वाई:-पालकांशी सुसंवाद नसल्याने युवापिढी भरकटतेय – मा. पुंडलिक पाटील किसन वीर मध्ये एडस् विषयी जनजागृती कार्यक्रम.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे:-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
पालकांशी सुसंवाद नसल्याने युवापिढी भरकटतेय – मा. पुंडलिक पाटील
किसन वीर मध्ये एडस् विषयी जनजागृती कार्यक्रम.
वाई, आजची तरूण पिढी इंटरनेट व मोबाईलच्या अतीवापरामुळे दिशाहीन झाली आहे. जिवघेण्या स्पर्धेमुळे आलेले दडपण झुगारण्यासाठी युवा पिढी सुसंवादासाठी चुकीचा मार्ग व चुकीची व्यक्ती निवडत आहे. युवकांचा पालकांशी सुसंवाद हरपल्याने युवापिढी भरकटत आहे असे प्रतिपादन सातारा जिल्हा रुग्णालयाचे पर्यवेक्षक पुंडलिक पाटील यांनी केले.
येथील जनता शिक्षण संचलित किसन वीर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व रेड रिबन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एडस् दिनानिमित्त आयोजित ‘एडस् जनजागृती कार्यक्रमांतर्गत’ ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. (डॉ.) सुनील सावंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमास लिंक वर्कर कोऑर्डिनेटर अरूण दळवी, वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील विद्या जाधव, ज्योती चव्हाण, दिपाली गाढवे, प्रकल्प अधिकारी डॉ. अंबादास सकट यांची उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, लैंगिक प्रश्नांविषयी तरुणांनी मित्र-मैत्रिणींशी बोलण्यापेक्षा पालकांशी संवाद साधावा. मुलगा-मुलगी वयात येताना त्याच्यात शारीरिक व मानसिक बदल घडत असतात. नैसर्गिक आकर्षणालाच ते प्रेम समजू लागतात. युवकांच्या हातामधील मोबाईल लैंगिकतेबाबत त्यांना चुकीची माहिती देतो. या वळणावर युवक व्यसनाधीनता व एडस् सारखे आजार वाढीस लागतात. या प्रलोभनांपासून दूर राहण्यासाठी पाटील यांनी युवकांना विचारांची त्रिसुत्री दिली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. सावंत म्हणाले, एडस् या आजाराबाबत योग्य माहिती समाजापर्यंत जाण्यासाठी रेड रिबन क्लबची स्थापना महाविद्यालयात केली आहे. तरूण पिढी आरोग्यसंपन्न होण्यासाठी शासन जनजागृतीसाठी नवे-नवे कार्यक्रम राबवित असते. एन.एस.एस.चे स्वयंसेवक अशी माहिती समाजापर्यंत घेऊन जातील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. हणमंतराव कणसे यांनी प्रास्ताविक केले. प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी आभार मानले. राहूल तायडे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमात ‘एडस् विषयक जनजागृती प्रश्नमंजुषा’ अंतर्गत विद्यार्थ्यांचे चार गट करुन त्यांना प्रश्न विचारण्यात आले व विजेत्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. कार्यक्रमास कु. चोरगे, सौ. मोरे, श्री. देशपांडे व एन.एस.एसचे स्वयंसेवक उपस्थित होते.