ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीय

वाई:-!! विझताना दिव्याची ज्योत मोठी होते !!

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

!! विझताना दिव्याची ज्योत मोठी होते !!
दोन दिवसांपूर्वी आखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते श्री राहुल गांधी यांना भाजपा नेत्यांच्या संदर्भात वक्तव्य केल्याने मानहानीच्या खटल्यात शिक्षा झाली त्यांचं लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आले तसेच २ वर्षाकरता निवडणूक लढण्यास बंदी घालण्यात आली, केंद्रात व अनेक राज्यात भाजपप्रणित सरकारे आहेत. या प्रकरणी भाजपाचा कसलाही संबंध नाही असा दावा भाजप प्रतिनिधी करत आहेत ही न्यायालयाने केलेली कारवाई आहे परंतु “वेड घेऊन पेडगावला” जाण्याची भाजपाची ही सराईत गुन्हेगारासारखी जुनीच सवय आहे, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार केंद्रीय तपासयंत्रणा व पैशाच्या जोरावर खाली खेचले तेव्हांही त्या सर्व घडामोडींशी भाजपाचा कसलाही संबंध नाही असाच त्यांचा दावा होता अखेर सत्य जगासमोर आलेच. शत: प्रतिशत धर्मांधतेची कास धरलेल्या भाजपाने ९ वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या प्रभावी वापराने केंद्रीय सत्तेचा सोपान चढला. एकदा सत्ता हाती आली की एक एक करून लोकशाहीचे चारही स्तंभ उध्वस्त करण्यास सुरुवात केली. कायदेमंडळात ते स्वतःच आहेत केंद्रीय तपास यंत्रणांच्या साह्याने जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींची फोडाफोडी, खरेदी करून आपल्या पक्षाचे स्वबळ वाढवले. ज्या जनतेने लोकप्रतिनिधींना निवडून दिले त्यांच्या पुढे ५ वर्षे राजकीय तमाशा निमूटपणे पाहण्याशिवाय पर्याय उरला नाही, प्रशासनाला, नोकरशाहीला बासणात गुंडाळून ठेवले, “हम करे सो कायदा” देशातील सर्वोच्च असणारी न्यायव्यवस्था ही अशीच पूर्ण नग्न करून टाकली, डोळ्यावर पट्टी बांधलेली नि:पक्ष अशी न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांरांनी खिशात घातल्यची अनेक उदाहरणे आहेत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारी प्रसारमाध्यमंही भाजपाच्या दावणीला रवंथ करु लागली. या देशातील सर्वात प्रभावशाली मानली जाणारी प्रसारमाध्यमेही दामूआण्णांच्या प्रभावाखाली विकलांग झाली. देशातील NDA सरकारने जगातील सर्वात प्रभावशाली लोकशाही लुळीपांगळी करून टाकली, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांना मान्य नाही. “आम्ही सांगू तो कायदा आम्ही देवू तो न्याय” अशी ही बेबंदशाही अगदी चौखुर उधळलेली आहे. आतापर्यंत भारतीय जनता पार्टीला मिळालेले यश हे सर्वोच्च आहे व यापुढे मोदी सरकारला उतरती कळा लागणार असे अनेक ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांचे, कायदेपंडितांचे निरीक्षण आहे, तसा जनभावनेचा कल दिसतो आहे.”दिवा विझण्या अगोदर त्याची ज्योत काही काळासाठी अधिक प्रकाशमान होते.” सध्या साधारण तशीच अवस्था केंद्रातील श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारची झाली आहे अशी प्रतिक्रिया वाई तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री कल्याण पिसाळ-देशमुख यांनी दिली.
निवडणुकीच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप होत असतात २०१९ साली कर्नाटकातील एका प्रचार सभेत मोदी आडनाव असणाऱ्या ४ लबाड व भ्रष्ट व्यक्तिंचा उल्लेख श्री राहुल गांधी यांनी केला होता, सगळेच मोदी नावाचे चोर कसे काय असू शकतात अशी शंका व्यक्त केली‌ होती, भ्रष्ट व्यक्तींसाठी चोर हा सर्वात समर्पक शब्द असावा. या चारही व्यक्ती विविध जातींच्या आहेत तरीसुद्धा भाजप समर्थक श्री राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा अवमान केल्याचा कांगावा करत आहेत. देशाला गंडा घालणाऱ्या अदानींच्या कंपनीत जमा झालेले २०,००० कोटी रुपये कुणाच्या मेहरमर्जीने मिळालेले आहेत हा श्री राहुल गांधींचा प्रश्न आहे व तो संसदेत त्यांनी खुलेआम विचारला आहे. सक्षम विरोधक हा लोकशाहीचा पवित्र दागिना आहे, विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना मोदी सरकारने बेधडक सामोरे जाणे अपेक्षित होते. परंतु मोदी सरकारचे भांडाफोड करणाऱ्या श्री राहुल गांधींच्या विरोधात गुजरात न्यायालयात दोन वर्षांपूर्वीचा उच्च न्यायालयात माघारी घेतलेला दावा पुनश्च: दाखल केला गेला, नवीन न्यायाधीशांनी तो खटला अगदी तत्परतेने चालवला व काही दिवसातच न्यायालयाने श्री राहुल गांधींना शिक्षा सुनावली, त्यानंतर‌ २४ तासाच्या आत त्यांचे संसदेतील सदस्यत्व देखील रद्द केले गेले. इतकी कार्यतत्परता या अगोदर केंद्र सरकारने कधीच दाखवली नाही, आमचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही हा न्यायालयाचा निर्णय आहे असे जरी भाजपचे प्रवक्ते म्हणत असले तरी ह्या संपूर्ण प्रकरणापाठी भाजपची कुटनिती आहे हे अगदी स्पष्ट आहे, प्रश्न विचारणाऱ्या नेत्याला ही शिक्षा तर १२५ कोटी भारतीयांना जाहीरपणे खोटं बोलून फसवणूक करणाऱ्या, सर्वसामान्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या पंतप्रधानांना कोणती शिक्षा ? त्यांच्यावरही गुन्हे दाखल व्हायला हवेत.भविष्यात ही न्यायालयीन लढाई ऐनकेन प्रकारे मोदी सरकार जिंकण्याचा प्रयत्न करणार परंतु जनतेच्या रणांगणात होणारी फ्री स्टाईल लढाई ही मोदी समर्थकांच्या नियंत्रणा बाहेर असणार आहे. केंद्र सरकारच्या या धोरणा विरोधात देशातील सर्व विरोधक एकत्र येताना दिसत आहेत, तिथे योग्य तो निवडा २०२४ ला होईलच.
२ कोटी रोजगार निर्मिती, विदेशातील काळा पैसा परत देशात आणणार अशा एक ना अनेक वल्गना हवेत विरल्या. अचानकपणे घेतलेला नोट बंदीचा परिणाम संपूर्ण देश आजही भोगतोय, संपूर्ण देशात जीएसटी लागू केला ंत्याचीही परिस्थिती फार वेगळी नाही, पैशाच्या व तपासयंत्रणांच्या जोरावर लोकप्रतिनिधी वेठीला धरले, बहुतांश सदस्य इतर पक्षातून निवडून आलेले आहेत, सरकारी निमसरकारी कंपन्या, बँका, विमान कंपन्या अनेक वित्तीय संस्था सरकारने विक्रीस काढल्या एवढा भीमपराक्रम आजपर्यंत कुठल्याही सरकारच्या काळात घडला नाही. देश विकून देश चालवण्यावर यांचा विश्वास आहे. विरोधकांचा व सर्वसामान्यांचा आवाज दडपून लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सत्तेच्या जोरावर अव्याहतपणे चालू आहे, हे पूर्णपणे फॅसिस्ट वृत्तीचे, हुकूमशाहीचे लक्षण आहे. सत्तेच्या जोरावर एकदा दोनदा ही मंडळी सामान्य नागरिकांना फसवू शकतात वारंवार नव्हे, “जेव्हा कर्म वसुलीवर येते तेव्हा कुठलीही मात्रा लागू पडत नाही” याची प्रचिती श्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील NDA सरकारला अल्पावधीतच येईल असे श्री कल्याण पिसाळ-देशमुख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
श्री कल्याण पिसाळ- देशमुख
उपाध्यक्ष – वाई तालुका काँग्रेस कमिटी
फोन- ९८५०४१२९०९

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button