वाई:-किसन वीर महाविद्यालयामध्ये रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS
वाई दि. १०
किसन वीर महाविद्यालयामध्ये रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा.
वाई जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभाग व पर्यावरण विभागातर्फे रानभाजी महोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे लाल बहाद्दुर शास्त्री महाविद्यालयातील डॉ. योगेश चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी कला शाखेचे उपप्राचार्य प्रा.डॉ. चंद्रकांत कांबळे, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. हणमंत कणसे, वनस्पतीशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. मंजुषा इंगवले यांची उपस्थिती होती.
रानभाजी महोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचावे आणि त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण व्हावे. या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत रानभाजी महोत्सव साजरा केला जातो. रानभाजी म्हणजे नैसर्गिक रित्या निसर्गामध्ये वाढलेल्या काही वनस्पती आहेत. आघाडा, कुरडू, भारंगी, आंबटचुका, टाकळा, पाथ्री, अळू, घोळ, केना, काटेमाठ, खारशेंग, दिंडा, माठ, तांदुळजा इत्यादी प्रकारच्या अनेक रानभाज्या आपल्याला निसर्गात बघायला मिळतात. त्याच बरोबर काही रानफळे, रानफुले, कंदमुळे हे देखील आपल्याला निसर्गात आढळतात. या सर्व भाज्या विविध आजारांवर देखील गुणकारी आहेत. विद्यार्थ्यांनी विविध भाज्या संकलन करून तर काही विद्यार्थ्यांनी भाज्यांच्या पाककृती करून त्याचे प्रदर्शन मांडले होते.
रानभाज्यांचे महत्व सांगताना डॉ. चव्हाण म्हणाले, रानभाजी ही एक आयुर्वेदिक नैसर्गिक देणगी असून लोकांनी त्याचे सेवन करावे. त्या नष्ट होणार नाहीत. त्यांचे जतन करावे, असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या परिसरात आढळणाऱ्या रानभाज्या, रानफळे, रानफुले, कंदमुळे यांची चित्ररुपात ओळख करून दिली, तसेच त्यांचे महत्त्व देखील सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. फगरे म्हणाले असे कार्यक्रम आपण राबवून निसर्गाचे महत्व, औषधी गुणधर्माने परिपूर्ण असलेल्या व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असणाऱ्या या रानभाज्यांचे महत्व समजून घेऊन आपल्या आहारात व मानवी जीवनात त्यांचा उपयोग वाढवता येईल. तसेच आज जे विविध रोगांचे प्रमाण वाढत चालले आहे त्यावर निश्चित नियंत्रण आणता येईल. यासाठी विद्यार्थ्यांनी या भाज्यांची माहिती घेऊन त्याचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दमयंती चौधरी यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. मंजुषा इंगवले यांनी करून दिली. सूत्रसंचालन श्रीमती प्रतिक्षा मांढरे यांनी केले, तर आभार कु. भक्ती वायंगुडे या विद्यार्थिनीने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. अनिस मोकाशी, व श्री. संतोष शिंदे व सतिश कांबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते तर प्रदर्शनास बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापकांनी दिली.
किसन वीर महाविद्यालयामध्ये रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे डॉ. योगेश चव्हाण, प्राचार्य डॉ. गुरूनाथ फगरे, प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे, डॉ. मंजुषा इंगवले व इतर मान्यवर उपस्थित होते.