वाई:-किसनवीर कारखाना व्यवस्थापनाकडून वाऱ्याचे भारे “कुणी पगार घ्या, कुणी ऊसबिल घ्या.”
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
!! कुणी पगार घ्या, कुणी ऊसबिल घ्या !!
सालाबाद प्रमाणे मार्च महिन्याची चाहूल लागताच सर्वसामान्य शेतकऱ्याचे अर्थकारण पुरते ढवळून निघते ते त्याच्या पाचवीलाच पुजलेले आहे वर्षभर चालढकल करून थोडीफार तडजोड करून वर्षाअखेर येते. मात्र चालू वर्षी हा कसोटीचा काळ आहे, किसनवीर कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकऱ्याचे अर्थकारण ऊस पिकावर अवलंबून आहे सोसायट्या, विविध बँका, सहकारी संस्था, ग्रामपंचायती कर तसेच खाजगी सावकारांचा वसुलीचा जोर प्रचंड आहे, किसनवीर कारखान्याची चालू ऊसबिल येणे व मागील दोन वर्षाची येणे बाकी मार्च महिन्याच्या तोंडावर मिळणे गरजेचे असताना कारखाना व्यवस्थापन मात्र अमुक तारखेला बिल निघेल, तमुक तारखेला बिल निघेल, कुणी पगार घ्या कुणी ऊसबिल घ्या असे वाऱ्याचे भारे बांधण्याचे काम सध्यस्थितीत चालू आहे त्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्ग हवालदील झाला आहे. अशी प्रतिक्रिया वाई तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री कल्याण पिसाळ-देशमुख यांनी दिली.
कारखान्याच्या नवीन व्यवस्थापनाचा हा जरी हनिमून काळ असला तरी यांची कामगिरीही गेल्या दोन-तीन वर्षात श्री मदन भोसलेंनी केलेल्या कारभाराशी स्पर्धा करणारी आहे किंवा त्याहीपेक्षा भयंकर परिस्थिती निर्माण होईल अशीच आहे, अजून गेल्या अनेक महिन्यांपासून कामगारांचे पगार देणे बाकी आहे जे पगार मिळाले तेही कामगारांच्या नावे कर्ज काढून, हंगामी व कायम असणाऱ्या कामगारांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होते आहे खर्च कमी करण्याच्या व पगार जास्त असल्याच्या सबबीखाली अनेक कामगार बेदखल आहेत काही कायम असणारे कामगार तर व्यवस्थापना विरोधात न्यायालयीन लढाई लढण्याच्या मानसिकतेत असल्याचे बोलले जाते, मात्र खर्चाच्या व जास्त पगाराच्या सबबी खाली कमी केलेल्या कामगारांच्या जागी आपल्याच मर्जीतील बगलबच्च्यांच्या नेमणूका केल्या असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. कामगार सोसायटीच्या कर्जापोटी कामगारांचे कपात केलेले अनेक कोटी रुपये अजून पर्यंत सोसायटीज दिलेले नाहीत उलटपक्षी ठराविक रक्कम सोसायटीस देऊन कामगारांना नवीन जुजबी कर्ज देत असल्याचा प्रकार सध्या चालू आहे. खंडाळा व किसनवीर कारखाना अनुक्रमे १५ ऑक्टोबर २०२२, नोव्हेंबर २०२२ मध्ये चालू केलेला असून दोन्ही कारखान्यांकडून फक्त पहिल्या पंधरवड्यात गाळप केलेल्या उसाचे बिल शेतकऱ्यांना मिळालेले आहे, जवळपास ३.५ ते ४ महिन्यापूर्वी पाठवलेले उसाचे बिल अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही तसेच दोन वर्षांपूर्वीचे साधारण ५४ कोटी रूपये शेतकऱ्यांनी विसरून जावे अशीच या व्यवस्थापनाची मानसिकता आहे ते मिळणारच नाहीत असे आमदारांची समर्थक मंडळी खाजगीत बोलताना दिसतात, निवडणूक प्रचारादरम्यान लोकप्रतिनिधींनी सगळ्यांना सगळं मिळेल असा दावा ठोकला होता त्याचा त्यांना विसर पडलेला दिसतो आहे. हंगामाच्या सुरुवातीला पैसे मागणाऱ्या ऊस तोडणी कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आश्वासन कृषी आयुक्तालयाने केले होते तरी सुद्धा आजही काही ठिकाणी एकरी १००० ते ५००० रुपये पर्यंत ऊस तोडणीसाठी मागणी होत आहे ही गोष्ट खरी आहे. किसनवीर कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांची परवड थांबण्याचे कसले चिन्ह दिसत नाही, व्यवस्थापनाकडून याची दखल घेतली जात नाही, आमदार साहेबांच्या बहुतांश समर्थकांचा ऊस खाजगी कारखान्यांना गाळपासाठी गेलेला आहे कारखान्याकडे आलेला बहुतांश ऊस हा विरोधकांचा आहे त्यामुळे कारभाऱ्यांना या ऊसबिलाचे बिल्कुल देणेघेणे नाही, गांभीर्य नाही अशी चर्चा शेतकरी वर्गात आहे. मा. खासदार कै. लक्ष्मणराव तात्या पाटील यांच्या जयंती निमित्ताने कामगार व शेतकऱ्यांच्या हिताच्या विचारांचा थोडातरी प्रकाश कारभाऱ्यांच्या डोक्यात पडावा, कामगारांचे थकीत पगार, चालू ऊसबिल व मागील थकीत ऊस बिलाची काही ना काही रक्कम अदा करण्याचे ठोस आश्वासन आदरणीय तात्यांच्या जयंती निमित्त मिळेल असा आशावाद करण्यास हरकत नाही.
मार्च महिन्याच्या तोंडावर पैशाअभावी शेतकरी गलितगात्र झाला असताना खुशालचेंडू माजी अध्यक्ष श्री मदन भोसले निर्विकार पणे निपचित पडले आहेत, त्यांची या कारभाराला मुकसंमती असल्याची भावना शेतकरी वर्गात आहे, दुसरीकडे वाई तालुक्यातील आमदार गटाने मात्र आणि गावा – गावात सोसायटी व ग्रामपंचायती मध्ये दुसऱ्याने जन्माला घातलेल्या मुलांचे जबरदस्तीने पालकत्व स्वीकारण्याचा धडका लावला आहे, जननायकांच्या समर्थनाशिवाय हे शक्य नाही, या नतद्रष्ट वृत्तीचे दायित्व आमदार साहेब टाळू शकत नाहीत.
महाराष्ट्रात सहकारी कारखान्यांचे खाजगीकरण होण्याची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून माजी केंद्रीय कृषिमंत्री थोरल्या साहेबांच्या आशीर्वादानेच झाली होती अशी माहिती ऐकिवात आहे, भविष्यात किसनवीर कारखान्याचे खाजगीकरण झाल्यास त्याला आजी माजी सत्ताधारीच जबाबदार असणार आहेत, आज पर्यंत विक्रम वेताळच्या कथेप्रमाणे आलटून पालटून दोघेही शेतकऱ्यांच्या खांद्यावर बसून, कथा सांगून असेच गब्बर झाले आहेत. परंतु योग्य संधी येताच शेतकरीराजा दोघांनाही पायदळी घेतल्याशिवाय राहणार नाही असे वाई तालुका काँग्रेस उपाध्यक्ष श्री कल्याण पिसाळ-देशमुख यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
श्री कल्याण पिसाळदेशमुख – ओझर्डे
उपाध्यक्ष वाई तालुका काँग्रेस कमिटी
फोन – ९८५०४१२९०९