वाई:-! २१ मार्च जागतिक वन दिवस!!
प्रतिनिधी आशितोष चव्हाण:-7378619519

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
!! २१ मार्च जागतिक वन दिवस!!
आजचा दिवस हा जागतिक वनदिवस म्हणून सर्व ठिकाणी साजरा केला जातो,” वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” हा संदेश ४०० वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून तमाम मानवजातीला दिला, निसर्ग आपल्याला भरभरून देतो, त्याच्या अंगाखांद्यावर आपण जगतो तो आपला मित्र आहे, गुरु आहे, वृक्ष व वेली ही निसर्गाने मानवाला दिलेली सर्वात सुंदर देणगी आहे,तो निसर्गाचा सर्वात मौल्यवान खजिना आहे. मानवी जीवनासाठी पुढील पिढ्यांसाठी त्यांच्या सुखासाठी, समृद्ध जीवनासाठी झाडांना संरक्षण दिले पाहिजे त्याचे संवर्धन केले पाहिजे, वृक्षरोपण ही आजची नितांत गरज आहे, आपले जीवन आनंददायी, चैतन्यदायी होण्यासाठी झाडं वाचली पाहिजेत ती जगली पाहिजेत.
मध्यंतरी वाई शेजारील सोमजाई डोंगरावर नागरिकांनी काही नवीन झाडे लावली होती कोणीतरी रात्रीच डोंगराला आग लावली, वणवा पेटला त्यात लावलेली निम्म्यापेक्षा अधिक झाडे जळून खाक झाली, पावसाळ्यात गुरांना चाऱ्यासाठी नवीन गवत यावे म्हणून शेजारच्या गावातील लोक उन्हाळ्यात वाळलेले गवत पेटवतात त्यामुळे डोंगरात वणवा पेटतो, त्यात पशुपक्षी, झाडे, वनसंपदा जळून जाते.
औद्योगीकरण, नागरिकीकरण व मूलभूत सोयीसुविधांसाठी जंगलांवर दिवसेंदिवस्थान ताण वाढत आहे, प्रदूषण, दुष्काळ व जमिनीची धूप ही संकटे मानवनिर्मित आहेत, प्रदूषणामुळे, जंगलतोडीमुळे वैश्विक तापमानाची (ग्लोबल वार्मिंग)ची समस्या निर्माण झाली, वातावरणातील ओझोन वायू कमी झाला त्यामुळे कुठेतरी समुद्रात त्सुनामी येते, भूकंप होतात आपण म्हणतो निसर्ग कोपला. आज माणूस उपकारकर्त्यावरच उलटला आहे, आज विज्ञान युगात सुंदर निसर्गालाच विनाशाची घरघर तर लागणार नाही असा प्रश्न पडतो, माणसाने निसर्गाला विद्रूप करण्याचा जणू चंगच बांधला आहे.
मानवी जीवनाच्या अस्तित्वासाठी वनसंरक्षण व त्याचे संवर्धन ही काळाची गरज बनली आहे, आपणच निसर्गाची काळजी घेतली, त्याचे संवर्धन केले तर पदराआड दिवा जपल्याप्रमाणे निसर्गही आपल्यावर मायेचे छत्र सदैव राखील. आज वनदिनानिमित्त आपणही संकल्प करूया प्रत्येकाने किमान एक झाड, परसात, शेतात, डोंगरात जिथे शक्य असेल तिथे लावून त्याचे संवर्धन करूयात जेणेकरून निसर्गाची जैवविविध साखळी अबाधित राखण्यास मदत होईल.
श्री कल्याण पिसाळ- देशमुख, ओझर्डे
उपाध्यक्ष -वाई तालुका काँग्रेस कमिटी,
फोन- ९८५०४१२९०९