वाई:-“स्व. प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांनी निस्वार्थ वृत्तीने राजकारणातून समाजकारण करून एक आदर्श निर्माण केला.” डॉ. पंडित टापरे
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS
वाई दि:19
“स्व. प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांनी निस्वार्थ वृत्तीने राजकारणातून समाजकारण करून एक आदर्श निर्माण केला.” डॉ. पंडित टापरे
“स्व.प्रतापराव भोसले (भाऊ) यांचा जन्म सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासूनच भाऊंच्या व्यक्तिमत्त्वावर वडिलांचे संस्कार होते म्हणूनच भाऊंनी अत्यंत नि:स्पृह राहून राजकारणातून समाजकारण करत आपले व्यक्तित्व उभे करण्यात यशस्वी झाले. भाऊ हे उदार अंत:करणाचे होते. ‘सार्वजनिक काम करत असताना स्वतः पदरमोड करून कामे केली पाहिजे.’ असे मत भाऊंचे होते. म्हणूनच भुईंज गावच्या सरपंच पदापासून ते महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि तीन वेळा खासदार होऊ शकले. त्यांचा लोकसंग्रह प्रचंड होता. भाऊंनी आपला राजकीय प्रवास स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांवर केला.भाऊंचे व्यक्तिमत्व सुसंस्कृत असे होते.” असे प्रतिपादन किसन वीर महाविद्यालयाचे माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. पंडित टापरे यांनी केले.
येथील किसन महाविद्यालयाच्या वतीने जनता शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त स्व.प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांच्या चतुर्थ मासिक पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी उपप्राचार्य डॉ हणमंतराव कणसे, प्रा. भिमराव पटकुरे, डॉ. चंद्रकांत कांबळे, स्टाफ सेक्रेटरी डॉ. अंबादास सकट, किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे तसेच राज्यशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. रमेश डुबल उपस्थित होते.
डॉ. टापरे म्हणाले की,” किसन वीर महाविद्यालयाची उभारणी अतिशय कष्टातून झाली असून,या उभारणीमध्ये मा. भाऊंचा सिंहाचा वाटा आहे. ग्रामविकास मंत्री असताना तत्कालीन जिल्हाधिकारी श्री. अरुण भाटिया यांच्या सहकार्याने धोम धरण पुनर्वसनाचे काम यशस्वीपणे पूर्ण करून; प्रशासनासमोर एक आदर्श निर्माण केला. विशेषतः आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांची शिक्षणाची सोय करून, त्यांना उभे करण्याचे काम भाऊंनी नि:स्वार्थ वृत्तीने केले. भाऊंनी शिस्तबद्ध पद्धतीने आणि ध्येयवादीवृत्तीने समाजामधील कामे पूर्ण केली.अशा सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वाच्या सहवासात माझेही व्यक्तिमत्व फुलून गेले” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.जयवंत चौधरी यांनीही स्व.प्रतापराव भोसले यांच्या आठवणींना उजाळा दिला.
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ.गुरुनाथ फगरे म्हणाले की, “स्व.भाऊंनी जो आदर्श आपणासमोर ठेवला आहे. तो आदर्श आपण आपल्या जीवनात प्रत्यक्षात आणला पाहिजे. भाऊंचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले पाहिजेत .यासाठीच आपण या व्याख्यानमालांचे आयोजन करीत आहोत. या वर्षभरात हे कार्य निरंतर चालू राहील.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व. प्रतापराव भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.अंबादास सकट यांनी केले. पाहुण्यांची ओळख श्री. गणेश चव्हाण यांनी करून दिली.उपस्थित सर्वांचे आभार कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री.बाळासाहेब कोकरे यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.