सातारा:-आज सातार्यात सरकारविरोधात धडाडणार वंचित बहुजनांची तोफ.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
आज सातार्यात सरकारविरोधात धडाडणार वंचित बहुजनांची तोफ.
सातारा : प्रदीर्घ कालावधीनंतर वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या दौर्याची सुरुवात केली आहे. उद्या दि. 7 रोजी दुपारी एक वाजता गांधी मैदान येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. केंद्र व राज्य सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपविरोधात त्यांची तोफ धडाडणार असून याकडे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
त्यांच्या दि. 2 ऑक्टोबर लातूर, सातारा 7, बीड 10, सटाणा नाशिक 28 ऑक्टोबर अशा जाहीर सभा होणार आहेत. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांसाठी महाविकास आघाडी व एनडीए या पक्षातील विशेषत: भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस या चार पक्षांनी बांधणी सुरु केली आहे. रिपब्लिकन चळवळीतील इतर पक्षांनाही लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात कोणत्यातरी पक्षाचाच प्रचार करावा लागणार आहे. याला वंचित बहुजन आघाडी अपवाद असून संविधान जनजागृती विचारमंच च्या माध्यमातून या प्रचारसभा होत आहेत.
वाढती बेरोजगारी, महागाई, अल्पसंख्यांक तसेच दलितांवर होणारे अन्याय अत्याचार, सध्याचा आरोग्य विभागाचा प्रश्न गंभीर बनला असून औषधांविना गरीबांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. दुसर्या बाजूला राजकारणाच्या सारिपाटाच्या खेळात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे दिल्ली वारी करीत आहेत. ठाणे, नांदेड व आदिवासी भागात उपचारासाठी शासकीय रुग्णालयात जाणारे रुग्ण औषधाविना मरण पावत आहेत. ट्रीपल इंजिन सरकार असले तरी धावपट्टीवरुन ते गतीने मार्गक्रमण करीत नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. महामंडळांची नेमणूक होत नाही. ज्याठिकाणी पोटनिवडणुका झाल्या, त्यामध्ये सत्ताधार्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
डीन सारख्या उच्चविद्याविभूषित शासकीय अधिकार्याला टॉयलेट साफ करण्याची वेळ आणली आहे. दिल्लीमध्ये पत्रकारांच्या घरांवर धाडी मारल्या जात आहेत. विरोधात बातमी छापणार्या पत्रकाराविरोधात मंत्री वक्तव्य करीत आहेत. अशा विविध प्रश्नांबाबत तसेच मराठा व धनगर आरक्षणाबाबत पक्षाची भूमिका स्वच्छ असून त्याचाही या सभेमध्ये उल्लेख केला जाईल.
दहिवडीसारख्या दुष्काळी भागातून बाळासाहेबांच्या सभेकरीता उपस्थित राहणे कर्तव्य समजून कार्यकर्ते ऊन, पावसाची तमा न बाळगता चक्क चालत येत आहेत. सध्या सातार्यात जाहीर सभेची जय्यत तयारी झाली असून जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, महासचिव गणेश भिसे, इम्तियाज नदाफ, सिद्धार्थ नदाफ, सिद्धार्थ कांबळे, अमोल गंगावणे, तुषार बैले व मिलिंद कांबळे, महिला पदाधिकारी आणि युवा पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिल्यास धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता व्यक्त होत असून मतांची विभागणी टाळण्यासाठी इंडिया मध्ये वंचित बहुजन आघाडीस न घेतल्यास सातार्यात सक्षम उमेदवार उभा करण्याचीही चाचपणी यावेळी केली जाणार आहे.
स्वत: ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर आकोल्यामधून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. वंचित घटकातीलच उमेदवाराला उमेदवारी देण्यासाठी अनेक वंचित चे नेते इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. भारिप बहुजन महासंघासोबत कार्य करणारे कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीच्या प्रवाहात सामील होण्यासाठी या सभेला उपस्थित राहतील, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिलेली आहे.