माणूस समृद्ध बनतो त्यामुळे भाषा दिवस साजरा करण्यापेक्षा भाषेचा उत्सव साजरा करावा.” असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी संस्थेचे खजिनदार प्रा.नारायणराव चौधरी यांनी भारतीय भाषा दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी भाषेवर प्रेम करायला शिकले पाहिजे. विविध भाषेतील साहित्य महाविद्यालयाच्या ग्रंथालयात विपुल प्रमाणात आहेत. त्याचे वाचन केले पाहिजे. वाचनाने माणसाची विचारशक्ती वाढत जाते. त्यामुळे माणसाला वैचारिक समृद्धतेकडे जाण्यास नक्कीच मदत होते म्हणून वाचनाची गोडी विद्यार्थ्यांनी कायम जपली पाहिजे”.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री.अनिल लाखे याने पंचशीलाचे गायन केले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी ,संस्कृत,आणि इंग्रजी या भाषेतील कवितांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. शिवाजी कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अरुण सोनकांबळे यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय रवीन्द्र घोडराज यांनी करून दिला. उपस्थित सर्वांचे आभार डॉ. बाळासाहेब मागाडे यांनी मानले.या कार्यक्रमाप्रंसगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.